Monday, 6 October 2025

Whatsapp, Arattai इत्यादी!

Whatsapp चा जन्म हा २००९ साली ios साठी झाला आणि पुढे २०१० साली अँड्रॉइड वर ते सक्रिय झालं. माझ्याकडे अँड्रॉइड फोन बहुतेक २०१२ किंवा १३ साली आला आणि तेव्हापासून मी whatsapp वापरायला लागले आणि काही दिवसातच whatsapp म्हणजे संपर्काचा अविभाज्य घटक झाला. त्यावेळीही hike, telegram, Viber, Line  इत्यादी पर्याय आलेले होते पण ते विशेष वापरात दिसले नाहीत. माझ्यामते skype आणि ब्लॅकबेरी मेसेंजर हे त्या आधीपासून होते, पण सामान्य लोकांसाठी सगळ्यात user friendly म्हणजेच सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे Whatsapp होता.
मध्यंतरी २०२१ साली whatsapp ने privacy policy म्हणजेच गोपनीयता धोरणात बदल केले आणि तिथून त्यावरील विश्वासार्हता कमी होत गेली. त्या धोरणाप्रमाणे whatsapp वरील गोपनीय data त्याच्या parent कंपनीला म्हणजे Meta ला (आणि त्याद्वारे त्याच्या इतर कंपन्या म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम इ) पुरवला जाणार, आणि जर हे मान्य नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी accounts बंद होऊन त्यावरचा मागचा सगळा डेटा जाईल अशा आशयाचा तो बदल होता. त्यामुळे अनेक लोकांनी टेलिग्राम वर जाणं पसंत केलं तर अनेक लोकांनी तीव्र निषेध केल्याने आणि बरीच बदनामी होत असल्याचे लक्षात आल्याने बहुदा त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला. तेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवहार ऑनलाइन चालत होते, अगदी शाळा, कॉलेज, ऑफिस सगळ्यासाठी फोन आणि पर्यायी whatsapp अविभाज्य घटक झालेलं. त्यातच यामुळे अनेक शाळा, कंपन्या इत्यादींनी टेलिग्राम हे माध्यम म्हणून वापरणं बंधनकारक केलं. बराच काळ ते टिकलंही, आणि पुढे त्यातही अनेक fraud होताना दिसले.
त्याचवेळी म्हणजे २०२१ साली तामिळनाडूतील झोहो कॉर्पोरेशनने "Arattai" हे भारतीय बनावटीचं app लाँच केलं होतं. पण त्याचा भाग्योदय मात्र २०२५ साली होताना दिसत आहे. Whatsapp ला पर्यायी असणारं पण पूर्णतः भारतीय असलेलं हे app आणि त्याची कंपनी आहे.
श्रीधर वेम्बु हे त्याचे फाउंडर असून ही कंपनी भरतासह ८० देशात कार्यरत असून, बिझनेससाठी त्यांचा झोहो सूट हे मायक्रोसॉफ्ट सूटला टक्कर देणारं पर्यायी सॉफ्टवेअर आहे.
आजपर्यंत गेल्या चार वर्षात Arattaiचं नाव ऐकिवात आलेलं नव्हतं पण अलीकडे भारत सरकारने पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आणि Arattai एकदम उदयाला आलं. ३ दिवसात app च्या वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
श्रीधर वेम्बु यांच्याबद्दल जरुर गूगल बाबाला विचारा. कोट्यवधींची संपत्ती असणारा माणूस एका लहानशा गावात रहातो आणि रोज सायकलवर प्रवास करतो. मला वैयक्तिक दृष्ट्या फार माहिती नाही पण हे खूपच प्रेरणादायी आहे. 

मी स्वतः गेले काही दिवस whatsapp चा अतिशय कमी वापर करुन पाहिलं, आणि गेले तीन दिवस तर पूर्णतः बंद ठेवूनही पाहिलं. फार काही फरक पडला नाही. अर्थात आजवर त्याचा अतोनात वापर केला आहे आणि त्यासाठी कृतज्ञ आहे.

Arattai हे ऐकल्यावर मात्र सुरवातीला माझ्या कानांना त्रास होत होता. ते ऐकायला फार छान आणि सोपं वाटत नव्हतं.
पण कुतूहल म्हणून गूगल केलं असता Arattai हा तामिळ शब्द असून याचा अर्थ  (अनौपचारिक) गप्पा असा होतो. जसं आपण what's up म्हणणारं whatsapp आपलंसं केलं, तसंच भारतीय भाषांमधील सगळ्यात प्राचीन मानल्या जाणाऱ्या तामिळ भाषेतील त्याच अर्थाच्या शब्दाचं शीर्षक असणारं Arattai ही नक्कीच आपलंसं करु शकतो की!
तामिळ ही मातृभाषा नसलेल्या लोकांना सुरवातीला थोडंसं नाव जड जाऊ शकतं, पण ते जर एका तामिळ माणसाने निर्माण केलेलं असेल आणि त्याच्या भाषेचा अभिमान म्हणून त्याने हे नाव दिलं असेल तर आपण ते नक्कीच आनंदाने स्वीकारावं.
कुठल्याही जात, प्रांत, राजकीय पक्ष, विचारसरणी इत्यादींना फाटा देऊन केवळ आणि केवळ स्वदेशी या नाऱ्याखाली जे जे स्वदेशी पर्याय उपलब्ध आहेत ते आपलेसे करणं हे भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहेच. कारण इंग्रज एकदा येऊन आपल्या "डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा" म्हणणाऱ्या भारताची दुरावस्था करुन गेले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपलेच लोक त्याला जबाबदार आहेत. पण त्याही वेळी स्वदेशीचा नारा दिला गेला होता आणि आज आपण पुन्हा तिकडेच जात आहोत. त्यातही सगळ्यात मोठा धोका हा चीन पासून आहेच कारण पिन पासून फोन पर्यंत बहुतांश सगळं तिकडूनच येतं आणि कधी स्वस्त म्हणून तर कधी भारतीय चांगले पर्याय उपलब्ध नाही म्हणून आपल्याकडून बेमालूमपणे त्याचा वापर होत आहे. पण आपल्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी उपत्पादनं वापरणं हे आपलं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे.
Arattai हे त्याचं चांगलं निमित्त होऊ शकतं. जरुर डाउनलोड करुन वापरून बघा, आणि आपल्या सर्व सुहृदांनाही यासाठी आवाहन करा. Whatsapp वरील आपले सर्व ग्रुप - ग्रुप admin असणाऱ्यांनी तिथे पुन्हा create करुन त्याचं invite whatsappच्या मूळ ग्रुपवर पाठवा जेणेकरुन ग्रुपवरच्या सगळ्याच लोकांना हे स्थित्यंतर सुलभ जाईल!

Arattai ची लिंक बरोबर देत आहे -

https://play.google.com/store/apps/details?id=com.aratai.chat

किंवा इथून थेट डाउनलोड करा - Arattai Download 

जय हिंद, जय भारत!

तुम्ही Arattai वापरलं का ते खाली कमेंट्स मधे मला जरुर सांगा!

- सौ. कांचन लेले-गोळे

Wednesday, 5 February 2025

गोष्ट एका चहाची!


खरंतर हा अनुभव लिहिताना मलाच गंमत वाटत्ये, पण लिहिल्याशिवाय रहावत नाहीये. खरंतर ही फार छोटीशी गोष्ट आहे, पण माणुसकी celebrate करणारी आहे त्यामुळे सांगितल्याशिवाय रहावत नाहीये!


तर झालं असं की मी आणि आई माझ्या सासरी म्हणजेच हर्णै (दापोलीला) गेलो होतो व आमची रविवार संध्याकाळची परतीची गाडी बुक केलेली होती. एक दोन ठिकाणी जायचं होतं आणि मग दापोलीतून गाडीचं बुकिंग होतं त्यामुळे आम्ही सकाळी सामान गाडीत टाकून हिंडत होतो..कोकणात म्हणजे अनेक ठिकाणी रेंज यायची बोंब, त्यात नेट चालणं आणखीनच अवघड! त्यातच मधे बराच वेळ रेंज नव्हती आणि मग अगदी ऐन वेळेला रेंज आल्यावर गाडी कॅन्सल झाल्याचा मेसेज पाहण्यात आला आणि सगळी गडबड सुरु झाली..! एसटी, खाजगी बस, शेअरिंग गाड्या, ट्रेन असे सगळे प्रकार हुडकून झाल्यावर शेवटी ४ वाजता खेडला येणारी मांडवी ट्रेन पकडून जायचं ठरवलं. आम्ही अगदीच काट्यावर होतो..दापोलीतून खेडला जायचा रस्ता खराब, त्यात अगदी मोजका वेळ हातात आणि बाबांनी अशी एकदम ड्रायव्हर स्टाईल गाडी दामटत खेडपर्यंत आणली आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये इकडे आमची गाडी रस्त्यावरून स्टेशनाबाहेर थांबायला आणि तिकडून मांडवी रुळावर दिसायला..मग ही पळापळ, बॅग्स गाडीतून काढून फलाटावर धाव घेतली, तोवर अनिरुद्धने जनरलची तिकिटं काढून आणली..म्हंटलं आता जाऊन tc ला गाठू आणि काही कॅन्सलेशनच्या सीट असतील त्याचं तिकीट करुन घेऊन असं म्हणत पळत पळत फलाटावर आलो आणि बघतो तर काय, डबे पूर्ण भरलेलेच दिसत होते..म्हंटलं आता झालं कल्याण! त्यातही एकटी असते तर कसाही प्रवास झाला असता पण बरोबर आई होती आणि ४-५ लहान मोठ्या बॅग्स! पण म्हंटलं जर इतक्या गडबडीत सुद्धा ही ट्रेन मिळणं आपल्या नशिबात असेल, तर प्रवास सुद्धा यानेच व्हायचा असेल! म्हणून घेतलं देवाचं नाव आणि चढलो ट्रेन मधे. तसं आम्हा दोघींनाही प्रवासाची चांगलीच सवय असल्याने फार काही वाटलं नाही..थोडं आत गेलो, सामान सगळं ठेवल्यावर लक्षात आलं एक हँडबॅग आहे ज्यात विशेष काही गरजेचं नाही, ती तशीच परत पाठवली..दुसरी लॅपटॉपची बॅग ट्रॉली बॅगमध्ये टाकली..आता पसारा थोडा आवाक्यात आला. एका साईड लोवर बर्थवर एक तरुण मुलगा टेकून अर्धवट पाय सोडून बसलेला, तिथे आईला बसवलं. नशिबाने त्याच बर्थखाली पुरेशी जागा होती त्यात सगळं सामान बसवलं! गाडी एव्हाना सुटली होती..आजूबाजूला माणसंच माणसं दिसत होती! त्या मुलाला विचारलं ही सीट तुमची आहे का तर तो हो म्हणाला..म्हंटलं बरं. आईला म्हंटलं बस, मी मागे पुढे बघून येते कुठे सीट रिकामी आहे का. एक फेरी मारली, गणित असं होतं की हा स्लीपर कोच आहे आणि दिवसा काय कोणी अप्पर बर्थ वर वगैरे जात नसतं, २-४ बर्थ तरी रिकामे असतील मग तिथे तरी बसता येईलच. पण हो तोबा गर्दी बघून भर दुपारी सुद्धा लोक अप्पर काय, पण मिडल बर्थवर सुद्धा पडून होते! एक दोन अप्पर बर्थ रिकामे होते, नुसत्याच बॅग्स होत्या..मला जरा आशा वाटली मग तिथे बसलेल्यांना विचारलं तर दोन्हीकडच्या बायका म्हणाल्या आम्ही बसणार आहोत तिथे..म्हंटलं ठीक आहे..आणि परत आले..तर दुसऱ्या बाजूने tc काका येताना दिसले..म्हंटलं बघूया काही होतंय का म्हणून त्याच्या दिशेने जाऊ लागले तर ते तिथे एका साईड अप्पर वर बसलेल्या मुलांवर ओरडत होते की साध्या तिकिटावर इथे येऊन बसतात आणि त्यांना हाकलत होता (मनात म्हंटलं झालं कल्याण आता)..तेवढ्यात आणखी एक मुलगा त्यांना विचारायला आला की एखादी सीट आहे का, लेडीज आहेत बरोबर तर त्याच्यावर पण खेकसले की लेडीज आहेत तर मी काय करु एकही जागा नाहीये जनरल मध्ये जा..आता म्हंटलं विचारुन उपयोग तर नाही, पण विचारलं नाही तर हे अशीही हकालपट्टी करणारच त्यापेक्षा विचारुया..म्हणून (जितका करता येईल तितका केविलवाणा चेहरा करुन) धाडसाने पण हळूच त्यांना विचारलं तर मलाही तेच उत्तर मिळालं फक्त जssरा सौम्य शब्दात 😁 ....तोपर्यंत ती मुलं खाली उतरुन निघून गेली तशी tc काकांनी शेजारच्या साईड लोवर बर्थला बसलेल्या ताईंना सांगितलं तुम्ही तो अप्पर बर्थ घ्या..

बरं आता पुढची पंचाईत म्हणजे ते tc काका आई बसलेली त्याच दिशेला जाणार होते आणि त्यांनी सीट नाही म्हंटल्याने मलाही यू टर्न घेऊन तिकडेच जाणं भाग होतं म्हणून वळले आणि हळू हळू जायला लागले तर मधे एक दोन जण उभे होते आणि एक विक्रेता आला म्हणून त्याला जागा द्यायच्या बहाण्याने दोन बर्थच्या मधल्या जागेत शिरले..तेवढ्यात तो विक्रेता, त्याच्या मागे एक माणूस आणि मग tc काका असे सगळे पुढे गेले..हुश्शss

नशिबाने आई माझ्याकडेच बघत होती, तिला हातानेच खूण केली की बसून रहा..नशिबाने tc काका पुढे निघून गेले..मग मी परत मागे वळले आणि त्या साईड लोवरला बसलेल्या ताईंना गाठलं, म्हंटलं "तुम्ही त्या अप्पर बर्थवर बसणार आहात का?" तर त्या नाही म्हणाल्या..म्हंटलं मग "माझी आई आहे बरोबर तिला बसवू का?" तर म्हणाल्या "माझी हरकत नाही पण tc आला तर तुम्ही बघून घ्या मला अजिबात मधे घेऊ नका!" म्हंटलं चालेल! तेव्हाचं तेव्हा बघता येईल! म्हणून तडक आईला गाठलं, तिने तोवर त्या मुलाला विचारलेलं की तुम्हाला झोपायचं आहे का तर तो नाही म्हणलेला म्हणून ती एका कोपऱ्यात बसून होती..पण तरी तिला म्हंटलं नको..तिकडे वर आहे जागा तर तिकडे बस, मी सामानापाशी इथे थांबेन! तिला घेऊन तिकडे जाते तोवर ती मगाशी tc काकांनी उठवलेली मुलं (एक मुलगा एक मुलगी) परत तिथे बसायला जात होती..आता त्यांना नाही कसं म्हणणार कारण सीट काही आपली नाही..म्हणून मग ती दोघं आणि आई असे तिघे तिकडे वर बसले..मग मी परत सामानापाशी आले.. फक्त पाठीवरची बॅग त्या मुलाच्या बर्थ वर कोपऱ्यात ठेवली आणि बाजूला उभी राहिले. मला उभं रहाणं सहज शक्य होतं, आणि दुसरीकडून विचार केला की आपण प्रवास करताना अशी तिकीट नसलेली माणसं आपल्या जागेवर अतिक्रमण करायला लागली तर आपल्यालाही त्रास होतोच की! त्यामुळे त्या मुलाने आईला बसायला दिलं हेच खूप होतं माझ्यासाठी..कारण ज्या दोन बायकांनी "आम्ही (रिकाम्या) अप्पर बर्थवर जाणार आहोत" असं सांगितलं त्या प्रवास संपेपर्यंत तिकडे फिरकल्याही नाहीत, ना त्यांना ती जागा आम्हाला द्यावी वाटली. फारतर काय आम्हाला बसायचं असेल तेव्हा उठा, किंवा थोड्यावेळ बसा असंही त्यांना म्हणता आलंच असतं की! पण छे! असो.. म्हणून त्या मुलाने दिलेल्या जागेचं मोल मला जास्ती वाटलं!


तर मग मी तिथे उभी होते, थोडा वेळ गेला आणि एक विक्रेता चहा घेऊन आला..माझ्या कानात हेडफोन्स होते..पण तो बराच वेळ माझ्या समोरच घरगुती चहा वगैरे काय काय बोलत होता..हेडफोन्स मुळे ऐकू येत नव्हतं पण लिप रीड केल्याने घरगुती चहा एवढं कळलं! तेवढ्यात एक बोगदा आला..तर तो मला खुणावू लागला की इथे जागा रिकामी आहे तर बसा (जिथे आई बसलेली, त्या मुलाच्या बर्थ वर)..मी हसून त्याला म्हंटलं आहे ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ..मग तो जरावेळ तिथे टेकला..बोगदा मोठा होता.. परत तो मला सांगायला लागला अहो बसा, जागा मिळत नाही पटकन...तरी मी म्हंटलं बसेन नंतर.. मग तेवढ्यात आणखी एक गृहस्थ आले, त्या मुलाचे कुणी नातेवाईक असावे, त्यांनी त्याला सांगितलं तुला तिकडे बोलावलंय..आणि ते तिथे बसले..बसले तसं त्यांनी मला बघितलं आणि तेही म्हणाले बसा ताई काही प्रॉब्लेम नाही..मग चहावाल्या दादांना कारणच मिळालं! ते लगेच म्हणाले अहो मी त्यांना तेच सांगतोय, आणि स्वतः जायला उठले आणि मला बसायला लावलं..मी पण म्हंटलं ठिके बसूया थोडावेळ..थोड्या वेळाने तो मुलगा परत आला तसं मी उठले आणि परत त्यांना म्हंटलं की तुम्ही दोघे बसा, मी उभी राहते...तर ते नंतर आलेले दादा स्वतःच उठले आणि मला म्हणाले की नाही नाही, तुम्ही बसा मी असंही दुसऱ्या डब्यात जातोय..आणि निघून गेले! मग काय, मस्त बसून प्रवास सुरु झाला..मग बऱ्याच वेळाने ते चहा विकणारे दादा सगळे डबे फिरून परत मागे आले..आणि माझ्यापर्यंत आले तरी पटकन त्यांच्या लक्षात आलं नाही..मग एकदम माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले बसलात ना तुम्ही, बरं झालं..आज गाडीला खूप गर्दी आहे..नशीब तुम्ही या डब्यात चढलात, मागे पुढे दोन्ही डब्यात पाय ठेवायला जागा नाही, हाच डबा त्यातल्या त्यात रिकामा आहे. मग गप्पा सुरु झाल्या, कुठे रहाता, गाव कुठलं काय करता..मग त्यांना सांगितलं आमची गाडी कॅन्सल झाली म्हणून अचानक यावं लागलं वगैरे..मग त्यांनी सांगितलं की ते खेडचेच आहेत..कुणाच्या हाताखाली नोकरी करायला आवडत नाही त्यामुळे हा व्यवसाय करतात, खेडमध्ये एक दुकान आहे तिथे आई बसते..एकूण बरं चाललंय! त्यात मधे दोनदा चहा घ्यायचा आग्रह केला, पण मी चहा/कॉफी घेतच नाही म्हंटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. मग बऱ्याच गप्पा झाल्यावर शेवटी ते म्हणाले तुम्ही एक घोट चहा पिउनच बघा, एकदम घरगुती आहे आणि एका कपात त्यांनी अगदी घोटभर चहा भरला. आता अगदी खरं सांगू तर मला चहा अजिबात आवडत नाही, पण मला नाही मोडवला त्यांचा आग्रह..अशी निर्मळ माणसं हल्ली दुर्मिळ झाली आहेत!

त्यामुळे मी तो कप घेतला आणि त्यांना म्हंटलं की असाच नका देऊ, पैसे घ्या तर म्हणाले ५-१० रुपये चालणार नाहीत, द्यायचे तर ५००-१००० द्या! आता काय बोलणार! मी त्या चहाच्या कपाचा एक फोटो काढला तो हा!

त्यांनी लगेच मला विचारलं हे काय केलं? तर म्हंटलं पुढे कधी हा फोटो बघताना या प्रसंगाची आठवण होईल म्हणून फोटो काढला, तसे ते हसले! 

आणि मी चहाची चव घेतली, कित्येक वर्षांनी चहा पीत होते बहुतेक..पण अगदी खरं सांगते, खरंच फार अप्रतिम चव होती त्यांच्या चहाची! मग त्यांना म्हंटलं थांबा, माझ्या आईला चहा फार आवडतो, फक्त तिने आधीच घेतला नाहीये ना विचारते म्हणून तिला फोन केला तर तिने नव्हताच घेतला चहा..मग त्यांना एक कप भरायला सांगितला तसे खुश झाले! मी बळच २० रुपयांची नोट देऊ केली आणि ठेवा म्हंटलं, पण त्यांनी अगदी प्रामाणिकपणे एक दहाचं नाणं माझ्या शेजारी बर्थ वर ठेवलं आणि म्हणाले मला उतरायचं आहे, तुम्हीच आईंना चहा नेऊन द्या..आणि जाता जाता सांगून गेले मी मांडवी, मंगलोर एक्सप्रेस आणि पॅसेंजरला मी कायम असतो..पुढच्यावेळी आलात की नक्की ओळखा मला आणि गेले सुद्धा! म्हणून म्हणतात ना, कोकणची माणसं साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी!


आता पुढील प्रवासात मी या दादांना कशी नाही ओळखणार सांगा? देव काय फक्त देव्हाऱ्यात नसतो, तो अशा माणसांच्या रूपाने कायम भेटत असतो, तुमची काळजी घेत असतो आणि तुम्हाला पदोपदी माणुसकी जपणारी अशी लाख मोलाची माणसं देत असतो! आता लोक म्हणतील एक साधा चहावाला काय भेटला तर आयुष्याची फिलॉसॉफी झाडायला लागली, म्हणूदे लेकाचे! पण अशा लहान लहान गोष्टीतला आनंद म्हणजेच भरभरुन जगणं असतं ना?


गेल्या दहाबारा वर्षातल्या भारतातील प्रवासात अशी अनेक देवमाणसं मला भेटली...आता हे लिहितांना वाटतंय एक सिरीजच करावी त्या भेटलेल्या माणसांच्या गोष्टींची!

बघू कधी सुचतंय!


आणि हो, पुढे माणगाव गेल्यावर काही वेळाने तो मुलगा उठला आणि मला म्हणाला बसा तुम्ही, मी जातोय आता! मग काय, आईला बोलावून घेतलं आणि उरलेला प्रवास देवाच्या कृपेने मस्त बसून गप्पा मारत, सुर्यास्ताचा आणि मग संधीप्रकाशाचा आनंद घेत केला!


अशी ही आमच्या अचानक झालेल्या कोकण रेल्वे प्रवासाची गंमत, तूर्तास इथेच थांबते..पुन्हा भेटू लवकरच!!


आणि हो, तुम्हाला हे दादा भेटले तर त्यांच्याकडचा घरगुती चहा जरुर घ्या बरं का!


 ©कांचन लेले



Friday, 28 June 2024

शंभर नंबरी सोनं कांचन!



माझी धाकटी मुलगी कांचन... मला तिच्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे.

लहानपणी बुद्धीने अतिशय तल्लख पण लाजरी बुजरी असणारी.. तीन वर्षाची असल्यापासून बरेच श्लोक, स्तोत्र तोंडपाठ पण स्पर्धेसाठी कुठे नेलं आणि तिचं नाव घेतलं की रडायला सुरवात आणि आमची वरात परत घरी. मी नेहमी विचार करायचचे, करायचं काय हिचं?

हीच्यावेळी गरोदरपणात मी गुरुग्रहाचा बराच जप केला होता, आपण म्हणतो ना गर्भसंस्कार करावेत...त्यामुळे मला असे वाटते त्या जपाचा चांगलाच परिणाम झाला आणि मुलगा झाला नाही पण मी शंभर नंबरी सोन्यासारख्या मुलीला जन्म दिला. कांचन लहानपणापासून खूप सद्गुणी..मग तो जेवणाचा विषय असो की अभ्यास. मला कधी ओरडावं लागलंच नाही. उलट तनुजा, माझ्या मोठ्या मुलीला आम्ही सांगायचो की बघ कांचन कशी जेवत्ये.



खरंतर हे मनोगत मी ह्या वर्षी लीहित्ये कारण हा लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस आहे. आणि नेहमी प्रमाणेच तिच्या लग्नानंतरच्या पाच महिन्यात तिच्या सर्व वागणुकीने मला पुन्हा आश्चर्यचकित केलंय आणि कृतकृत्य केलय.

लहानणापासूनच कांचन अतिशय शांत, नम्र. तिच्याकडे नुसतं बघून कधी कळणार नाही की ती खूप हुशार आणि बुद्धिमान आहे, पण तिच्या प्रत्येक कृतीमधून हा प्रत्यय येत राहतो. अशी किती उदाहरणं आहेत की आमची कांचन कुठलंही काम लीलया पार पाडते.


बाबा तर तिला just dial म्हणतात! कारण काम कोणतंही असो म्हणजे रंगकाम, वस्तुखरेदी, घराचे cleaning, कोणाकडे काही वस्तू पाठवायची, कांचन ते काम चुटकीसरशी करते. कधी - कसं जमेल? होईल की नाही?, असं तिचं काही नसतंच.

ती all rounder आहे. अभ्यास, वक्तृत्व, खेळ, हार्मोनियम वादन, गाणे सर्वच गोष्टींमध्ये सहभाग. बाकीचे काम तर आहेच.


चौथ्या इयत्तेत असल्यापासून कांचन अंकुश दीक्षित सरांकडे गाणे शिकत आहे. ते वारकरी पंथाचे असल्याने आळंदी-देहू-पंढरपूर येथे नेहमीच भजन, कीर्तनाला जाणे, प्रवचन तसेच सप्ताह अश्या सर्व गोष्टी कांचन सुद्धा बरेच वर्ष करते आहे. ह्या सर्व संस्कार आणि वातावरणामुळे तिचं व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे घडत गेले.

आणि निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम तिच्या वर्तणुकीत दिसून येतो.


ताई आणि तात्या लिमये म्हणजे माझी मोठी नणंद आणि तिचे यजमान आमच्या बाजूच्याच खोलीत राहत होते. त्यांनी माझ्या मुलींवर खूप प्रेम केलं. तनुजा आत्याची आणि कांचन उर्फ पप्या तात्यांची अशी वाटणी झालेली होती. तात्यांची सर्व बाहेरची कामं करण्यासाठी हक्काचा विश्वासू माणूस म्हणजे कांचन. बँकेचं पासबुक भरायचं, चेक भरायचे, पैसे काढायचे, औषधं आणायची, दिवाळीला आकाशकंदील आणायचा-लावायचा सर्वच कामं कांचन बिनबोभाट करायची. 

सर्व बाहेरची कामं कुशलतेने करणारी माझी मुलगी घरातील कामात मात्र फार क्वचितच मदत करायची. मी तर नेहमी म्हणायचे कांचन आमच्याकडे पेईंग गेस्ट आहे. कारण ती कधी दिवसा घरी सापडणे कठीणच असे.

तिचा अजून एक अतिशय चांगला गुण म्हणजे माणसं जोडणे, जमेल तेवढी सर्वांना मदत करणे आणि एखाद्या कामात झोकून देणे. तन मन धन अर्पून मदत करणे. कोणालाही काही गिफ्ट द्यायचे असेल तर लगेच त्या माणसाबद्दल सर्व माहिती विचारून घेणार आणि मगच त्याला साजेसं गिफ्ट घेणार. उगाच द्यायचं म्हणून द्यायचं नाही असं तिचं ठाम मत.


कोणतंही काम मन लावून करायचा हा तिचा स्वभावच आहे. भाज्या तर इतक्या बारीक आणि एकसारख्या कापते की बघतच रहावं!

घरातील काम, स्वयंपाक कधीही न करणारी माझी ही मुलगी. एका वर्षी नवरात्रीत माझ्या आईच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती त्यामुळे दसऱ्याला मी घरी नव्हते. पण हिने बाबांना कळू नये म्हणून स्वयंपाकघराचा दरवाजा लावून घेतला आणि पोळी भाजी आमटी भात कोशिंबीर सर्व स्वयंपाक करून बाबांना नैवेद्य दाखवायला सांगितला आणि मला फोटो पाठवला!


कांचनला नवीन गोष्टी शिकण्याचा कायमच उत्साह असतो. काहीतरी नवीन शोधायचं आणि ते शिकण्याची धडपड अखंड चालू असते. मेंदूला कायम खुराक. त्यामुळे उशिरा झोपणे, वेळेवर न जेवणे, आणि उशिरा उठणे हे ओघाने आलेच. मी काही प्रमाणात प्रयत्न केले पण अर्थातच निष्फळ झाले. पण तिच्या सर्व activities आणि speed ह्याला मॅच करणे एकंदरच अवघड आहे.

तनुजाने जेव्हा लग्न करते असं सांगितल तेव्हा मी आणि कांचन दोघींनी मिळून तिचं अनुरुपच्या साईटवरचं प्रोफाइल पूर्ण केलं. त्यानंतर लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि साधारण एक वर्ष झालं असेल, तनुजाने एके दिवशी सांगितलं की आता लग्न करण्यास हरकत नाही. दसऱ्याचा मुहूर्त होता आणि साधारण फक्त एक महिना असेल, पण कांचनने अगदी एकहाती स्वतःची नोकरी सांभाळून सर्व गोष्टी म्हणजे डेकोरेटर, हॉल, मेनू,  खरेदी, फोटोग्राफर, मेकअप, गिफ्ट, दागिने, खोल्यांची साफसफाई त्यात गाद्या-फॅन इत्यादी, नाश्ता-जेवणाची व्यवस्था, घरचं डेकोरेशन, सर्वच अगदी सहज पार पाडले आणि बहिणीचे लग्न कोणतीही उणीव भासू न देता करोना असून सुद्धा दणक्यात केले.


त्यानंतर एका वर्षाने कांचनचे पण लग्न ठरले. ते सुद्धा जबरदस्त चाळणी लावूनच. अटी अतिशय साध्या, पण कडक. कुठेही अशा अटी नाहीत जिथे काही मुलाकडून अपेक्षा असेल जसं की पगार किती, मोठे घर, गाडी - काहीच नाही. अट फक्त एवढीच की शाकाहारी आणि निर्व्यसनी पाहिजे. मला खरंच खूप कौतुक वाटलं तिचं. मला सांगितलं होतं तिने की मला अजिबात सोनं नको लग्नात, त्याचा मोह नको, पण देव कसा असतो आपण नाही म्हटलं की ते आपल्या मागे लावून देतो, असो! लग्न ठरल्यानंतर तिने आणि अनिरुद्ध दोघांनी मिळून स्वतःचे छोटेसे घर घेतले, मला खूप आनंद झाला.


 सर्वच गोष्टी अतिशय विचार करून, आपल्याला काय झेपेल हे बघून अतिशय ठाम निर्णय घेणे हा तिचा स्वभावच आहे. कांचनच्या लग्नात आदरणीय बंडातात्या कराडकर आले. सगळं भरून पावलं. 


कांचनच्याच काहीतरी चांगल्या कर्माची फळं आम्हालाही मिळाली. कसं प्रेम असावं? एवढे मोठे संत माझ्या मुलीला आशिर्वाद देण्यासाठी प्रकृती ठीक नसतानाही लांब प्रवास करून आले. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. अजून काय हवं आयुष्यात ?


साखरपुडा तर मुटाटला आमच्या गावच्या घरी झाला. काय तो सोहळा आणि काय ते कौतुक, अवर्णनीय! आणि ठरवून सुद्धा होणार नाही असं डेस्टिनेशन वेडिंग दापोलीला ज्ञानप्रसाद येथे फाटक काकांच्या नियोजनखाली, जेवण, व्यवस्था सगळंच अप्रतिम. कृतकृत्य झाले मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे सासू सासरे अतिशय हौशी आणि प्रेमळ आहेत याचा मला अतिशय आनंद वाटतो.


तिचं लग्न ठरल्यापासून मला नेहमी प्रश्न पडे तिच्या सासूबाई एकदम सुगरण, कांचन घरी स्वयंपाकाचं काय करेल? घरचं काम कसं करेल? आईचे भाबडे विचार. पण मला नेहमीच आश्चर्याचे धक्के नाही दिले तर ती कांचन कसली. पण ते माझे प्रश्न मी माझ्या मनातच ठेवले कारण मनात कुठे तरी तिच्याबद्दल विश्वास होताच. आणि तो तिने सार्थ ठरवला. कांचन सकाळी उठून अनिरुद्धला डबा देते हे कळल्यावर माझ्या काय भावना होत्या हे खरंच मी सांगू शकत नाही. 


तसेच दोघं मिळून घरातील सर्व कामं करतात. मी धन्य झाले. कारण ती खरंच इथे होती तेव्हा खूपच बिझी असायची त्यामुळे घरातील कामांशी तिचा फारसा संबंध आला नाही. 

हल्ली मी जेव्हा भजन-कीर्तन अशा कार्यक्रमांना तिच्याबरोबर जाते आणि कोणी ओळख करून दिली की ही कांचनची आई, की लगेच समोरचा म्हणतो तुम्हाला साष्टांग नमस्कार. त्यावर मी त्यांना म्हणते माझं काही नाही, तर तेच मला म्हणतात की तुम्ही तिला जन्म दिलात आणि चांगलं घडवलत हेच खूप आहे! काय अभिमान वाटतो. देवाची कृपा आहे आणि काही माझी पुण्याई...


अशी ही माझी संयमी, हुशार मुलगी, आईला भक्कम पाठिंबा देणारी, वेळ पडेल तेव्हा सल्ले देणारी, सर्वच जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पेलणारी. २९ जून हा तिचा वाढदिवस. तिला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो अशी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे मनोगत संपवते..!

- डॉ. सौ. पल्लवी लेले

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...