Showing posts with label प्रवासवर्णन!. Show all posts
Showing posts with label प्रवासवर्णन!. Show all posts

Tuesday, 9 February 2021

ऋषिकेश - मसुरी - भाग ६!

झोपेतून उठलो तर काय?!

बातम्या, whatsapp मेसेज आणि शेवटी घरुन आलेला फोन!

झालं असं होतं की दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना कोव्हिड टेस्ट बंधनकारक केली होती. आधी आम्हाला वाटत होतं फ्लाईट ने जाणाऱ्यांसाठीच आहे ते, पण नाही..ट्रेन, फ्लाईट किंवा अगदी by road जाणाऱ्यांसाठी सुद्धा तोच नियम केलेला. त्याशिवाय आमच्या रुम मधली एक मुलगी म्हणाली ती दुसऱ्या दिवशी देहरादुनला जाऊन टेस्ट करुन घेणार आहे म्हणून..
आता ती टेस्ट करण्यापेक्षा देहरादुनला जाऊन यायचा खर्च तिप्पट होणार होता. पुढचा एकच दिवस मसुरीत होतो, तिसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडून, फिरून मग रात्रीची ट्रेन दिल्लीला जायला होती. मग तिथे माझा मित्र भेटणार होतो जो जवळजवळ दोन वर्षे भेटला नव्हता!! मग दिवस काढून रात्री तिथून पुढे दिल्ली-मुंबई ट्रेन..

आता सगळाच गोंधळ झालेला..
डोक्यात विचारांचा गोंधळ..प्रवासाचा थकवा..त्यात उपास.. आणि मसुरीच्या एका डोंगराळ कोपऱ्यात असल्याने कुठलीही साधनं नाहीत..

अशावेळी खरं एकतर प्रचंड चिडचिड होऊ शकते, किंवा एकदम depressed वाटू शकतं..

पण आम्ही pros and cons बघायचं ठरवलं!

जर टेस्ट करायची झाली तर देहरादूनशिवाय पर्याय नव्हता. आणि टेस्ट करायला तिथवर जायचं आणि अख्खा दिवस खर्च करायचा असेल तर परत येण्यात काही पॉईंट नव्हता. म्हणजे उद्याचं बुकिंग पाण्यात घालून मसुरी न बघता उद्याच checkout करुन देहरादूनला जाऊन तिथेच रहायची व्यवस्था करायची आणि मग पुढे आधीसारखं. म्हणजे जायचा, रहायचा आणि टेस्टचा खर्च वाढणार, मसुरी अनुभवताच येणार नाही आणि पुन्हा ती टेस्ट आहे त्याचं टेन्शन! म्हणजे ऋषीकेशला एक मुलगा भेटला तो म्हणाला होता, टेस्ट करा ठीक आहे पण केल्यावर positive आली तर काय करणार आहात!
ते होतंच डोक्यात..इथल्या मुलींनी बाकीचे किस्से पण सांगितले की कसे पैसे दिल्यावर negative टेस्ट येते, नाहीतर positive येते वगैरे वगैरे..त्यामुळे डोक्यात सगळं कॉकटेल!

आता दुसरा पर्याय..म्हणजे डेहरादून-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई ट्रेन कॅन्सल करुन सरळ आलो तसं परतीचं  देहरादून-मुंबई फ्लाईट बुक करायचं! टेस्ट करायची गरज नाही आणि प्रवास सुद्धा थोडक्यात होईल! पssण! या सगळ्या गोंधळामुळे जे काही फ्लाईटचे दर आकाशात गेलेले, त्यामुळे धाडस होईना..
त्यात जायच्या तारखांवर दिवस होते शनिवार-रविवार..त्यामुळे तर किंमत आणखीनच जास्ती!

डोळे बंद केले..

एकीकडे कोव्हिड टेस्ट....दुरीकडे...गंगा.... 

झालं पक्कं, सोमवारी पहाटेची फ्लाईट त्यातल्यात्यात स्वस्त होती...ठरवली!

पटकन एक दोन साईट शोधल्या ज्यावरून थोडा डिस्काउंट मिळू शकेल..coupons शोधली..आणि बुकिंग करुन टाकलं!

ते कन्फर्म झाल्या झाल्या ट्रेन कॅन्सल केल्या..

आता एवढाच प्रश्न होता, की शनिवारी सकाळी check out होतं इथून..शनिवारी रात्री ट्रेन असल्याने मी त्या दिवशीचं बुकिंग न करता ते पैसे वाचवलेले! त्यामुळे आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हातात होते..त्याची रहायची व्यवस्था करणं गरजेचं होतं!
इथे दोन पर्याय होते खरं..एकतर मुळात मसुरीत रहायचं की नाही..इथून सुरवात..रहायचं तर इथेच रहायचं की वर जिथे सगळे पॉईंट आहेत तिकडे रहायचं..
पण या सगळ्या विचारांना बगल देऊन आम्ही मसुरीवर पाणी डोडून सरळ ऋषिकेश निवडलं!
तिकडे एक बजेट मध्ये बसणारं आणि चांगलं रेटिंग असलेलं हॉटेल बघितलं..आणि शनिवार-रविवार साठी बुकिंग करुन टाकलं!! विशेष म्हणजे गेल्या वेळी आम्ही राम झुल्याच्या अलिकडे राहिलो होतो...त्यामुळे या वेळी लक्ष्मण झुल्याच्या पलीकडे रहायचं ठरवलं!

हा सगळा गोंधळ होईस्तोवर रात्र झालेली..बाहेरच पडता आलं नव्हतं..आणि आता बाहेर पडणं म्हणजे गोठून जाण्यासारखं होतं! त्यामुळे आम्ही कसेबसे खाली जाऊन थोडंसं खाऊन आणि गरम पाणी पिऊन आलो..वरती आलो, ब्लॅंकेट घेऊन पसरलो आणि एक पिच्चर बघितला..आणि गप्पा मारुन झोपलो!

कुठल्याही ट्रिपला किंवा काहीही कारणासाठी जेव्हा आपण घरापासून लांब जातो, तेव्हा एक रक्कम emergency साठी बाजूला ठेवणं अतिशय गरजेचं असतं! ते केल्यामुळे फक्त पैसे जास्ती गेल्याचं दुःख झालं, भार नाही आला..

तssर! दुसऱ्या दिवशी उठलो..प्रचंड भूक लागलेली!
सगळ्यात आधी खाली जाऊन मस्त आलू पराठा, मॅग्गी, हॉट चॉकलेट आणि चहा! असं सगळं खाल्लं...काल आलो तेव्हा दमल्यामुळे आणि प्रवासामुळे बाकी काहीही दिसलच नव्हतं..सरळ खोलीत जाऊन थडकलो..मग सगळा गोंधळ उरकून रात्रीच खाली उतरलो होतो, त्यामुळे ह्या जागेचं खरं सौंदर्य आत्ताच बघत होतो!
खाऊन झालं, पोटात गेल्याने जरा थंडी वाजायची कमी झाली...मग मस्त हातात कप घेऊन आम्ही बाहेरच्या थंडीत येऊन बसलो!
एक विशेष म्हणजे, काल आल्यापासून वाहत्या पाण्याचा आवाज येत होता..त्याचं रहस्य आज उलगडलं!
इथे कॅफेच्या शेजारीच वाहत्या पाण्याचा झरा आहे...ज्याचा खूप मस्त आवाज सतत येत रहातो... थोडं खाली गेलं की झोस्टेल ने विशेष बांधलेलं "Stream House" आहे...couples साठी अगदी खास!
कॅफेच्या मागे एक खास छोटंसं घर बांधलं आहे..अगदी वेगळीच style आहे त्याची..एकदम हटके!
त्यांनतर तिथे एक मस्त ट्री हाऊस सुद्धा आहे!! 
कॅफेखाली कॉमन रूम आहे..तिकडे सुंदर झोपाळा आहे...आणि जुन्या लाकडाचा वापर करुन अतिशय सुंदर सुशोभित केली आहे!
बाहेर आवारात बरीच जागा मोकळी ठेवली आहे...सगळीकडे दगडातून पायऱ्या केल्या आहेत...हा मसुरीच्या थंडीतला तळपता सूर्य! समोर तिन्ही बाजूला डोंगर..सतत येणारा वाहत्या पाण्याचा आवाज..कडक थंडी, मस्त ऊन..आणि अशी कमाल जागा!!
कशाला कुठे जावंसं वाटतय..?
आम्ही त्या दिवशी कुठेच गेलो नाही..थोड्या वेळाने सगळं फिरून वर गेलो..अंघोळी केल्या..मग छान गप्पा मारल्या..फिरण्यातून काय काय शिकता येतं, मैत्री, करियर, आयुष्य कसं जगावं आणि काय काय!
काही काही वेळेला ह्या गप्पा होणं सुद्धा खूप गरजेचं असतं.. गेले दहा महिने बाहेरच्यांशी प्रत्यक्ष संवाद असा झालाच नव्हता..आणि नाही म्हंटलं तरी अनेक गोष्टी या काळाने बदलून टाकल्या होत्या...त्यामुळे जसं मुंबईतून बाहेर पडल्यावर हवापालट झाल्याने शरीराला बरं वाटलं, तसंच साचलेलं विचार वाहू लागल्याने शेवाळलेल्या मनाची वाहती नदी झाली होती! (आमच्या मागच्या पाटीवर काय लिहिलंय ओळखा बरं..?!)
मग छान गॅलरीत बसलो, आणि सूर्य हळूहळू डोंगरामागे जाताना वातावरणात होणारा बदल अनुभवू शकलो! आधी पूर्ण ऊन, कडकडीत..मग अक्षरशः सूर्य डोंगरामागे गेल्यावर एकदम थंडी..म्हणजे आपण वाळूत उभे असतो, आणि अचानक लाट येते तेव्हा कसं भसकन गार गार वाटतं..?! अगदी तसंच..
मग काय बाहेर थांबतोय?! पुन्हा आत पळालो..मग एक सिरीज बघितली..आणि जेवायला गेलो...मग जेवण झाल्यावर पुन्हा वर गेलो..आणि झोपलो!
थोडक्यात काय तर आम्ही फिरायला आल्यावर करतात ते काहीही आज केलं नाही! और उसका गम भी नही!
आमच्या टॅक्सीवाल्या अंकलला गाडी पाठवायला सांगितलेली..तो म्हणाला त्याचा भाऊ येईल..त्यामुळे सकाळी लवकर निघायचं होतं.. गप गुमान जाऊन झोपलो!
क्रमशः

Wednesday, 20 January 2021

ऋषिकेश-मसूरी - भाग ४!

आमचा adventourous दिवस उजाडला आणि आम्ही तयारीला लागलो. सकाळी ऑफिसचं थोडं काम केलं. नाश्ता न करता एक एक प्रोटीन बार खाल्ला आणि कमीत कमीत सामान वॉटरप्रूफ छोट्या बॅग मध्ये घेऊन राफ्टिंग साठी निघालो!
शक्यतो dryfit कपडे घालावे आणि पायात सँडल घालाव्या. मी चपला घातलेल्या ज्या नंतर गंगार्पण झाल्या!

आम्ही अनेक लोकांना विचारून नंतर आमच्या झॉस्टेलच्या अगदी जवळच असलेल्या माणसाकडे अवघ्या ४०० रुपयात बुकिंग केलं! झॉस्टेल मध्ये भेटलेल्या काही मुलांकडून त्याची माहिती मिळाली होती.
सगळ्यात मोठा फायदा हा होता की तो इथून पिक-अप आणि इथेच ड्रॉप देणार होता त्यामुळे ओलेत्याने ऋषिकेश फिरायची वेळ येणार नव्हती!
आम्ही गेलो आणि ऑफिसमध्ये बसलो.
 त्याला विचारलं आणखी किती लोक आहेत तर तो म्हणाला आज वातावरण खूप थंड असल्याने दोघांनी बुकिंग कॅन्सल केलं आहे, त्यामुळे तुम्हीच दोघी आहात!
आता आली पंचाईत!
आम्हाला दुसऱ्या दिवशी मसुरीसाठी निघायचं होतं त्यामुळे पोस्टपोन होणं अवघड होतं, आमच्याबरोबर झॉस्टेल मध्ये असलेल्या मुलांनी दुसऱ्या दिवशीचं बुकिंग केलेलं त्यामुळे तो आम्हाला सांगत होता की तुम्ही उद्या त्यांच्याबरोबरच करा. आम्हीही जरा विचार करत होतो, पण म्हंटलं आधी आजची पूर्ण शक्यता पडताळून बघू म्हणून जरा त्याला - मग तुम्ही आधी कळवायला पाहिजे होतंत, आम्हाला आजच करायचंय, उद्या जमणार नाही - असं जरा कडक स्वरात सांगितलं.
मग त्याने दोन ठिकाणी फोन केला आणि आणखी दोघा जणांची व्यवस्था केली!
आता आम्ही एकूण चार जण होतो!
दोघींनीच जायला नकार देण्याचं कारण असं की एकतर आम्हाला दोघींनाही पोहता येत नाही आणि पाण्याची भीती वाटते. दुसरं महत्वाचं म्हणजे मी वाचलं होतं त्याप्रमाणे जितके जास्ती लोक, तितका चांगला बॅलन्स आणि पँडल करायला सपोर्ट मिळतो. आणि पुन्हा सेफ्टी हा मुद्दा असतोच दोघी मुली असताना.
त्यामुळे थोडं ठामपणेच त्याला सांगितलं आणि काम झालं!
मग एक माणुस मोठी जीप घेऊन आला आणि त्याच्या टपावर असलेल्या राफ्टचं दर्शन झालं!
मग ती दोन माणसं, आम्ही आणि राफ्ट असा प्रवास सुरु झाला!
मधे त्या दोन मुलांना घ्यायचं होतं, त्यांना घेतलं आणि गाडी पुढे जाऊ लागली!
बोलण्यावरुन कळलं की ते दोघे सुद्धा मराठी आहेत. मग आम्ही दोघी आणि त्या दोघांच्या आपापसात बोलण्यात दिल्लीहुन गेलं तर covid टेस्ट बंधनकारक आहे ह्याबद्दल चर्चा होताच आम्ही बोलायला लागलो. तेही मुंबईचेच होते, त्यांचीही फ्लाईट दिल्लीहून होती जी त्यांनी नुकतीच कॅन्सल केलेली! 
किंचित दडपण आलं, पण म्हंटलं आजचं आधी हे नीट होउदे, त्यातून पार झालो तर मुंबईचं दर्शन नाहीतर! असो!
मध्ये आमच्या गाईडला घेतलं..मुंबईला गल्लीच्या तोंडावर सिगारेटी फुकत केस रंगवलेली अती स्टायलिश तरी कुपोषित दिसणारी पोरं असतात तसा हा माणूस!
पोहोचेपर्यंत कळलं नाही की हा गाईड आहे!
मग आम्ही शिवपुरीला पोहोचलो, इथून आमच्या १६ किलोमीटर प्रवासाला सुरवात होणार होती.

थोडी राफ्टिंग बद्दल माहिती अशी की हे चार वेगवेगळ्या टप्प्यात करता येतं. ९, १६, २४ आणि ३५ किलोमीटर असं. अगदी तासभरापासून दोन दिवसांपर्यंत!
राफ्टिंग शिवायही अनेक adventure स्पोर्ट ऋषिकेश मध्ये करता येतात. बंजी जम्पिंग, ग्रेट स्विंग वगैरे. 
काही ऑर्गनाईझर एका पेक्षा जास्ती adventures चे कॉम्बो पॅकेज सुद्धा देतात! 

तर आम्ही तिथे जमलो. आमच्याकडून एक डिक्लरेशन फॉर्म भरुन घेतला गेला. त्या दोन मुलांनी wet suit घातले! आम्ही मात्र कडाक्याच्या थंडीत खतरो के खिलाडी! Tshirt आणि पॅन्ट घालून ते अतिशय सुगंधी लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घालून तयार झालो! 
आमची बॅग आमच्या गाईड कडे दिली राफ्ट मधल्या dry bag मध्ये ठेवायला आणि खाली उतरलो!
आमच्याबरोबर आणखी ३ मोठे ग्रुप्स होते, सगळ्यांकडे प्रत्येकी ६-८ लोक. त्यातल्या एका गाईडने सगळ्या सूचना दिल्या. बऱ्याच लोकांनी शंका निरसन केलं, त्यात राफ्ट उलटण्याचे चान्स किती हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न! त्यात पोहता येत नसेल तर काय ? इत्यादी इत्यादी.
तो इतका सय्यमाने आणि जबाबदारीने सगळ्यांना समजवत होता आणि आमचा गाईड राफ्ट मध्ये निवांत पसरुन बसलेला!  त्याचं वर्णन करणं...अबब! म्हणजे साधारण हा गाईड असेल तर आज आपण नक्की गंगार्पण असं वाटावं असा आमचा गाईड अमित! तसं झालं नाही नशीब...त्याने व्यवस्थित नेलं आम्हाला!

त्या सगळ्या सूचना ऐकल्या, एकदा शेवटचा विचार करुन घेतला..मग पुढे जाऊन गंगा मातेचं दर्शन घेतलं, पाणी डोळ्याला आणि कपाळाला लावलं आणि प्रवेश केला राफ्ट मध्ये!
अमितने कुणी कुठे बसायचं सांगितलं. ती दोन मुलं सगळ्यात पुढे, आम्ही त्यांच्या मागच्या विभागात आणि शेवटी हा! त्याने त्याच्या उच्च आंग्ल accent मध्ये आम्हाला पॅडल कसं धरायचं, तो काय काय सूचना देणार, वजन कसं बॅलन्स करायचं, पाय कसे मधल्या जागेत रोवून ठेवायचे वगैरे सांगितलं. 

झालं..आता खरा तो क्षण आला! आमची राफ्ट पाण्यावर तरंगत होती! किमान एवढी हिंमत तरी केली असा विचार करुन स्वतःलाच बुस्ट करत होतो!
तसं बऱ्यापैकी पाणी संथ असतं आणि मधे मधे उसळतं पाणी असतं त्याला "रॅपिड" असं म्हणतात, ते खरं पांढरं धोप दिसतं, म्हणून व्हाइट वॉटर राफ्टिंग म्हणत असावे बहुतेक. 
तर असे तीन मोठे आणि ८ लहान असे एकूण ११ रॅपिड असणार होते. बाकीच्या राफ्ट पुढे गेलेल्या, त्यांचं काय होतंय हे आम्हाला दिसणार होतं! एका अर्थी चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा!
ते पुढे व्यवस्थित गेले तर उत्तमच! पण जर कुणी पडलं, राफ्ट उलटली तर मात्र तिथल्या तिथे गाळण उडणार हे निश्चित होतं!

दोन्ही बाजूला डोंगर/झाडी..आणि समोर हिरवंगार पाणी!! Sea Green म्हणजे नेमका कुठला कलर ते इथे आल्यावर कळलं! आणि मधेच पांढरं धोप दिसणारं तेच पाणी! काय किमया आहे निसर्गाची!!

तर!
सुरवात झाली आणि पहिला छोटा रॅपिड आला, गंमत म्हणजे या प्रत्येक रॅपिडला एक नाव सुद्धा ठेवलेलं आहे बरं! आपले गाईड ते आपल्याला सांगत असतात! आता तेव्हाची मानसिक स्थिती बघता ते सगळं लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य होतं! अमितच्या सूचनांप्रमाणे आम्ही थोडा वेळ पँडल करायचो, त्याने थांबायला सांगितलं की थांबायचो.
आम्ही जरा कुठे स्थिरावतो तोच पहिला लहान रॅपिड आला, लांबून हे लहान रॅपिड विशेष दिसत नाहीत, जवळ गेल्यावर अगदी फक्त ५-१० सेकंद आपली राफ्ट त्यात असते, पssण!
हा पण फार भयानक आहे, तेवढ्यात सुद्धा एक मोठ्ठा गोळा येतो पोटात!
आमचं लक्ष आमच्यापुढे गेलेल्या राफ्टकडे! त्या दोन्ही राफ्ट किंचित हेलकावे घेऊन पुढे गेल्या तसं जssरा जीवात जीव आला!
मग पाय आपोआप त्या मधल्या खाचेत घट्ट रोवले गेले..जिवाच्या आकांताने अमित सांगेल तसं आम्ही पँडल करत होतो...आणि एका पॉईंटला अमित जोरात म्हणाला 
Okay Stop!
तेव्हा जरा मी शुद्धीत आले..मागे वळून बघितलं तर तो रॅपिड गेलेला, ती १० सेकंद मी कुठे होते ते माझं मलाच कळलं नाही! पोटातला गोळा पण हळूहळू कमी होत गेला..
रोवलेले पाय जरा ढिले सोडले न सोडले तोच अमित म्हणाला
आता पहिला मोठा रॅपिड येणारे!
झाssलं!
म्हंटलं आता जोर लावायचा आणि ओरडले
"गणपती बाप्पाssss" मग कसले विचार आणि कसलं काय!
मोरयाss म्हंटलं! गंगा मय्याकीsss जsss य!

जिवाच्या आकांताने आम्हीच ओरडत होतो आणि स्वतःलाच दिलासा देत होतो!

पुढच्या राफ्ट बघितल्या तर भयंकर परिस्थिती! जवळजवळ ७०-८०° एवढ्या हेलकावे घेत त्या पुढे गेल्या!! पण सुदैवाने कुणी पडलेलं दिसलं नाही..
त्यामुळे पुन्हा जोर लावून
"१ २ ३ ४...गणपतीचा जयजयकार" वगैरे झालं..मनातल्या मनात राम राम राम राम सुरु झालं..आणि आम्ही त्या रॅपिड मध्ये शिरलो!!
(काय वर्णन करु हाच प्रश्न आहे..इथे व्हिडीओ टाकायचा प्रयत्न करण्यातच एवढे दिवस लांबला हा भाग..पण ते काही झालं नाही! असो! )

समोर बसलेल्या मुलाच्या डोक्यावरचा गो प्रो कॅमेरा पाणी तोंडावर येऊन आदळल्याने खाली पडला..तो स्वतः बाजूच्या मुलाच्या पायाजवळ येऊन पडला..
त्याच्यामागे मी जवळ जवळ पडता पडता वाचले, फक्त अमच्याबाजूने राफ्ट वरती गेल्याने आम्ही पडलो असतो तरी आतच पडलो एवढं सुदैव!
त्यातून सावरतो न सावरतो तोच पलीकडच्या बाजूने राफ्ट वर गेली, पण थोडक्यात खाली आली म्हणून बचावलो!
संपूर्ण नाकातोंडात पाणी! पण त्या मानाने आम्ही पटकन सावरलो! पुढे संथ पाणी आलं तसं जीवात जीव आला आणि पहिला मोठा रॅपिड पार केल्याच्या आनंदात आम्ही पुन्हा गणपती बाप्पा आणि गंगा मय्याचा जयघोष केला!!

आणि मग अमितने आम्हाला शांतपणे सांगितलं की तुम्ही हे असं ओरडत राहिलात तर माझा आवाज तुम्हाला येणार नाही आणि महत्वाच्या सूचना कळणार नाहीत..शुद्ध शब्दात तोंडं बंद ठेवा असं सांगितलं त्याने आम्हाला!! 😂

मग पुढे एक छोटा रॅपिड आला आणि गेला कधी कळलंच नाही...सुदैवाने तो एवढा उसळत्या पाण्याचा नव्हता..आम्ही सहज तरून गेलो!

आता थोडीशी किंचित सवय झाली त्या पाण्याची..
भीती भीती जी होती ती खूप कमी झालेली..

अगदी खरं सांगू तर हे राफ्टिंग गंगेत नसतं तर मी कधीच केलं नसतं कदाचित..
आधी सांगितल्याप्रमाणे मला पाण्याची भीती आहे..खरं तर पाण्याची नाही, पाण्यात बुडण्याची भीती आहे कारण मी लहानपणी स्विमिंग पूल मध्ये बुडले होते..तेव्हापासून ती भीती बसलेली आहे!
पण २०१४ साली माझ्या सुदैवाने मी उत्तराखंड मध्ये येऊन गेले होते..तेव्हा हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, यमनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असं सगळं ध्यानीमनी नसताना अचानक झालेलं! अर्थात गुरुकृपा म्हणूनच!
त्या अधिपर्यंत मला समुद्राचं खूप वेड होतं.. कारण तोपर्यंत नदी बघितलेलीच नव्हती कधी!
२०१४ साली उत्तराखंडचा हा प्रवास झाला आणि मी खऱ्या अर्थाने "नदिष्ट" झाले!
सगळ्या नद्यांचे दर्शन झालं.. आधी गंगा, कालिंदी, यमुना, मंदाकिनी, अलकनंदा
आणि शेवटी...कधीही न विसरु शकणारी सरस्वती!!
माना गावात, भारताच्या एका सीमेवर माना गाव आहे, तिकडे गेलो असताना तिथे सरस्वतीचा प्रवाह आहे..अगदी छोटा! पण पांढरं शुभ्र वाहतं पाणी! आम्ही अक्षरशः आधाशासारखं ते पाणी प्यायलेलं मला आजही आठवतंय..आणि ती चव आयुष्यात कधी विसरुच शकणार नाही!!

त्यावेळी मलाही वाटलेलं, की विसावं वर्ष हे काय चारधाम करायचं वय आहे का..त्यामुळे मी नकारच देत होते...तसं मी आमच्या सरांना म्हंटलं सुद्धा! तेव्हा त्यांनी फक्त मला एकच प्रश्न विचारलेला, "तुझा माझ्यावर विश्वास आहे का?"
आणि पुढे त्या प्रवासाने मला प्रवासाच्या, निरसर्गाच्या, नद्यांच्या आणि अध्यात्माच्या प्रेमात पाडलं! Turning point!

असो..तर या पुढच्या रॅपिडकडे जाणाऱ्या turning कडे आम्ही आलो आणि अमित म्हणाला पुढचा रॅपिड हा सगळ्यात मोठा रॅपिड असणार आहे!

पुन्हा एक छोटा गोळा...पण एव्हाना आम्ही जरा सरावलो होतो! त्यामुळे थोडीशी मजा येउ लागली होती!
आम्ही यावेळी शक्कल केली, रॅपिड लांब असतानाच गणपती बाप्पा आणि गंगा मय्याला पाचारण गेलं, असं अंगभर रक्त उत्साहाने सळसळतय असं वाटत होतं!! 
म्हणता म्हणता आम्ही जवळ आलोच..आणि पाण्याचा एक जोरदार तडाखा आला..सगळं पाणी तोंडावर...जवळजवळ पडतापडता वाचलेलो...काही दिसेनासं झालं..पण दिसलं तेव्हा सगळे राफ्ट मध्ये होते..फक्त शर्वरीने तिचे पॅडल सोडून दिलेलं आणि ते आता मस्त गंगेत डुंबत होतं!
आम्हाला हसावं की काय करावं कळेना..अजून आम्हीच त्या रॅपिडधक्यातून बाहेर आलो नव्हतो..पण मग अमितने पँडल भाई, आजा मेरे दोस्त वगैरे टाईमपास करत कसंबसं ते पॅडल मिळवलं..आणि मग जाम चेष्टा मस्करी करत आम्ही पुढे गेलो!
पण या वेळी अगदी मस्त वाटलं! म्हणजे लहान मुलाला आई कशी उंच हवेत उडवते आणि अलगद झेलते ना...अगदी तसं!!

थोडं पुढे आल्यावर अमित म्हणाला की आता पॅडल राफ्ट मध्ये लॉक करा आणि पटकन पाण्यात उतरा! थोडा विचार करून ते दोघे मुलं उतरले..
शर्वरीने त्याला एक दोन प्रश्न विचारले आणि ती सुद्धा उतरली! खाली राफ्टला एक जाड दोरी बांधलेली असते..तो म्हणाला त्याला धरुन रहा बस! लाईफ जॅकेट होतंच!
तरीही माझं पटकन धाडस होईना!
यासाठी मात्र मी अमितची कायम आभारी राहीन..त्याने मला काहीही विचारलं नाही..सरळ म्हणाला "उतरो".
मग मी पण घेतलं गंगेच नाव आणि उतरले!! आणि काय सांगू..स्वर्गसुख काय म्हणतात ते हेच!! दोन्ही बाजूला डोंगर-झाडी...हिरवं-पांढरं पाणी...मधोमध आपण!!! आहाहा!!
बराच वेळ आम्ही तसेच होतो..
भीती वगैरे सगळं दूर..लहान मुलांना कसं कोणीतरी डोक्यावर बसवून मस्त घेऊन जातं तसं वाटत होतं!!
मग एकदम सरावल्यासारखे पुन्हा प्रवासाला लागलो..पुढे दोन चार बारीक बारीक रॅपिड गेले..एकदम मजा सुरू होती! 
आणि मग आम्हाला दिसला मॅगी पॉईंट!!

मग राफ्ट तिकडे घेतली..सगळे उतरलो..मस्त मॅगीची ऑर्डर दिली! बाकीच्यांनी चहा घेतला..
सवयीप्रमाणे Emergency reuirement म्हणून मी प्लास्टिकच्या पिशवीत थोडे पैसे घेऊन पँटच्या खिशात ठेवले होते..त्याचा उपयोग झाला!
 आणि मग अमितने विचारलं कोण कोण क्लिफ जम्प करणार?! त्यावर आमचा तर चान्सच नव्हता..त्या दोघांमधला एक जण म्हणाला करेन! मग अम्ही मस्त मॅग्गी खाल्लं आणि थोडं पुढे जिथून सगळे क्लिफ जम्प करत होते तिकडे गेलो..
क्लिफ जम्प म्हणजे काय तर तिथे उंचावर साधारण २० फुटावरुन खाली उडी मारायची पाण्यात..
लाईफ जॅकेट असतं त्यामुळे आपण आपोआप वर येतो..पण तरी..एवढी हिंमत झालीच नाही!
मग आम्ही खालच्या दगडावर बसून जो कुणी उडी मारत होता त्याला जोरदार चियरिंग करत होतो! आणि हा आमचा ग्रेट गाईड अमित!
तिथे भरपूर वेळ गेला..छोटा धबधबा होता त्यात मस्त एन्जॉय केलं!! 
आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..मग पुढे येणारे रॅपिड काहीच वाटले नाही..अतिशय आनंद घेत आम्ही उर्वरित वेळ काढला..आणि काठावर येऊन पायउतार झालो! मग अमितचा फोन बंद पडला त्यामुळे गाडी यायला वेळ लागला..मग आम्ही पुन्हा एक एक प्लेट मॅगी खाल्ली! तिथे हा गोगो भेटला!! ह्याचं नावच गोगो! गोंडस! आमची मस्त गट्टी झाली..पण मग आम्हाला निघायला लागलं!!
येताना अमितला पैसे देऊन आमचे व्हिडीओ त्याच्याकडून घेतले आणि zostel जवळ त्यांनी आम्हाला सोडलं...(आपला गाईड आपले व्हिडीओ काढतो, व ते हवे असतील तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. बऱ्याचदा सगळे contribute करुन देतात.) 
येतानाच तिकडे फोन करुन geyser सुरु करायला सांगितलेला कारण पटापट आवरुन आम्हाला गाठायचा होता त्रिवेणी घाट..तिथली गंगा आरती सगळ्यात बघण्यासारखी असते असं म्हणतात!
त्याप्रमाणे आम्ही आवरलं आणि खाली जाऊन विक्रम चालकाशी bargain करुन करुन त्रिवेणी घाटाजवळ पोहोचलो...
भूक तर लागलीच होती...आणि आरतीला अजून अर्धा तास होता पण तिकडे आसपास काही विशेष नव्हतं..एका छोट्याशा टपरीवर जाऊन छोले समोसे खाल्ले..त्या माणसाला कोण आनंद झालेला आम्ही आल्याचा..समोसे देऊन जाताना म्हणाला इस्के बाद गुलाम जामून खिलाता हु आपको!
आम्ही पण हसून सोडून दिलं..आणि समोसे खाऊन मग आणि आरतीसाठी येऊन स्थानापन्न झालो!


क्रमशः

Monday, 4 January 2021

ऋषिकेश-मसुरी - भाग १

पाच सहा वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं, की दर वर्षी महाराष्ट्राच्या बाहेर एका राज्यात जाऊन फिरुन यायचं..
त्याप्रमाणे या वर्षी म्हणजे २०२०च्या मे महिन्यात Unplanned हिमाचल ट्रिप करायचा प्लॅन होता. आणि तो अर्थात हिमालयाच्या बर्फात विलीन झाला!
मग साधारण सप्टेंबरच्या आसपास डोक्यात पुन्हा चक्र सुरू झालं की कुठे जाऊ शकतो..
कोकणात परवानगी नव्हती, गोकर्ण कडे मन झुकत होतं पण ट्रेन बंद होत्या, उत्तरेकडे मन झुकत तर होतं पण खिसा नको म्हणत होता!
पण अखेर नोव्हेंम्बर मध्ये ऋषिकेश आणि मसुरीला जायचं नक्की केलं!
नेहेमीप्रमाणे माझी मैत्रीण आणि मी..
मनाचा हिय्या करुन मुंबई देहरादून फ्लाईट बुक केलं आणि येताना मसुरी-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई असा ट्रेन प्रवास नक्की केला..तेव्हा कुठे माहीत होतं ते फार महागात पडणार आहे! असो!
तर २३ तारखेला पहाटेच्या फ्लाईट ने देहरादूनला जायचं, त्यामुळे आम्ही मध्यरात्रीच एअरपोर्टला पोहोचलो..
अनेक लोकांनी घाबरवलं होतं की एअरपोर्टला खूप गर्दी असते ४ तास आधीच जा वगैरे पण खरंतर तशी खूप गर्दी नव्हती..सगळं वेळेत आटोपून आम्ही गेटजवळ जाऊन बसलो..फक्त बोर्डिंग खूप लवकर झालं आणि उतरताना सुद्धा बराच वेळ फ्लाईट मध्येच बसवून ठेवलं होतं, आणि त्यात ती face shield पूर्ण वेळ घालून बसल्याने डोकं धरलं होतं..त्याचा मात्र थोडा कंटाळा आला..पण ठीक हैं!
बाकी फ्लाईट दरम्यान मोहक सुर्योदयाचं दर्शन झालं..
आणि नंतर पिंजलेल्या कापसाच्या थरातून खाली येत
 आम्ही थेट देवभूमी उत्तराखंड मध्ये उतरलो!
बाहेर पडताच अंगावर सर्रर्रकन काटा आला कारण वातावरण एकदम थंड आणि त्यात वारा, त्यामुळे सगळ्यात आधी बाहेर ठेवलेलं जॅकेट चढवलं आणि बॅग्स घेऊन आम्ही एअरपोर्ट बाहेर आलो.
देहरादूनचं विमानतळ अतिशय छोटं आहे, त्यामुळे तिथे विशेष सुविधा उपलब्ध नाहीत. 
बाहेर आलो तर प्रीपेड टॅक्सी, ओला, उबर इत्यादी महागडे पर्याय होतेच..
पण अर्थात आमच्या ट्रिप्सचा हा महत्वाचा भाग असतो की जिथे अनावश्यक आहे तिथे खर्च टाळणे.
त्यामुळे आधी गूगल बाबाच्या सहाय्याने research केल्यामुळे मला हे माहीत होतं की साधारण एक दीड किलोमीटर बाहेर चालत गेलं की मेन रोडवरुन रिक्षा मिळतात. त्यामुळे आम्ही आधी तिथल्या सगळ्या पर्यायांचे भाव विचारले, व ते अवाजवी असल्याने आम्ही सामानासकट बाहेर चालायला लागलो.
 थंडी प्रचंड जाणवत होती त्यात रात्रीपासून निघालेलो आणि विशेष खाल्लं नसल्याने थंडी जास्तच जाणवत होती. सुदैवाने साधारण अर्धा किलोमीटर चालून गेल्यावरच तिथे काही टॅक्सिचालक उभे होते. त्यांनी आम्हाला लगेचच विचारलं व जवळजवळ प्रीपेड टॉक्सिच्या अर्ध्या भावात आम्हाला न्यायला तयार झाले. रिक्षातून गेलो तर एकतर रिक्षा मिळायला लागणारा वेळ आणि त्यात पुन्हा प्रचंड वारा सोसत जाणं आलंच, त्यामुळे तिथे आणखी काटकसर न करता आम्ही टॅक्सी केली आणि सरळ ऋषिकेशकडे रवाना झालो.

ओला-उबर स्वस्तात मिळाली तरी ड्रायव्हर चांगला असेलच असं नाही. पण टॅक्सी करताना, नजर अनुभवी असेल तर माणूस हेरुन घेता येतो. त्याप्रमाणे आमचा टॅक्सीचालक अगदी चांगला निघाला! पुढे सुद्धा त्याने आम्हाला मदत केली, ते तुम्ही पुढे वाचालच!
तर टॅक्सीत बसल्यापासून नेहेमीच्या सवयीने लागणारी सगळी माहिती म्हणजेच अगदी हवामानाच्या अंदाजापासून  खाद्यवैशिष्ठ्यापर्यंत सगळं त्याला विचारुन घेतलं. आणि साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही आमच्या निर्धारित स्थळी म्हणजे Zostel Rishikesh 2.0 येथे पोहोचलो!
ह्याची सुद्धा एक गंमत आहेच. Rishikesh मध्ये जे मूळ zostel होतं ते दुरुस्तीखाली असल्याने तिथे बुकिंग करता येत नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी रूम रिझर्व्ह करुन ठेवली होती. (नुसतं रिझर्व्ह करणं म्हणजे पैसे तिथे पोहोचल्यावर देणं, आणि बऱ्याचदा त्याला फ्री कॅन्सलेशन सुद्धा असतं.) तर अशी रूम रिझर्व्ह केलेली.
आणि आम्ही निघायच्या २-३ दिवस आधी ऋषिकेश मधल्या या दुसऱ्या zostelचं अनावरण झाल्याचं कळलं!
मग काय! त्वरित तिकडचं कॅन्सल करून इकडे बुकिंग करून टाकलं!
त्यात आणखी एक मेख अशी की, या zostel franchisee ने lockdown दरम्यान काही ऑफर दिल्या होत्या. त्यातली एक ऑफर अशी होती की काही दिवसांचं बुकिंग आधीच विकत घ्यायचं..म्हणजे समजा आपण 5 रात्री घेतल्या तर आयुष्यभरात तुम्ही केव्हाही एखाद्या zostel मध्ये जाऊ इच्छित असाल तर तिथे तसं कळवून हव्या तीतक्या दिवसांचं बुकिंग redeem करु शकता. तेव्हा मला 3700 रुपयांना १० दिवस अशी स्कीम मिळाली होती त्याचा एकदम फायदा झाला! (आत्ता सुद्धा ही स्कीम चालू आहे, पण आत्ताचा भाव ५५०० ला १० रात्री असा आहे!)
तर…आम्ही पोहोचलो, सगळ्या formalities पूर्ण केल्या व डॉर्म मध्ये गेलो. अंघोळी केल्या, घरी फोन केले आणि परंपरा म्हणून घरून आणलेले ठेपले, लाडू, चिवडा असा नाश्ता केला!
शक्यतो पहिल्या दिवशीचा नाश्ता घरचा करावा, प्रवासाचा थकवा असतो, वणवण फिरुन खात्री नसलेलं काहीतरी खाण्यापेक्षा घरचं चविष्ट, पौष्टिक बसल्या जागी खावं, सुरवात उत्तम होते!
पूर्ण सुट्टी नव्हती, work from home होतं त्यामुळे थोडंसं काम केलं मग चार माजल्यांचं zostel पूर्ण बघून आलो. 
आणि तिथल्याच कॅफे मध्ये जेवलो. जेवल्यावर एक छान गुर्गटून एक झोप काढली! व दुपारी बाहेर पडलो..

त्या दिवशी रात्री आम्हाला माझ्या आईच्या विद्यार्थिनीकडे जेवायला जायचं होतं. त्यामुळे तिच्या रहाण्याचे ठिकाण मॅप वर बघून त्या दिशेला वाटेत बघण्यासारखं काय आहे हे बघून आम्ही पायी निघालो. आम्ही रहात होतो ते ठिकाण तिथल्या छोट्याश्या घाटात असल्याने चालताना दक्षतेने चालावं लागत होतं. एक वळण गेल्यावर उताराच्या रस्त्यावर आम्ही चालत होतो आणि डावीकडे झाडांच्या मधून अगदी बारीक pure sea green रंग दिसला
 तशी पावलांची गती वाढली आणि थोडंच पुढे गेल्यावर डाविकडे खाली गंगा मातेचं दर्शन झालं..इतका आनंद अनेक अनेक दिवसांनी मला होतं होता! तो रस्ता होता राम झुल्याकडे जाणारा.. थोडं पुढे गेल्यावर समोर राम झुला दिसतच होता. तिथे रस्त्यात दोन शॉर्टकट लागतात झुल्याकडे जाणारे. बऱ्याच पायऱ्या असलेले चिंचोळे रस्ते आणि त्यावर खूप माकडं!
झुल्यावरून पलीकडे जाण्याइतका वेळ नसल्याने आम्ही सरळ चालत राहिलो आणि पुढे रस्त्यालगतच घाटावर जायचा मार्ग सापडला. घाटावर खाली गेलो..तोपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता. हळूहळू प्रकाश मावळत होता आणि आम्ही गंगेचं सौंदर्य बघत होतो!
साधारण ८-९ महिने पूर्णतः चार भिंतीत, सिमेंटच्या जंगलात कोंडमारा झाल्यानंतर साक्षात गंगेसमोर जाऊन उभं रहाणं म्हणजे रणरणत्या उन्हात वळीवाच्या पावसाने मिळणारं समाधानच जणू! त्याहीपेक्षा कितीतरी अद्भुत आणि विलक्षण!
तसं बघायला गेलं तर काय विशेष..? वाहतं स्वच्छ पाणीच ते..
पण गंगा एवढा उच्चार झाला तरी काय पवित्र वाटतं! किंबहुना उलटपक्षी तिथे जाऊन बघितलं की लगेच कळतंच ही गंगामय्याच असणार!
तर आम्ही तिथे बसलो..तो शत्रुघ्न घाट होता..आणि तिथे गंगा आरती सुरु झाली! 
इतकी सुंदर आरती झाली की मन अगदी पहिल्याच दिवशी भरुन पावलं! तीन युवक पुजारी हातात ते प्रचंड आरतीचे दिवे घेऊन विशिष्ट पद्धतीने पण अगदी सुसूत्र असं ते नाचवत होते! ती आरती झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो..कारण पुढे अर्धा तास प्रवास करुन नवीन जागी जायचं होतं!
तिथे जवळच टॅक्सी स्टँड आहे, त्याच्या बाहेर गेलो तर एक माणूस हरिद्वारला सवारी घेऊन जात होता..आमचं ठिकाण त्याच मार्गावर असल्याने आधी नाही नाही म्हणत शेवटी तो आम्हाला न्यायला तयार झाला! तिथे त्या share गाडी/रिक्षा/जीपला 'विक्रम' असं म्हणतात! ह्या गाडीची गंमत आहे..जशी शहराबरोबर बोली भाषा बदलते तसंच हिचं नावही बदलतं!
कधी जीप, कधी टमटम, कधी विक्रम तर कधी थेट डुक्कर सुद्धा म्हणतात!
तर अशा विक्रम मध्ये बसून ऋषिकेश दर्शन करत आम्ही त्या ताईकडे पोहोचलो..
क्रमशः 

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...