Showing posts with label Film Review. Show all posts
Showing posts with label Film Review. Show all posts

Saturday, 24 June 2023

Butterfly.. एक तरल कथा!

Fly like a butterfly, Sting like a bee!! 
Butterfly ही मेघाच्या आयुष्याची कथा! खरंतर अशा अनेक मेघा आपल्या आसपास असतात..कधीकधी आपणच मेघा असतो.. कधी तिऱ्हाईत म्हणून तिला बघत असतो!

पण तीच कथा 80 mm च्या स्क्रिन वर दिसू शकेल हे कळायला नजरच लागते! आणि वेलणकर भगिनींना ते करेक्ट जमलेलं आहे!

एक साधी सोपी कथा घेऊन त्या भोवती मोजक्या पात्रांची गुंफण करुन सरळ सोप्या पद्धतीने केलेली कथेची मांडणी मनाला भिडून जाते.. एक दोन ठिकाणी गोष्टी खूप predictable, किंचित अति रंजित आणि सिरीयल type वाटतात. एक दोन scenes मधे अरे असं कसं झालं असंही वाटून जातं, पण कदाचित ती माध्यमाची गरज असू शकते. संगीत सुद्धा छान हलकं फुलकं झालं आहे..विशेषतः शेवटच्या sequence मधली कविता मनात रुंजी घालते..
पटकथा आणि संवाद सुंदर जमले आहेत. उगाच गृहिणीचं दुःख मांडणारं स्वगत वगैरे कुठेही येत नाही..या उलट लहान लहान पण अतिशय आशयघन संवाद उत्तम गुंफले आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतात. काही ठिकाणी खूप shake होणारा कॅमेरा मात्र त्रासदायक वाटतो..त्यामागचं कारण लक्षात आलं नाही..ट्रेलर मधे दिसलेल्या बऱ्याच गोष्टी चित्रपटात मात्र दिसल्या नाहीत..
बाकी दिग्दर्शनाच्या दृष्टीने पदार्पणात एक अतिशय सुंदर कलाकृती घेऊन मीरा वेलणकर has nailed it!
अनेक ठिकाणी संवाद असू शकले असते पण ते टाळून फक्त कायिक अभिनयातून जे काही काढून घेतलं आहे कलाकारांकडून ते अप्रतिम आहे! एका सीन मधे नवरा बायको भांडत असताना येणारा सटल लाल backlight..कल्पनाच amazing आहे! नायिकेला बाकावर बसल्यावर झोप लागते आणि जाग येते तेव्हा पहिलं हबकून तिने आपल्या पिशव्या जवळ घेणं ही इतकी साधी गोष्ट पण ती मध्यमवर्गीय गृहिणीचं character इतकं चपखल उभं करते!

महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर, अभिजित साटम, बालकलाकार राधा, सोनिया परचुरे, नायिकेच्या मैत्रिणी आणि घरात कामाला येणारी बाई आssणि मधुरा वेलणकर सगळ्यांचीच कामं सुरेख जमली आहेत!

महेश मांजरेकर हे फक्त आवाजाच्या जोरावर सुद्धा बाजी मारु शकतात! काय तो आवाज..काय त्यातला माज..शोभतोच त्यांना! दुसरं कुणी हा रोल करु शकलं असतं असं वाटत नाही.
फक्त एक फार उत्तम झालं, ते म्हणजे प्रोमोशनचा लुक चित्रपटात नाहीये! हुश्श...

 प्रदीप वेलणकरांचा अभिनय नेहेमीप्रमाणेच अगदी स ह ज
...अभिजीत साटम comes as a surprise! आणि character ला अगदी चपखल बसणारं कास्टिंग..साधा सुंदर अभिनय करुन जातात. सोनिया परचुरेंनी सुद्धा character छान पकडलं आहे पण नक्कीच आणखी चांगलं वठवता आलं असतं! लहानग्या राधा धारणेचा presence खूपच सुखद आहे..अतिशय निरागस आणि गोड दिसून सुंदर अभिनय केला आहे..

आणि...

चित्रपट सुरु होतो आणि कानावर पडायला लागते मुंबई मिश्रित कोल्हापूर तडका मराठी! लहेजा सुंदर पकडला आहे..
आणि संपूर्ण चित्रपटात मधुरा वेलणकरांचा अभिनय is a treat to the eyes!! इतके बारकावे टिपले आहेत आणि फक्त चेहऱ्यावरुन दाखवले आहेत की सशक्त अभिनय म्हणजे काय हे अगदीच जाणवेल. महेश मांजरेकर जेव्हा विचारतात खेळणार का तेव्हा पटकन काहीतरीच काय म्हणत त्या टायमिंग मधे पात्राचा साधेपणा इतका सहज दाखवला आहे.. आणि चित्रपटातली  सगळ्यात सुंदर २ सेकंद म्हणजे - वाढलेला नाष्टा न करता नवरा बाहेर पडतो तेव्हाचे चेहऱ्यावरचे दाखवलेले भाव हे लाजवाब होते! थोडक्यात, प्रेमात पाडणारा अभिनय!

एकूणच अगदी साधी, आपल्या घरातली वाटावी अशी गोष्ट... कुठेही भपका नाही, अतिरंजित नाही आणि उगाच दुःख उगाळत बसणं नाही. एक सुंदर सकारात्मक कथा जी आपल्याला निखळ आनंद देते आणि नक्कीच विचार करायला लावते! नेमकी कसली कथा..? हे नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघा..Butterfly!! :)

~ राधा ~
©कांचन लेले

Sunday, 22 May 2022

चंद्रमुखी - Film Review!


चंद्रमुखी!


नावच इतकं सौंदर्यपूर्ण आहे तर चित्रपट त्या नावाला जागेल असा करणं हे खूप मोठं आवाहन असलं पाहिजे!
प्रसाद ओक हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा आहे हे त्याने सिद्ध केलं आहे! एक सर्वांगसुंदर चित्रपट असं चंद्रमुखीला म्हंटलं तरी ते कमीच पडेल.

सुरवातीलाच सांगते की नैतिकतेचे निकष घेऊन सिनेमागृहात जाऊ नका. विषयाला कुठल्याही पूर्वग्रहातून बघू नका. तरच ती कलाकृती म्हणून आपल्याला भिडेल.
खरंतर नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारुन केलेल्या प्रेमाची ही कथा. 
पण ते झुगारणं असं आहे की त्यात आधीच्या प्रेमाचा अपमान नाही, उलट एक अपराधी भावना आहे, द्विधा मनस्थिती आहे, या आधी हे आयुष्यात का नाही झालं याची सल आहे, यापुढे हे थांबवलं पाहिजे असं म्हणणारी बुद्धी आणि त्या बुद्धिपलीकडे जाऊन प्रामाणिक भावनेला दिलेली साद आहे..समज गैरसमजातून सुरू झालेल्या नात्याचा समजुतीपर्यंतचा प्रवास आहे. निरपेक्षता नाही, पण अपेक्षा ठेऊनही अपेक्षाभंगला स्वीकारण्याची प्रेमाची ताकद आहे!
आणखी काय आणि किती वर्णावं!

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित हा चित्रपट. सगळ्यात आधी कौतुक या गोष्टीचं की प्रोमोशन करण्यात कुठेही कसूर सोडलेली नाही. जे लोक मराठी सिनेमापासून कोसो दूर आहेत त्यांना सुद्धा एकदा का होईना पोस्टर, गाणं, जाहिरात कुठे ना कुठे दिसलीच असेल. अक्षय बरदापुरकर व त्यांच्या सह निर्मात्यांचं विशेष कौतुक. अनेक मराठी सिनेमे उत्कृष्ट असूनही ते पोहोचत नाहीत, किंबहुना पोहोचवले जात नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण बजेट असू शकतं त्यामुळे निर्माता चांगला असणं ही खूप मोठी गरज आहे.

चित्रपटाकडे येताना, पहिल्याच सिन मधले मृण्मयी देशपांडेंच्या चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थ करुन जातात. आणि तिथून जागृत होते ती रसिकांची उत्सुकता की हे का? कशामुळे?. जरी विषय बऱ्यापैकी माहीत असला, तरीही आपल्या लोकांची खोलात शिरण्याची सवय अगदी अचूक हेरली आहे ती पटकथेत.

संजय मेमाणे यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी अक्षरशः डोळे दिपवून टाकते. इतका ताकदीचा सिनेमॅटोग्राफर आपल्या इंडस्ट्रीला लाभला हे भाग्यच म्हणायचं. प्रत्येक फ्रेम, त्यातला appealing लाईट, चंद्रमुखीच्या रंगमंदिरातील सीन्स मध्ये काळोख आणि दिव्यांचं साधलेलं अप्रतिम समीकरण..काय आणि किती वर्णावं?
प्रत्येक सिन घेऊन त्यावर एक एक परिच्छेद लिहिता येईल!
त्याचबरोबर एडिटरचं सुद्धा कौतुक, काही काही transitions इतक्या सुंदर अलगद येऊन जातात की दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या दोघांचं कास्टिंग तसं बघायला गेलं तर रिस्की होतं. पण म्हणतात ना, गुरुला शिष्य बरोब्बर हेरता येतो, तसंच दिग्दर्शकाच्या नजरेतही ती जादू असावी!
इतका सहज सुंदर काळजाला भिडणारा अभिनय असणारा चित्रपट अनेक दिवसांनी पाहिला. खरंतर मला उलट नमूद करावंसं वाटतं की फक्त काही मोजक्या ठिकाणी अभिनय केल्याचं जाणवतं, बाकी ९०% चित्रपट बघताना अभिनेते फक्त वावरले आहेत, म्हणजेच भूमिका जगले आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरु नये. 
मुख्यतः डोळ्यातून व्यक्त झालेली प्रत्येक भावना, "बाई गं" गाण्यात आणि आणखी एक दोन सीन्स मध्ये बरोब्बर एका विशिष्ट क्षणी डोळ्यात येणारं पाणी! आणि नीट बघितलं तर ते हळू हळू वाढत जाताना सहज दिसतं..त्यातून उमटणारे उत्कट भाव, आणि क्षणात शब्द बदलल्यावर पूर्ववत होऊन गाणं पुढे नेणारी अमृता मनात घर करते.
एका सिन मध्ये रस्त्यात एका टर्निंगला चंद्रमुखी कडे जावं की परत घरी जावं असा प्रश्न पडला असतानाचा आदिनाथ कोठारे आणि समीर चौघुले यांचा गाडीतील सिन आहे, त्यात आदिनाथ विचार करायला गाडी थांबवतो, आणि पुढच्या क्षणी गाडी स्टार्ट करतो तेव्हा सरळ कळतं की याने घरी परत जायचा निश्चय करुन गाडी सुरू केली आहे,  पण गाडी स्टार्ट केल्यावर गाणं लागून त्या स्वरांनी चंद्रमुखीची आठवण होऊन चेहऱ्यावरचे बदललेले भाव क्षणात सांगतात की त्याचा विचार बदलला आहे आणि तो गाडी सुरू करुन तिच्याकडे जातो...अक्षरशः ४-५ सेकंदांचा सिन आहे, पण तो इतका सुंदर अभिनित केला आहे की कायम लक्षात राहील!
मृण्मयी देशपांडे बद्दल काय लिहावं? व्याकुळता आणि प्रेम याच्या मध्यावर उभं असलेलं पात्र "डॉली" यावर तिने छाप उमटवली आहे.

याचबरोबर मोहन आगाशे, समीर चौघुले, प्राजक्ता माळी, राजेंद्र शिरसाटकर, वंदना वाकनिस प्रत्येकाने तितक्याच तोडीचा अभिनय केलेला आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा यांचा सुद्धा ही पात्र वठण्यात महत्वाचा वाटा आहे.

कथा व पटकथा याकडे येताना, चिन्मय मांडलेकर यांचं सर्वोत्कृष्ट लिखाण असलेला सिनेमा असं नक्कीच म्हणता येईल.
प्रत्येक डायलॉग टपोऱ्या थेंबांसारखा धरणीवर पडून चित्रपट
सुगंधित करुन गेलेला आहे. सुरुवातीला मी एक दोन डायलॉग लक्षात ठेवले कारण ते इतके अप्रतिम होते, म्हंटलं review मधे लिहिता येतील. पण काहिच मिनिटांनी मला लक्षात आलं तसं करायचं असेल तर जवळपास अख्खं स्क्रिप्टच द्यावं लागेल!
वैशिष्ट्य असं की उगाच भावना व्यक्त करायच्या म्हणून लांब लचक वाक्य दिलेली नाहीत. अगदी कमी संवाद, त्याला कायिक अभिनयाची साथ आणि त्यातुन उभ्या रहाणाऱ्या संवेदना! निव्वळ अप्रतिम!
चिन्मय मांडलेकर यांना त्रिवार वंदन!

मंगेश धाकडे यांनी केलेलं सुंदर पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाची शोभा वाढवतं. आणि अर्थात, केंद्रबिंदू असणारं संगीत, व ते करणारे संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरू ठाकूर यांना सलाम!
गुरू ठाकूर यांच्या शब्दांमध्ये विलक्षण ताकद आहे! आणि अजय अतुल तर या बाजाचे राजेच आहेत. गाण्याची चाल, व त्याबरोबरच केलेली सुंदर arrangement! तबल्यातील बोलांचा, तबल्याचा आणि अनेक गोष्टींचा arrangement मध्ये केलेला वापर लक्ष वेधून जातो. सर्व गायकांनीही या सांगितलं न्याय दिलेला आहे. विशेषतः श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर!

दीपाली विचारे, आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम पेलली आहे!

आता या सगळ्यात दिग्दर्शक कुठे आहे? हा प्रश्नच पडतो आणि मग लक्षात येतं की या सगळ्यात नाही, तर हे सगळं म्हणजे दिग्दर्शक आहे! 

किती सीन्स असे सांगू की जे मनात घर करुन राहिलेत! पण सांगितले तर चित्रपटाची मजा घालवण्यासारखं आहे ते.. त्यातल्या त्यात मृण्मयी देशपांडेचा एक फिशटॅन्कचा सिन! तिथे ती एका सेकंदासाठीच येते, पण असं वाटून जातं पाण्यात राहून मासा तहानलेला आहे तशी तिची झालेली अवस्था तो सिन दाखवतो आणि "घे तुझ्याच सावलीत कान्हा" या ओळीला अमृता खानविलकर वर कृष्णाच्या मूर्तीची सावली पडणारा सिन इतका भिडतो मनाला! पणत्यांची पार्श्वभूमी चित्रपट बघूनच कळेल, त्याची अधिक माहिती इथे दिली तर मजा जाईल!

एकुणात एक अतिशय balanced आणि सर्व गुणांनी बहरलेली कलाकृती. काही ठिकाणी कथा खूपच प्रेडिक्टेबल वळणं घेते आणि काही ठिकाणी अभिनय करुन त्या सीन्सची मजा थोडी कमी झाल्यासारखे वाटते. चंद्रा हे गाणं व त्याची ट्रीटमेंट वेगळी झाली असती तर आवडलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या काळात हा चित्रपट बेतलेला आहे त्याला शोभणारं गाणं चंद्रा नक्कीच नाही असं वाटून जातं. 

विश्वास पाटलांची एक अतिशय ताकदीची कादंबरी आणि त्याचं  तितक्याच ताकदीने केलेलं रुपांतर म्हणजे चंद्रमुखी आहे!

~ ©राधा उवाचं ~

- कांचन लेले

Saturday, 30 April 2022

शेर शिवराज..स्वारी अफझलखान!

शेर शिवराज...स्वारी अफझलखान!

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज (स्वारी अफजलखान)!
श्री शिवराज अष्टकातील चौथा मणी!

"अहोरात्र लाथा बुक्क्यांचा अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. कालपुरुषाचाही कानठळ्या बसल्या आssणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करित करित प्रगटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते, शिवराय!!"

चित्रपटाची सुरवात मला थेट इथे घेऊन गेली. शिवकल्याण राजा या अल्बम मध्ये शिवशाहीर बाबासाहेबांनी केलेल्या निवेदनाचा हा भाग. 
लेखकाला जर ही सुरवात इथून सुचली असेल तर त्याचं कौतुक आहे, कारण शिवशाहीरांइतकं महाराजांना कुणी वाहून घेतलेलं नाही. आणि नवीन पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर ते कौतुकास्पदच आहे. यातून लेखकाचा अभ्यास, निरीक्षण व समयसुचकता दिसून येते. 
पण जर ही सुरवात तिथून आली नसेल तर मात्र लेखकाच्या प्रतिभेचं विशेष कौतुक करावं, कारण ती थेट बाबासाहेबांच्या प्रतिभेच्या जवळ गेलेली आहे!

आता ही सुरवात सुरवात म्हणजे काय असा प्रश्न चित्रपट न बघितलेल्या लोकांना पडेल, पण त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा! आणि अगदी सहकुटुंब जाऊन बघा, कारण शिवरायांचे संस्कार पुढच्या पिढीवर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्यालासुद्धा त्या चरित्रातले अनेक बारकावे कळणं गरजेचं आहे.

गेल्या बुधवारी चित्रपट पहायचा योग आला. मधला वार आणि अगदी संध्याकाळच्या सुरवातीला शो असल्याने थेटर बऱ्यापैकी रिकामं होतं. प्राईम टाइम शो या चित्रपटाला दिलेले नाहीत याचं प्रचंड दुःख वाटतं.

पावनखिंड बघितल्यावर प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आणि अगदी लगेचच शेर शिवराज आल्याने दुधात साखर असा योग आला! काही लोकांनी असाही सूर छेडला आहे की लागोपाठ एकाच विषयावरचे किंवा एका सिरीजचे दोन चित्रपट आल्याने इंटरेस्ट वाटत नाही किंवा तोचतोचपणा येतो. पण प्रेक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पावनखिंड हा कोविड मुळे उशिरा release झाला. व त्यामुळे तो रिलीज होईपर्यंत पुढचा पिक्चर शूट करुन तयार होता म्हणून ते लागोपाठ आले. असो, तर आता चित्रपटाकडे येताना..

सुरवातीचा गोंधळ (गाणं) अगदीच मनात रुंजी घालेल असा झालेला आहे. नंतर बराच काळ ते मनात आणि डोक्यात फिरत रहातं!
 तिथून चित्रपट उत्तम गती घेतो. चिन्मय मांडलेकरांनी घेतलेलं महाराजांचं बेअरिंग प्रत्येक चित्रपटागणिक सहजसुंदर आणि परिणामकारक होताना दिसून येतं. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांची शरीरयष्टी (एक सीन वगळता) विशेष डौलदार दिसून येते!
बहिरजींच्या भूमिकेत यावेळी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर झळकत आहेत. त्यांचा अभिनय अगदी सहज आहे, पण विषेश लक्ष वेधून घेते ती त्यांच्या गालावरची खळी! हरीश दुधाडेंनी आजवर बहिर्जी या पात्राला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, की त्यांचं कास्टिंग बदलणं हे एक धाडसच म्हणावं लागेल. पण जर तुलना नाही केली, तर पात्राला न्याय दिला आहे असं म्हणता येईल.

मृणाल कुलकर्णी नेहेमीप्रमाणेच अतिशय लक्षवेधी ठरतात! पण सईबाई आणि सोयराबाई यांच्याबरोबरच्या सीन्समध्ये त्या फारच तरुण दिसतात अशी गोड तक्रार करावी लागेल!

मुकेश ऋषी यांनी साकारलेला अफझलखान आपलं रक्त उसळायला भाग पाडतो. या व्यतिरिक्त त्यांच्या अभिनयाबद्दल आणखी काहीच बोलायची गरज नाही!

वर्षा उसगावकर यांचं कास्टिंग एकदम चपखल झालेलं दिसून येतं. सईबाई राणीसाहेबांचं पात्र साकारलेल्या ईशा केसकर यांनी संपूर्णतः डोळ्यातून व्यक्त केलेला अभिनय मनात घर करुन रहातो, त्याच बरोबर माधवी निमकरांनी साकारलेल्या सोयराबाई त्याला उत्तम साथ देतात.

दीप्ती केतकरांनी दीपाईआऊ बांदल हे पात्र उत्तम साकारलं आहे. अगदी लढाईचे सीन सुद्धा सफाईदारपणे केलेले जाणवतात.

अजय पुरकर यांनी साकारलेले तान्हाजी मनात घर करुन रहातात. व सगळ्यात सुखद धक्का येतो तो म्हणजे समीर धर्माधिकारी यांनी साकारलेले कान्होजी जेधे. विशेषतः त्यांच्या costumes मध्ये  वापरलेला "इकत" कपडा अतिशय डौलदार दिसतो. आता त्या काळी इकत होतं का अशा भंपक चर्चा न केलेल्या बऱ्या. पण ते अतिशय सुंदर शोभलं आहे हे मात्र निश्चित. हेच दुसऱ्या कुठल्याही किरदाराला दिलं असतं तर ते अजिबात शोभलं नसतं हेही निश्चित!
बाकी एकूणच महाराजांचे कपडे सुद्धा अतिशय रुबाबदार आणि तरीही भपकेदार वाटत नाहीत. सर्व costumes अप्रतिम झालेले आहेत व त्याने screen presence नक्कीच अधिक सुखावह झालेला आहे यात वादच नाही.

आयुर्वेदाचार्य आणि शस्त्रकार यांची पात्र विशेष सहजसुंदर निरागस अभिनयाने नटलेली आहेत! त्या दोन्ही अभिनेत्यांचं विशेष कौतुक.

आस्ताद काळे, निखिल लांजेकर, सुश्रुत मंकणी, रोहन मंकणी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, संग्राम साळवी, विक्रम गायकवाड, अलका कुबल, बिपीन सुर्वे आणि बऱ्याच नवीन कलाकारांनीही आपली पात्र उत्तम वठवली आहेत.
अनेक अभिनेत्यांची नावं माहीत नसल्याने उल्लेख करता येत नाही त्याबद्दल माफी!
तरीही अंकित मोहन या तशा बाहेरच्या असलेल्या पण या सिरीजचा अविभाज्य भाग झालेल्या कलाकाराची कमी, तसेच हरीश दुधाडेंची कमी नक्कीच भासते!

वैभव मांगलेंनी साकारलेले गोपीनाथपंत बोकील त्यांच्या नेहेमीच्याच शैलीतील अभिनयाने व्यापले आहेत. रंजकता आणायच्या दृष्टीने मिश्किल पात्र असणं गरजेचं असलं तरीही महाराजांचे वकील असे बाष्कळ वागत असतील हे मनाला पटत नाही. मांगलेंचा अभिनय उत्तम असला तरी दिग्दर्शकाने या गोष्टीचा विचार जरुर करावा.
कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा ही पात्र सुद्धा अभिनेत्यांनी चांगली साकारली आहेत.

रवींद्र मंकणी शहाजी राजे म्हणून उत्तम शोभतात. एके काळी स्वामी मध्ये मृणाल कुलकर्णी आणि त्यांची जोडी हिट झालेली आपल्याला माहीतच आहे. पण आता परिस्थिती व वय यात फार फरक आहे. पण त्या दोघांचे यात एकत्र सीन्स नसल्याने हे कास्टिंग अगदीच उत्तम चालून गेलेलं आहे.

सुरवातीपासून आजूबाजूला कुठेही न जाता चित्रपट थेट मुद्द्यावरच येतो. गती उत्तम आहे, रटाळपणा नाही. अनेक पात्र ज्यांचा महाराजांच्या कारकिर्दीत वाटा आहे त्यांचा उल्लेख आवर्जून दिग्दर्शक करतो हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर एका बलाढ्य शत्रूला शक्तीने नाही तर युक्तीच्या बळावर शक्तीने मारलं हेच आजवर आपल्याला माहीत होतं. पण त्या युक्तीचं व्यापक रूप या चित्रपटात पहायला मिळतं. त्याचे अनेक बारकावे उत्तम रीतीने दाखवलेले आहेत. ते इथे फोडून मी spoiler देणार नाही, पण आवर्जून बघावं अशी ही विचारमांडणी आहे. 
पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी, संगीत, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा इत्यादी सगळं उत्तम प्रतीचं झालेल दिसून येतं. व cinematic quality च्या बाबतीत मराठी सिनेमा करत असलेल्या प्रगतीबद्दल विशेष अभिमान वाटतो.

चित्रपटात काही प्रमाणात VFX चा वापर केलेला दिसून येतो. काही ठिकाणी तो उत्तम साधला आहे, तर काही ठिकाणी अनावश्यक वाटतो. मधे बहिरजींच्या तोंडी असलेलं गाणं चित्रपटाची लय खेचतंय असं वाटून गेलं, थोडं अनावश्यक वाटलं पण रंजकतेच्या गणितानुसर ते ठेवलं असल्याची शक्यता आहे. सईबाई राणीसाहेब गेल्याची बातमी काळतानाचा सीन थोडा कमी परिणामकारक झाल्यासारखं वाटतं. काही पुस्तकांमध्ये त्याचं नुसतं वर्णन इतकं अंगावर येणारं केलेलं आहे की प्रत्यक्ष अभिनयात तो दिसत असेल तर साहजिकपणे अपेक्षा खूप उंचावल्या जातात. महाराज तलवारबाजी करतानाचा एक bare body सीन आहे त्यात शरीर पिळदार नसलेलं दिसल्याने परिणाम किंचित कमी झालेला वाटतो. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णींच्या सीन ने शेवट झाला असता तर तो आणखी उंचीवर गेला असता असंही जाणवलं. 
या काही गोष्टी वगळता चित्रपट सर्वांगसुंदर जाहला आहे हे माझं वैयक्तिक मत आहे!

त्याचबरोबर शेवटी नवीन चित्रपटाची घोषणा करणं हा प्रकार मस्त आहे! आग्रा स्वारीची आम्ही आतुरतेने वाट बघू!

या सिरीजचा प्रत्येक चित्रपट आपण सर्वांनी पाहणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन पिढीला चौथी आणि सातवीच्या इतिहासातील पुस्तकांपलिकडे महाराज कळले पाहिजेत. आणि चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून जर ते कळत असतील तर मुलं सुद्धा आवडीने त्याकडे वळल्याशिवाय रहाणार नाहीत. तूर्तास इतकेच!

जय शिवराय!

- राधा
©कांचन लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...