Showing posts with label कथा - नातं. Show all posts
Showing posts with label कथा - नातं. Show all posts

Wednesday, 4 January 2017

नातं.. (भाग ४)

भाग ४..

विहानला पूर्ण शुद्ध आली नव्हती..अर्धवट शुद्धीत तो बरळत होता..
'आदू..
अदिती…'
हे शब्द कानी पडताच त्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला..वडिलांनी त्याला हाका मारुन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला…पण व्यर्थ..शेवटी न राहवून वडिल त्याला समजावत म्हणाले 'आदू येईल हा बाळा..तू लवकर बरा हो आधी..'
इकडे त्याच्या मित्रांना काहीच समजेना..तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याची लहान बहीण अदिती दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती..त्याचा त्याने खूपच धक्का घेतला होता..आणि म्हणूनच खरंतर ते वर्षभरापूर्वी जुनं सगळं सोडून ह्या शहरात रहायला आले होते..
पण इकडे आल्यापासून विहान बराच सावरला होता..मग असं मधेच काय झालं..? आणि तो जर नीरजाच्या धसक्याने असा झाला होता तर मग अदितीचं नाव का घेत होता..?
कोणालाच काही कळेना..शेवटी सगळे त्या दिवशी तसेच घरी गेले..

प्रितीने नीरजाच्या बाबांच्याच्या फोनवर फोन केला आणि तिला सगळं कळवलं..तिला मोठा धक्काच बसला..इतकं भयंकर काही होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं..तिला तिचं मन खात होतं..सुदैवाने ती दुसऱ्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने परतणार होती..आल्या आल्या पाहिलं विहानला जाऊन भेटायचं असं तिने ठरवलं..
दुसऱ्या दिवशी परत सगळे हॉस्पिटलला आले..विहान शुद्धीत आला होता पण काहीच बोलत नव्हता..नीरजा त्याच दिवशी परत येत होती हे प्रितीने ग्रुपमध्ये सांगितलं होतं..इकडे विहानची अवस्था शारीरिकदृष्ट्या थोडी सुधारली असली तरी मानसिक दृष्ट्या खालावलीच होती…डॉक्टरांनी ते जाणलं होतं आणि त्याला तपासायला सकाळीच सायकॉलॉजिस्ट येऊन गेले होते..त्यांनी विहानला लवकरात लवकर बोलतं करायचा सल्ला दिला होता..
अजून कोणीच त्याच्यासमोर नीरजाचं नाव काढलं नव्हतं..पण शेवटी तो कशालाच प्रतिक्रिया देत नाही असं बघून त्याच्या आईने निराजाबद्दल त्याला थेटच विचारलं..
नीरजाचं नाव आईच्या तोंडी ऐकताच विहानने त्याची क्षीण नजर क्षणभर तिच्यावर रोखून धरली…मग मात्र त्याचा बांध फुटला… त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं..तो आईकडे बघून बोलू लागला..'आई..आई…माझी आदू परत आली होती गं..'
त्याला पुढे बोलवेना…आई-बाबांनी त्याला शांत केलं..प्यायला पाणी दिलं…थोडं शांत झाल्यावर विहान बोलू लागला…
'माझी आदू होती तशीच..अगदी तशीच आहे नीरजा..एकदम डॅशिंग…तिच्या आवडी-निवाडीही बऱ्याच आदुसारख्या….आणि आई आदू जशी हसायची तश्शीच अगदी खळखळून नीरजा हसायची गं...मी पहिल्यांदा तिला हसताना बघितलं..आणि मला क्षणभर वाटलं की अदितीच समोर बसली आहे माझ्या…पण अदिती जिवंत नाही हे सत्य आहे…आणि आता..आता मी नीरजालाही गमावून बसलो आहे….'
असं म्हणून तो परत रडू लागला..

दारात नीरजा उभी होती…तिने हे सगळं ऐकलं मात्र तिला ते सहन नाही झालं आणि ती दारातच कोसळली…
त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष दरवाज्याकडे गेलं आणि नीरजाला पडलेलं बघतच सगळे धावले…
थोड्याच वेळात नीरजा शुद्धीत आली…डोळे उघडले आणि पहिला दिसला तो विहानचा चेहरा…तिने चेहरा हातात झाकला आणि रडू लागली…विहान आता बराच सावरला होता…वास्तवाचं भान त्याला आलं होतं…त्याने नीरजाची समजूत काढली..तिची माफी मागितली..
नीरजा सावरली..तिनेही विहानची माफी मागितली..
सगळ्यांना खूप बरं वाटलं..आई-बाबांची मोठी काळजी मिटली..

विहानला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी आला..
घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी दाराची बेल वाजली..कोण आलं बघायला विहान दाराशी गेला तर समोर नीरजा उभी..
ती त्याला फक्त 'hi' म्हणून आत स्वयंपाकघरात गेली..विहानची आई तिथे होती...विहान तिच्या पाठोपाठ आत जाणार इतक्यात नीरजाचा आवाज आला
'विहान आत येऊ नको, बाहेर खुर्चीत बस..मी आलेच!'…
नाईलाजाने विहान बाहेर बसला..त्याचे बाबाही आतून येऊन बाहेर बसले..थोड्याच वेळात नीरजा आणि विहानची आई बाहेर आल्या..
नीरजाच्या हातात आरतीचं ताट होतं..
विहान काही विचारणार इतक्यात तिने त्याच्या कपाळावर कुंकवाची छान उभी रेघ काढली आणि त्याला ओवळलं..
विहानच्या समोर आणि नीरजाच्या मागे भिंतीवर आदितीचा फोटो लावला होता..नकळत विहानची नजर त्यावर स्थिरावली…!
'अरे कुठे हरवलास…? काय सांगते मी.. हात कर ना पुढे…!'
नीरजाच्या आवाजाने विहान भानावर आला..त्याने हात पुढे केला..
नीरजाने हातावर राखी बांधली..विहानच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या…नीरजाने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला..आणि डोळ्यांनी त्याला शांत व्हायला खुणावलं..
'मला माहित आहे आज रक्षाबंधनाचा दिवस नाही..पण भावना व्यक्त करायला कधीकधी मुहूर्ताची गरज नसते ना..म्हणून वेळ न घालवता आजच आले..!'
विहान फक्त हसला..त्याचे आई-वडील भरल्या डोळ्यांनी समोरचं दृष्य पहात होते…
त्यांना गमावलेली लेक मिळाली होती..
एका भावाला दुरावलेली बहीण मिळाली होती...
हरवलेल्या रक्ताच्या नात्याची जागा मनाने घट्ट बांधलेल्या नव्या नात्याने अलगद भरुन काढली होती...

समाप्त

- कांचन लेले

नातं.. (भाग ३)

भाग ३..

नीरजाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं…
एकीकडे तिला विहानचं विचित्र वागणं छळत होतं..तर दुसरीकडे जवळ येणाऱ्या परीक्षेची काळजी छळत होती..
परीक्षेच्या दृष्टीने आत्ता कुठलीच हालचाल करणं योग्य नाही असं तिला खूप विचारांती लक्षात आलं होतं...
सध्या या सगळ्याकडे दुर्लक्ष करु, अभ्यास व्यवस्थित झाला आणि परीक्षा झाली की नंतर या प्रकरणाचा छडा लावू असं तिने मनाशी पक्के ठरवले..

विहानच्या खरेपणाबद्दल तिला मनोमन खात्री होती..पण तरी कुठेतरी एक धाकधूक होती की सगळे म्हणतात तसा खरंच तो प्रेमात पडला नसेल ना माझ्या..? पुन्हा मनात विचारांचा कल्लोळ उठला..तिने स्वतःला शांत केलं..आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचा निग्रह केला, पण त्याचबरोबर विहानला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं नाही असंही तिने ठरवलं.
.

दिवस जात होते...परीक्षा जवळ येत होती..अभ्यासाच्या निमित्ताने भेटी खूपच कमी झाल्या होत्या...पण तरी विहान रोज नीरजाला फोन करतच असे..मधेच एखाद दिवशी तिच्या घराजवळ जाऊन तिला फोन करुन खाली बोलवत असे व मग कधी 'सहजच इकडे आलो होतो म्हणून म्हंटलं भेटू तुला' तर कधी 'अमक्या विषयाच्या नोट्स हव्या होत्या' अशी कारणे देऊन तिला भेटत असे..नीरजा खूप शांतपणे हे सगळं हाताळत असली तरी आतून मात्र ती खूप कंटाळली होती ह्या सगळ्याला..

एक दिवस तिला एक कल्पना सुचली..
तिने परीक्षेनंतर सुट्टीत कुठेतरी बाहेर जाण्याचा हट्ट आई-बाबांकडे केला..त्याप्रमाणे काहीच दिवसात सुट्टीची व्यवस्था करुन आई-बाबांनी सुट्टीत केरळला जायचं नक्की केलं..बुकिंग झालं आणि नीरजा जरा निर्धास्त झाली..
तिने ह्या बाबतीत कोणालाच काही सांगितलं नव्हतं..विहानशी नेहेमीसारखंच वागत होती..त्यालाही अभ्यास करायला प्रोत्साहन देत होती..परीक्षा अगदी उद्यावर आली..नीरजा आणि विहानचं परिक्षाकेंद्र वेगळं होतं त्यामुळे परीक्षेच्या काळात तरी भेटण्याचा प्रश्न नव्हता..फोनवर वेळ निभावून नेता येत होती..

एक एक दिवस जात होते..आणि अखेर परीक्षा संपली..त्या दिवशी शेवटच्या पेपरनंतर सगळा ग्रुप एकत्र कॉलेजमध्ये भेटला..
एन्जॉय केलं आणि सगळे घरी गेले..पुढचे दोन दिवस नीरजाने फोनवरच विहानची बोळवण केली..आणि तिसऱ्या दिवशी सकाळीच ती घरच्यांसोबत केरळला गेली..तिने ठरवल्याप्रमाणे नेहेमीचा नंबर तात्पुरता बंद ठेवला होता...
इकडे विहान दिवसभर फोन करत होता पण फोन बंद असल्याचं कळलं..
संध्याकाळी तिच्या घरी जाऊन आला पण तिथे घराला कुलूप दिसलं..तो खूप अस्वस्थ झाला..
सगळ्या मित्र मैत्रिणींना फोन करुन चौकशी केली पण कोणालाच काही माहित नव्हतं..

असं पुढचे तीन दिवस चाललं..पण रोज त्याच्या हाती निराशाच येत होती..
तो पुरता अस्वस्थ झाला…नुसता मख्खासारखा कुठेतरी बघत घरात बसू लागला..
ह्या बरोबरच दिवसेंदिवस त्याचं खाणं-पिणं कमी होत होतं..पाचव्या दिवशी त्याने नेहेमीप्रमाणे सकाळी फोन केला, पण फोन बंदच होता..घरी जाऊन आला तर तिथेही कुलुपच होतं..

आता मात्र तो पुरता हैराण झाला होता..राग, काळजी, अस्वस्थता ह्या सगळ्यांच्या मिश्रणाने त्याची अवस्था फारच बिकट झाली होती..त्याने घरी येऊन स्वतःला कोंडून घेतलं..त्या दिवशी त्याने काहीच खाल्लं नाही..आधीच अशक्त झालेल्या त्याच्या देहाला हे सहन झालं नाही...

घरातल्यांना काही कळेना..त्याच्या मित्रांना विचारलं पण कोणी काही सांगेना..शेवटी अशक्तपणा येऊन दुसऱ्या दिवशी तो बेशुद्ध पडला..त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं..तेव्हामात्र घरच्यांनी सगळ्या मित्रांना बोलावून खडसावून विचारलं आणि त्यांना नीरजाबद्दल खरं सांगावं लागलं…
घरच्यांचा विश्वास बसेना...
इतक्यात विहानला शुद्ध आली..
आणि…आणि त्याचा क्षीण आवाज कानावर पडला…

'आदू……
अदिती…..'

क्रमशः

- कांचन लेले

नातं.. (भाग २)

भाग २..

'Hello..? कुठे तंद्री लागली आहे साहेब..? थंड होईल ना भाजी..टूट पडो!' ..दोघांनी पावभाजी फस्त केली आणि निघाले..
'चल मी निघते..उद्या कॉलेजला भेटू..'
'अगं मी येतो ना तुला सोडायला..'
'नको रे..इतका काही उशीर नाही झालाय..मला सवय आहे..'
'मला आत्ता काही काम नाहीये..आणि तेवढीच तुला कंपनी..!'
विहानने हट्टच केला..मग नीरजानेही ऐकलं त्याचं..तिला त्याचा एवढा आग्रह थोडा विचित्र वाटला पण तिने तितकं सिरियसली घेतलं नाही..
विहान गप्पा मारता मारता नीरजाच्या आवडी-निवडी, शाळा,
घरचे इ. बऱ्याच विषयांची माहिती काढून घेत होता..
आणि ते तिच्या घरापाशी पोहोचले..ती त्याला bye म्हणून निघाली..तो मात्र थोडा वेळ तिथेच रेंगाळला…
दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनी नीरजाला आणि मित्रांनी विहानला खोपच्यात घेतलं…पण दोघांकडूनही निराशाच पदरी पडली..! 

पण त्या दिवसानंतर विहानचं वागणं मात्र बदलत चाललं होतं..
एरवी जोडप्यांच्या ग्रुपमध्ये बोर होतं असं म्हणणारा विहान आता सारखा ग्रुप बरोबर दिसू लागला..
काही दिवसांनी सगळ्यांना कॉलेजकडून स्टडी लिव्ह मिळाली...त्यामुळे कॅन्टीन आणि लायब्ररी दोन्हीकडे जास्ती वेळ जाऊ लागला..
वेगवेगळ्या वर्गात असल्याने आधी कमी होणाऱ्या भेटी आता खूप वाढल्या...दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती..

नीरजा त्याला चांगला मित्रच मानायची..पण ग्रुपमध्ये वेगळेच वारे वहात होते!
आता विहानचा जवळपास जोकर झाला होता…म्हणजे 'ग्रुपचा जोकर' अशीच त्याची ओळख झाली होती..आला रे आला की सगळ्यांना हसवायला सुरवात करायचा ते अगदी सगळे 'आता बास' म्हणेपर्यंत हसवायचा..त्याचा स्वभावच होता तो..पण अलिकडे त्या स्वभावाला जास्तीच उधाण आलं होतं..!
नीरजाचं खळखळून हसणं त्याला खूप आवडायचं…ती हसायला लागली की एकटक तिच्याकडे बघत हरवून जायचा..

इतर मित्रमैत्रिणी हा तिच्या प्रेमात पडला असं वाटून प्रोत्साहनच देऊ लागले..तो आला की नकळत इतर सगळ्यांची मिश्किल नजरानजर होऊ लागली..
त्याला मात्र या कशाचाच गंध नव्हता..
तो आपल्याच जगात होता..जे जग आता नीरजाभोवती फिरत होतं..

आणि तिला…?
सुरवातीला तिला काही विशेष नाही वाटलं..
नंतर ती त्याच्यावर लक्ष ठेऊन असायची..त्याचं तिच्याकडे एकटक बघणं तिला खटकू लागलं..त्याच्या डोळ्यात तिला नेहेमी काहीतरी वेगळंच दिसायचं..सगळे चिडवत असले तरी तिला खात्री होती की हे काही प्रेम नाही…
तिची खूप घुसमट होऊ लागली.. आणि इकडे
विहान मात्र दिवसेंदिवस नीरजाबाबत पझेसिव्ह होत होता..
ती त्याला टाळायचा प्रयत्न करायची पण हा कसंही करुन तिला भेटायचाच..
एक दिवस असहाय्य होऊन तिने प्रीतीला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला हे सांगितलं कि काहीतरी गडबड आहे..पण प्रीतीने हसून त्यावर तिलाच ऐकवलं कि विहान तिच्या प्रेमात आहे एवढीच गडबड आहे!
नीरजाने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला की हे प्रेम नाही..पण प्रितीने तिलाच वेड्यात काढलं...
नीरजाला आता मात्र टेन्शन येऊ लागलं होतं..

तिचं हसणं विरुन गेलं होतं..सांगायचा प्रयत्न केला तरी ऐकणारं कोणी नव्हतं..घरी सांगितलं तर विहानचं काही खरं नव्हतं..पण तिला तसं करायचं नव्हतं..कारण तो तिला तसा काहीच त्रास देत नव्हता..तिच्यापाठी असला तरी flirt करत नव्हता हे तिला जाणवत होतं...त्याचा भाभडेपणा जाणवत होता…पण मग भानगड काय होती..? का तो असा विचित्र वागत होता..?
तिला काहीच कळेना...

क्रमशः

-कांचन लेले

नातं.. (भाग १)

भाग १

विहानला आज त्यांची कॉलेजमधली, मित्रांनी घडवून आणलेली पहिली भेट आठवत होती..
त्याने शेवटच्या वर्षात कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली होती..पण त्याच्या खुशमस्कऱ्या स्वभावामुळे मुलांनी त्याला लगेच आपलंसं केलं होतं..त्याच्या मित्रांचा आणि आता त्यांच्या खास मैत्रिणींचा असा एक ग्रुप होता..
पहिल्या दोन वर्षात जोड्या जुळल्या होत्या..आणि त्यांच्या भल्या मोठ्या ग्रुप मध्ये एकट्या असणाऱ्या नीरजाबरोबर आता विहानची भर पडली होती...

नीरजा..दिसायला देखणी..टॉम बॉय म्हणतात तशी रफ अँड टफ असणारी...
मैत्रिणींनी चिडवले तर म्हणायची काय घाई लागलेली आहे तुम्हाला…? कॉलेज लाईफ एन्जॉय करुदे ना सुखाने…मग प्रेम करायला आयुष्य पडलं आहे..!
आणि इकडे विहान होता मित्रांना सरळच उडवून लावायचा..
प्रेम-बिम सब झूठ है असं त्याचं स्पष्टच मत होतं...!

तरी आता मित्र म्हणजे नाही म्हणेल तेच करायचं असा अलिखित नियमच असतो ना..!
एक दिवस ह्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी कट करुन दोघांना एकटं पाडायचं ठरवलं..सगळे भेटले आणि जोड्यांनी काढता पाय घेतला..उरले फक्त विहान आणि नीरजा..तसे ते भेटले होते आधी त्यामुळे जुजबी ओळख होती…पण भला मोठ्ठा ग्रुप असल्याने कधी दोघांचीच अशी भेट झालीच नव्हती..आणि आज तर त्यांना प्रेमात पाडण्यासाठी म्हणून भेटवलं होतं..!

दोघांनाही चांगलंच माहित होतं की त्यांना मुद्दाम असं एकटं पाडलं आहे..एक मिनिटभर असंच अवघडल्या शांततेत, इकडे तिकडे बघण्यात गेलं..आणि दोघांची नजरानजर झाली..आणि..आणि.. दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला..!
दोघेही खूप हसू लागले…पण दुसऱ्या मिनिटाला विहान मात्र नीरजाकडे बघतच राहिला..खळखळून हसत होती ती...
शेवटी हसणं आवरतं घेऊन निरजानेच विचारलं
'निघूया…?'
त्यानेही सहज हो म्हणून टाकलं..आणि नंतर मात्र त्याला त्याचा पश्चाताप झाला..शेवटी दोघे बाहेर पडणार इतक्यात शक्कल करुन विहान म्हणाला 'आलोच आहोत तर एक पाव भाजी बनती है यार..!..खूप ऐकलंय इथल्या पाव भाजी बद्दल..पण..'
'काय…? तू अजून इथली पावभाजी नाही खाल्लीस…?' त्याला मधेच तोडत नीरजाने प्रश्न केला!
'हो ना गं..म्हणूनच…खाऊया..?'
'चल..मला फारशी भूक नाही पण वन बाय टू सांगू..चालेल..?'
'धावेल..!'
बटर पावभाजीची खास ऑर्डर दिली गेली..ती येईपर्यंत गप्पा रंगल्या..विहान किस्से-विनोद सांगत होता…नीरजा खळखळून हसत होती…विहान तिच्या हसण्याला डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होता..
पावभाजी आली…त्यावरचा बटरचा थर विरघळू लागला..अगदी विहानचं मन विरघळलं...
तस्साच…

क्रमशः

-कांचन लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...