Monday, 6 October 2025

Whatsapp, Arattai इत्यादी!

Whatsapp चा जन्म हा २००९ साली ios साठी झाला आणि पुढे २०१० साली अँड्रॉइड वर ते सक्रिय झालं. माझ्याकडे अँड्रॉइड फोन बहुतेक २०१२ किंवा १३ साली आला आणि तेव्हापासून मी whatsapp वापरायला लागले आणि काही दिवसातच whatsapp म्हणजे संपर्काचा अविभाज्य घटक झाला. त्यावेळीही hike, telegram, Viber, Line  इत्यादी पर्याय आलेले होते पण ते विशेष वापरात दिसले नाहीत. माझ्यामते skype आणि ब्लॅकबेरी मेसेंजर हे त्या आधीपासून होते, पण सामान्य लोकांसाठी सगळ्यात user friendly म्हणजेच सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे Whatsapp होता.
मध्यंतरी २०२१ साली whatsapp ने privacy policy म्हणजेच गोपनीयता धोरणात बदल केले आणि तिथून त्यावरील विश्वासार्हता कमी होत गेली. त्या धोरणाप्रमाणे whatsapp वरील गोपनीय data त्याच्या parent कंपनीला म्हणजे Meta ला (आणि त्याद्वारे त्याच्या इतर कंपन्या म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम इ) पुरवला जाणार, आणि जर हे मान्य नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी accounts बंद होऊन त्यावरचा मागचा सगळा डेटा जाईल अशा आशयाचा तो बदल होता. त्यामुळे अनेक लोकांनी टेलिग्राम वर जाणं पसंत केलं तर अनेक लोकांनी तीव्र निषेध केल्याने आणि बरीच बदनामी होत असल्याचे लक्षात आल्याने बहुदा त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला. तेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवहार ऑनलाइन चालत होते, अगदी शाळा, कॉलेज, ऑफिस सगळ्यासाठी फोन आणि पर्यायी whatsapp अविभाज्य घटक झालेलं. त्यातच यामुळे अनेक शाळा, कंपन्या इत्यादींनी टेलिग्राम हे माध्यम म्हणून वापरणं बंधनकारक केलं. बराच काळ ते टिकलंही, आणि पुढे त्यातही अनेक fraud होताना दिसले.
त्याचवेळी म्हणजे २०२१ साली तामिळनाडूतील झोहो कॉर्पोरेशनने "Arattai" हे भारतीय बनावटीचं app लाँच केलं होतं. पण त्याचा भाग्योदय मात्र २०२५ साली होताना दिसत आहे. Whatsapp ला पर्यायी असणारं पण पूर्णतः भारतीय असलेलं हे app आणि त्याची कंपनी आहे.
श्रीधर वेम्बु हे त्याचे फाउंडर असून ही कंपनी भरतासह ८० देशात कार्यरत असून, बिझनेससाठी त्यांचा झोहो सूट हे मायक्रोसॉफ्ट सूटला टक्कर देणारं पर्यायी सॉफ्टवेअर आहे.
आजपर्यंत गेल्या चार वर्षात Arattaiचं नाव ऐकिवात आलेलं नव्हतं पण अलीकडे भारत सरकारने पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आणि Arattai एकदम उदयाला आलं. ३ दिवसात app च्या वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
श्रीधर वेम्बु यांच्याबद्दल जरुर गूगल बाबाला विचारा. कोट्यवधींची संपत्ती असणारा माणूस एका लहानशा गावात रहातो आणि रोज सायकलवर प्रवास करतो. मला वैयक्तिक दृष्ट्या फार माहिती नाही पण हे खूपच प्रेरणादायी आहे. 

मी स्वतः गेले काही दिवस whatsapp चा अतिशय कमी वापर करुन पाहिलं, आणि गेले तीन दिवस तर पूर्णतः बंद ठेवूनही पाहिलं. फार काही फरक पडला नाही. अर्थात आजवर त्याचा अतोनात वापर केला आहे आणि त्यासाठी कृतज्ञ आहे.

Arattai हे ऐकल्यावर मात्र सुरवातीला माझ्या कानांना त्रास होत होता. ते ऐकायला फार छान आणि सोपं वाटत नव्हतं.
पण कुतूहल म्हणून गूगल केलं असता Arattai हा तामिळ शब्द असून याचा अर्थ  (अनौपचारिक) गप्पा असा होतो. जसं आपण what's up म्हणणारं whatsapp आपलंसं केलं, तसंच भारतीय भाषांमधील सगळ्यात प्राचीन मानल्या जाणाऱ्या तामिळ भाषेतील त्याच अर्थाच्या शब्दाचं शीर्षक असणारं Arattai ही नक्कीच आपलंसं करु शकतो की!
तामिळ ही मातृभाषा नसलेल्या लोकांना सुरवातीला थोडंसं नाव जड जाऊ शकतं, पण ते जर एका तामिळ माणसाने निर्माण केलेलं असेल आणि त्याच्या भाषेचा अभिमान म्हणून त्याने हे नाव दिलं असेल तर आपण ते नक्कीच आनंदाने स्वीकारावं.
कुठल्याही जात, प्रांत, राजकीय पक्ष, विचारसरणी इत्यादींना फाटा देऊन केवळ आणि केवळ स्वदेशी या नाऱ्याखाली जे जे स्वदेशी पर्याय उपलब्ध आहेत ते आपलेसे करणं हे भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहेच. कारण इंग्रज एकदा येऊन आपल्या "डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा" म्हणणाऱ्या भारताची दुरावस्था करुन गेले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपलेच लोक त्याला जबाबदार आहेत. पण त्याही वेळी स्वदेशीचा नारा दिला गेला होता आणि आज आपण पुन्हा तिकडेच जात आहोत. त्यातही सगळ्यात मोठा धोका हा चीन पासून आहेच कारण पिन पासून फोन पर्यंत बहुतांश सगळं तिकडूनच येतं आणि कधी स्वस्त म्हणून तर कधी भारतीय चांगले पर्याय उपलब्ध नाही म्हणून आपल्याकडून बेमालूमपणे त्याचा वापर होत आहे. पण आपल्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी उपत्पादनं वापरणं हे आपलं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे.
Arattai हे त्याचं चांगलं निमित्त होऊ शकतं. जरुर डाउनलोड करुन वापरून बघा, आणि आपल्या सर्व सुहृदांनाही यासाठी आवाहन करा. Whatsapp वरील आपले सर्व ग्रुप - ग्रुप admin असणाऱ्यांनी तिथे पुन्हा create करुन त्याचं invite whatsappच्या मूळ ग्रुपवर पाठवा जेणेकरुन ग्रुपवरच्या सगळ्याच लोकांना हे स्थित्यंतर सुलभ जाईल!

Arattai ची लिंक बरोबर देत आहे -

https://play.google.com/store/apps/details?id=com.aratai.chat

किंवा इथून थेट डाउनलोड करा - Arattai Download 

जय हिंद, जय भारत!

तुम्ही Arattai वापरलं का ते खाली कमेंट्स मधे मला जरुर सांगा!

- सौ. कांचन लेले-गोळे

1 comment:

  1. प्रयत्न सुरू आहेत जमले की कळवतो.

    ReplyDelete

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...