मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं?
तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं!
पोटात असल्यापासूनच धावणारी आई बघितलेल्या, मुंबईत जन्मलेल्या मुलाला धावायला वेगळं शिकवावं लागत असेल असं वाटतंचं नाही!
एका लहानशा मध्यम वर्गीय कुटुंबात झालेला जन्म..
जिथे दोन्ही पालक नोकरी करायचे..
सकाळ व्हायची ती रेडिओ वर आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम कानावर पडून!
जागं होईपर्यंत आईचं सगळं आवरुन ती निघायची वेळ आलेली असायची..त्यामुळे स्वयंपाक कसा करतात हे आम्ही फक्त सुट्टीच्या दिवशी बघितलं..कारण एरवी तो आम्ही झोपेत असतानाच झालेला असायचा!
मग बाबांची पूजा सुरू असेल तर ती स्तोत्र कानावर पडत आम्ही आन्हिकं उरकायचो आणि शाळेत जायला तयार व्हायचो..
शाळेतून घरी आलं की खाली खेळायला जायचं आणि तिन्हीसांजेला घरात येऊन परवचा म्हणायच्या. अगदी न कळत्या वयापासून सगळी स्तोत्र कानावर पडल्यामुळे ती आपोआपच मुखोदगत झाली..कधीच कुठलं पुस्तक घेऊन पाठांतर करावं लागलं नाही!
आमची आत्या लहानपणी मला भोंडल्याची गाणी म्हणत झोपवायची तर तिचे यजमान आम्हाला पुराणातल्या, रामायण/महाभारतातल्या गोष्टी सांगून झोपवायचे!
(वरील फोटोत मी - सगळ्यांना समोर बसवून गोष्ट सांगणे हा आवडत छंद होता!)
शाळेतल्या स्पर्धांमुळे वक्तृत्व, विविध गोष्टी-गाणी-संस्कृत सुभाषितं, गीतेचे काही अध्याय असंही कानावरून जातच होतं.
त्यातूनच संगीत शिकायची गोडी लागली. ना आवाज होता ना हातात काही, पण तरी उत्तम संगीताने आणि माझ्या गुरुपरंपरेने मला बांधून ठेवलं आणि शिकायला भाग पाडलं!
इथे उत्तम संगीत म्हणजे मी शब्द, स्वर आणि लय यांचा योग्य मिलाफ या अर्थी म्हणते आहे. हा त्रिवेणी संगम जेव्हा जमून येतो, तेव्हा जे होतं तेच उत्तम संगीत अशी माझी धारणा आहे.
बाबांना वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे खास त्यांच्या निवडीची एकसेएक पुस्तकं हातात पडत गेली आणि मी ती खाऊन टाकत गेले! कधी कधी तर असंही व्हायचं की बाबांनी एखादं पुस्तक आणलं की मी लगेच बसून तासाभरात त्याचा फडशा पाडत असे आणि परत त्यांच्याकडे जाऊन आता काय वाचू असा भुंगा लावत असे! त्यामुळे उत्तम वाचन करण्याचे संस्कार झाले. इंग्रजी माध्यमात शिक्षण आणि मराठीत अवांतर वाचन आणि घरी रोजचा संवाद, याने दोन्ही भाषा एकत्रच विकसित झाल्या, स्तोत्रांच्या निमित्ताने संस्कृत सुद्धा मनात रुजत होतं आणि वाचा शुद्ध करत होतं आणि यामुळे एकूणच भाषेची गोडी लागली.
आकाशवाणीच्या संगीताच्या चोखंदळ निवडीने आणि स्तोत्र मंत्रांच्या लयबद्ध लहरींच्या संस्कारांनी कान असा काही तयार झालेला की चांगलं संगीत सोडून दुसरं काही रुचत नव्हतं. विशेष म्हणजे त्यातलं काहीही कळत नव्हतं, पण हे ऐकावंसं वाटतं आणि हे फार वेळ ऐकवत नाही - इतकं सरळ साधं गणित होतं.
पुढे कॉलेज मधे नवीन तऱ्हेच्या संगीताचाही अनुभव घेतला, पण तो फारच तात्पुरता रुचला.
नंतर शिरकाव झाला तो वारकरी संप्रदायात. त्याचंही कारण मोठं रंजकच..पुढे कधीतरी त्याबद्दल लिहीन. पण त्या टाळ-मृदुंगाच्या नादाने पार वेड लावलं!असं वाटू लागलं की आपला जन्म हा यासाठीच झालेला आहे!
त्यानंतर आयुष्यात अगदी टर्निंग पॉईंट वर आला तो प्रवास! भारतातील निसर्ग सौंदर्याने अशी काही भुरळ घातली की आज जर मी वर्षातून एक दोनदा शहराबाहेर गेले नाही तर अवघडच होईल माझं! प्रवासाने आपल्या देशाच्या वैविध्याची नव्याने ओळख करुन दिली. भूगोलाच्या पुस्तकाबाहेरील खरा खुरा भारत किती समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांनी भरलेला आहे हे कळलं!
पुढे या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय, हातून थोडं लिखाणही होऊ लागलं आणि त्यातून जानेवारी २०१७ ला जन्माला आला तो माझा ब्लॉग.
राधा उवाच!
आजपर्यंत गेली सात वर्षं इथे थोडंफार लिखाण झालं..तेही फक्त सुचेल तेव्हाच..उगाच ठरवून लिखाण कधी जमलं नाही..
त्यानंतर २-३ वर्षांपूर्वी असं लक्षात आलं की प्रवासादरम्यान आपण अनेक फोटो काढलेले आहेत (स्वतःचे नाही तर निसर्गाचे किंवा एकूण भावलेल्या काही फ्रेम्स) आणि ते नुसतेच पडून आहेत! म्हणून मग इन्स्टाग्राम वर एक पेज काढलं ज्यावर फोटो टाकायला लागले..गती जरा कमीच आहे त्याची, पण आता नव्याने प्रयत्न सुरू आहेत!
एक दिवस असंच हे सगळं बघत बसले होते..कुठून सुरू केलं आणि कुठे आलो याचा लेखाजोखा मांडत..आणि आता आयुष्याच्या तिशीत पदार्पण करताना मनात विचार आला की आपण काय केलं एकोणतीस वर्षात?
तर मला वेगळंच उत्तर मिळालं! मी फार काही केलं नसलं तरी मला गेल्या एकोणतीस वर्षात त्या मानाने फार फार काही मिळालं आहे! मग ते साहित्यातील असो, धार्मिक असो, सांगीतिक असो, अध्यात्मिक असो, प्रवासासंबंधी असो किंवा अनेक दिग्गज लोकांचा सहवास आणि आशीर्वाद असोत..! खूप समृद्ध आयुष्य आजपर्यंत देवाने दिलं..त्याबद्दलची कृतज्ञता आणि जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे या न्यायाने राधा उवाचचं पुढचं पाऊल टाकते आहे, ते म्हणजे हा नवीन YouTube चॅनल.
आता तुम्ही विचाराल की हा नेमका कशाबद्दल आहे? गाण्याबद्दल? प्रवासाबद्दल? लिखाणाबद्दल की आणखी काही? तर मी म्हणेन की हा माझ्याबद्दल आहे.
यातून येण्याऱ्या प्रत्येक कलाकृतीत थोडी थोडी मी असणार आहे. आजवर जे जे उत्तम माझ्या नशिबी आलं ते ते सगळं या माध्यमातून share करायला मला खूप आवडेल, एक प्रकारे ते सगळं ज्यांच्यामुळे आलं त्या सगळ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करायची याहून चांगली संधी मला मिळूच शकणार नाही आणि या निमित्तानेच मला सतत स्वतःला surprise सुद्धा करता येईल. त्याही पलीकडे, फक्त माणसांप्रति नाही तर मला समृद्ध करणाऱ्या आपल्या धर्माप्रति, परंपरांप्रति, भाषेप्रति, ग्रंथांप्रति, निसर्गाप्रतिही कृतज्ञता व्यक्त करता येईल! त्यामुळे या नवीन प्रवासासाठी मी उत्सुक आहे! आता तुम्हाला कधी गाणं ऐकायला मिळेल, कधी लेख, कधी एखादं स्तोत्र तर कधी आणखी तिसरंच काही? कुणास ठाऊक! जे येईल ते गोड मानून घ्यावं अशी नम्र विनंती करते आणि अर्थातच काही सूचना, सुधारणा असतील तर त्या हक्काने त्वरित सांगाव्या असंही सांगते!
चला तर मग, या नवीन उपक्रमाला मनापासून आशीर्वाद द्या, कारण तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही!
खरंतर स्वतःचा वाढदिवस लोकांना कळू नये यासाठी प्रयत्नशील असणारी मी आज या निमित्ताने मात्र वाढदिवस जाहीर करावा लागतोय! पण काही वेळा असं धाडस करावं लागतं ज्याने जबाबदारीची जाणीव कायम राहते. जर तुम्ही हे वाचत असाल आणि तुम्हाला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर माझी एक इच्छा पूर्ण करा.. मनापासून आपल्या आराध्य दैवताचं मोजून ५ मिनिटं नामस्मरण करा..आणि जर तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गदेवतेचं स्मरण करा आणि
"जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे।" एवढंच मागा! मला तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद मिळतील! :)
आणि उद्या चॅनलला जरुर भेट द्या, आवडलं तर इतरांबरोबर share करा ! लाईक करा आणि subscribe करायला अजिबातच विसरु नका!!
त्याचबरोबर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असाल तर तिथेही "राधा उवाच" या पेजला फॉलो करा!
Facebook - https://www.facebook.com/radhauvaacha?mibextid=ZbWKwL
Instagram - https://www.instagram.com/radha_uvaacha?igsh=MTJtODZvbGgzOW9icA==
YouTube - https://youtube.com/channel/UC_cbuCD26pfxYAn-sItB_8A?feature=shared
माझ्या सुदैवाने उद्या ज्ञानेश्वर माऊलींचं आळंदीहून पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान आहे, आणि त्याच निमित्ताने नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची गायलेली स्तुती तुमच्यासाठी घेऊन येत आहे..
"ज्ञानेश्वराष्ट्क"..
राधा उवाच...
उद्या सकाळी ८ वाजता!
~ राधा ~
२८-०६-२०२४