Sunday, 6 February 2022

लता..


लता दीदी गेल्या..
आज एका विलक्षण सांगीतिक युगाचा अंत झाला..
असं कितीही वाटलं की आता ९२ वर्षं म्हणजे काही कमी नाही, खूप उत्तम जगल्या वगैरे वगैरे तरी ती एक पोकळी जाणवतेच, ती कधीच भरुन निघणार नाही.

आयुष्यात एकदा त्यांना भेटायचा योग आला, तो सुद्धा इतका विलक्षण!
शिवसेनेने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात दीदी गाणार आणि त्यांच्या बरोबर महानगर पालिकेच्या शाळांतिल मुलं गाणार असा कार्यक्रम होता..वर्ष असावं २०१०..
तेव्हा आमचे सर महानगरपालिकेतील शाळेत संगीत शिक्षक असल्याने आम्ही तो चान्स सोडण्याचा प्रश्नच नव्हता..
कार्यक्रमाच्या दिवशी कडक बंदोबस्तात कसे बसे आत गेलो..
स्टेजवर मांदियाळीच होती..साक्षात वंदनीय बाळासाहेब ठाकरे उभे होते! त्याबरोबर अनेक ज्येष्ठ नेते, कलाकार..
आणि मग स्टेजच्या एका बाजूला लिफ्ट सारखि काहीतरी योजना केलेली होती त्यातुन दिदींची एन्ट्री झाली!
सगळं वातावरणच भारावून टाकणारं होतं.
खुल्या आसमंतात त्यांचा घुमणारा स्वर त्या बालवयात सुद्धा अंगावर रोमांच उभे करुन गेला..पण तेव्हा हे का झालं ते कळलंही नसावं!

कार्यक्रम झाला तसे सगळे स्टेजच्या मागे काही टेम्पररी रुम बांधलेल्या तिकडे धावले.. म्हणजे तिथे दीदी आहेत हे कळलं!
त्या प्रचंड गर्दीत सगळ्यांची चुकामुक झालेली. पण सगळे तिथेच भेटतील हे मात्र माहीत होतं! सर मुलांची व्यवस्था करायला गेले, त्यांच्या दोन्ही मुली त्या रुम कडे जाताना मला दिसल्या, तशी मी सुद्धा गेले..पण मला जरा वाट काढत जायला वेळ लागला, माझ्या समोर त्या आत जाताना गेल्या..मी जायला आणि त्या गार्ड ने दरवाजा लावून घेतला! कारण एकाएकी खूपच झुंबड उडाली..मी त्या गार्ड शेजारीच उभी होते. मुळातच स्वतःच्या तोंडाने असं मागून काही घेण्याची सवय नसल्याने मी काही त्याला "मला आत सोडा" असं म्हंटलं नाही, पण तिथून हटले सुद्धा नाही..पण बाकी लोक अगदी हमरी तुमरी वर येऊन त्याच्याशी भांडत होते..
मला मनातल्या मनात मात्र एकाच वेळी आपली वेळ किती चांगली आणि किती वाईट असं वाटत होतं. आत्तापर्यंत जे अनुभवलं ते अविस्मरणीय होतं म्हणून चांगली आणि काही क्षणांच्या फरकाने आपण बाहेर राहिलो म्हणून वाईट..
मग सर आले, त्यांना मी दिसले तशी ते मागून त्या गार्डच्या तिथे आले..माझ्याकडून बाकी सगळे आत गेले आणि मी एकटीच बाहेर राहिले कळल्यावर माझ्यापेक्षा त्यांनाच वाईट वाटलं आणि मग ते गार्डला हिला एकटीला तरी सोडा आत, लहान आहे वगैरे सांगून बघत होते. पण काही उपयोग झाला नाही. नंतर काही जवानांनी येऊन सगळी गर्दी मागे करायला सुरुवात केली, तसं त्या गार्डला काय वाटलं देव जाणे, त्याने आम्हाला दोघांनाही खुणेने आत जायला सांगितलं..

काय वाटलं त्या क्षणी हे १० मिनिटं शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करतीये, पण ते अशक्य आहे. 

आत गेलो तर कोचावर दीदी बसलेल्या. अक्षरशः हात पाय कापायला लागले होते. मी कशी बशी वही आणि पेन त्यांच्यापासून थोडं लांब धरलं, तसं त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं व वही घेतली..ती घेताना त्यांच्या मऊसूत हाताचा स्पर्श आजही जाणवतो..त्यांनी धरलेलं पेन मी कित्येक दिवस तसंच ठेऊन दिलेलं..आजही जुन्या सामानात ते नक्कि असेल..
त्यांनी वही घेतली आणि मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!
सही करुन होईपर्यंत काही मी डोकं काढलं नाही, आणि नंतर काढायला गेल्यावर त्यांचा हातच डोक्यावर असलेला जाणवला!
किती भाग्यवान समजावं स्वतःला..
काहीही बोलायची हिंमतच नाही झाली..मग बाकीचे लोक आले, मी जरा बाजूला होऊन बघत होते..तेव्हा मुद्दाम बहिणीचा Nokia 3110 घेऊन गेले होते त्याची आठवण झाली..आणि हळूच त्यांचं लक्ष नसताना हा काढलेला फोटो! तोही काढताना माझे हात थरथरत होते!

आज शिवाजी पार्कात लांबून सुद्धा लोकं "सेल्फी" घेताना बघुन कीव करावीशी वाटली..

तो दिवस आणि आजचा दिवस..

गेले काही दिवस सतत विविध बातम्यांनी उद्रेक केलेलाच..शेवटी आज तो दिवस आलाच..काल वसंत पंचमीला सरस्वती आली, आणि आमच्या भूतलावरच्या या सरस्वतीला घेऊन गेली..

दुःख होतच होतं, पण संध्याकाळी जशी अंत्ययात्रा निघाली, ती बघितल्यावर काय आतमध्ये झालं आणि आपण अंत्यदर्शनासाठी गेले पाहिजे असं तीव्रपणे वाटलं. दर्शन मिळणार नव्हतंच, मिळालं तरी दीदी दिसतील असंही नव्हतं..त्यापेक्षा दिवसभरासारखं tv समोर बसलेलं बरं.. 
पण असं वाटलं ही बाई, जिने इतकं समर्पित आणि पवित्र जीवन व्यतीत केलं..
आज पवित्र अग्नित तिचं मिलन होणार..
ज्या अग्नीला हिंदु धर्मात सर्वोच स्थान आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे त्या अग्नित आज आमची पवित्र देवी समर्पित होणार!
अस वाटलं,
त्या अग्निचं दर्शन घेतलंच पाहिजे..
त्या क्षणी त्या पवित्र ज्वाला वाऱ्याबरोबर अंगावरुन गेल्या पाहिजेत..
त्या क्षणी तिथे अंगावरुन जाणारा प्रत्येक धूलिकण आपल्यात रुजला पाहिजे..
म्हणून गेले..

दीदींचं आयुष्य बघितलं तर त्यात संपूर्ण समर्पण भरलेलं आहे..
त्यासाठी त्यांनी स्वतःला घातलेल्या नियमांचा अभ्यासच केला पाहीजे!
कपड्यापासून संसारापर्यंतचे असंख्य मोह त्यांच्यासमोर आले नसतील..? 
आपल्याला साधी पाणीपुरीची गाडी दिसली तरी मोह आवरत नाही!
पण काय निर्धार असेल..? काय श्रद्धा असेल..? काय समर्पण असेल स्वरांसाठी..!

आमच्या सुदैवाने लहानपणीपासूनच आमच्या आईवडिलांनी चांगल्या गाण्याचे, चांगल्या साहित्याचे संस्कार केले..
सकाळ व्हायची तीच मुळी रेडिओने! त्यामुळे नकळत्या वयातच काही आवाजांनी मनावर गारुड घातलेलं..चांगलं संगीत म्हणजे उत्तम शब्द, उत्तम संगीत आणि उत्तम स्वरसाज यांचं मिलन असतं हे नकळतपणे मनावर बिंबवलं गेलेलं. 
त्यामुळे हल्लीची ८०% गाणी ही खरंच संगीत प्रकारात मोडण्याइतकी तरी बरी आहेत का? हा प्रश्नच पडतो आणि आजही असंख्य भारतीय जुनं सिनेसंगीत ऐकणं पसंत करतात..

दीदी नाही, गानसरस्वती नाही, गानकोकिळा नाही तर तमाम भारतीयांच्या मनामनात रुजलेली, अंकुरलेली ती लताच!

आमच्या पिढीने मागच्या पिढीकडुन ऐकलेले उद्गार हे असेच आहेत..ऐकलं की खरंच असं वाटेल की ही लता म्हणजे रोज चहाला येणाऱ्या कुणी ओळखीच्या बाईच आहेत!
पण त्यांच्यासाठी लता म्हणजे तितकीच जवळची आहे!

"काय साला आवाज आहे लताचा!" असं मी कित्येकदा ज्येष्ठ मंडळींच्या तोंडून ऐकलं आहे!

विद्यार्थी म्हणून विचार करायला गेलं तर, एकेका गाण्याचा अभ्यास केला तर किती बारीक बारीक जागा, त्यातलं एक्सप्रेशन, कुठे श्वास घेतला असेल हा विचार करुनच अचंबित व्हायला होतं!

पू लं म्हणतात तसं लता ही एकमेव गायिका आहे जिचा आवाज प्रत्येक सेकंदाला जगात कुणी ना कुणी ऐकत असेल!

विचार करा, काय भव्यता आहे!
पण आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की नुसता आवाज नाही, तर चांगलं संगीत त्यांनी पोहोचवलंय..
त्यांनी काहीही गायलं असतं तरी ते चांगलंच झालं असतं.. पण त्यांनी काहीही गायलं नाही !

आज जर आपल्याला त्यांना श्रद्धांजली द्यायची झाली, तर आपलं हे कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला चांगल्या संगीताची ओळख करुन दिली पाहिजे. 
त्यांच्या कानावर चांगलं संगीत पडलं पाहीजे..
पुढील अनेक पिढ्यानी या गानसारस्वतीची पूजा केली पाहिजे!
पुढच्या अनेक पिढ्यात जन्माला येणारी मुलं त्यांच्या अंगाईने झोपली पाहीजेत..
प्रत्येक प्रेमिकेने मेरा साया साथ होगा म्हंटलं पाहिजे..
देशाच्या प्रत्येक जवानाची किंमत ए मेरे वतन के लोगो ऐकून कळली पाहिजे..
पुढील अनेक पिढ्या काय, या जगाच्या अंतापर्यंत हे सगळं करण्याची ताकद त्या आवाजात आहे..
आणि म्हणून लता खऱ्या अर्थाने अजरामर आहे!
कारण..

उसकी आवाजही पेहचान है..

©राधा_उवाचं..

- कांचन लेले

12 comments:

  1. Superb write up... 👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. प्रत्येक भारतीयांच्या मनातल्या भावनांचं हे शब्दांकन आहे.....

    ReplyDelete
  3. उत्तम लिखाण.... दीदीं बद्दल च्या भावना खूप छान मांडल्या आहेत.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर. मनाला भावले. लतादीदींच्या आवाजाची जादू अशीच आहे. 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. अप्रतिम.... खूपच भावनीय.... लता दीदी बद्दल किती ही लिहिले तरी ... कमीच...

    ReplyDelete
  6. व्वा....खूपच छान अनुभव सांगितला....खूप छान लिहिलं आहे

    ReplyDelete
  7. Vaishali Wallamwar7 February 2022 at 02:58

    सगळ्यास एक आज व्याकूळ खंत आहे,
    कोकिळेविना कसा हा नवा वसंत आहे..����

    ReplyDelete
  8. सगळ्यास एक आज व्याकूळ खंत आहे,
    कोकिळेविना कसा हा नवा वसंत आहे..😔😢

    ReplyDelete
  9. व्वा ! खूपच छान ! आणि हृदयस्पर्शी.

    ReplyDelete
  10. Khup chhan likhaan aahe tuze..

    ReplyDelete
  11. Very well said Kanchan...

    ReplyDelete

Featured post

29 on 29th with a twist..!

मनुष्यजन्म मिळाल्यानंतर सगळ्यात भाग्याचं काय असतं? तर जन्म भारतात, त्यातही महाराष्ट्रात आणि त्यात मुंबईत होणं! पोटात असल्यापासून...