Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Monday 23 April 2018

अंत


पृथ्वीतलाच्या भवपटलावर विधात्याने मांडलेल्या खेळातील कटपुतळ्या म्हणजे माणूस…
या पृथ्वीवर एके काळी जीव निर्माण झाला..
मग जीवाचे विविध प्रकार निर्माण झाले..
सुक्ष्मापासून सुरुवात होऊन अगदी अवाढव्य जीव सुद्धा ह्या पृथ्वीने निर्माण केले..आणि पुन्हा स्वतःच्या पोटात त्यांना जागा दिली…
मग पाण्यात रहाणारे, जमिनीवर रहाणारे चार पायी,  अवकाशात उंच भरारी घेणारे दोन पायी, सरपटणारे, वळवळणारे, कीटक, अनेक पायी इत्यादी इत्यादी…आणि प्रत्येक प्रकाराच्या अनेक जाती…variety मध्ये कुठेही कमी ठेवली नाही त्या विधात्याने…
सोबतीला हिरवागार निसर्ग दिला..डोंगर दऱ्या, धबधबे, महासागर, समुद्र..प्रदेश जोडणाऱ्या आणि अवखळपणे वाहणाऱ्या नद्या दिल्या..
वरती आकाशात दिवस रात्रीची विभागणी करून दोन खंदे पहारेदार दिले ते म्हणजे चंद्र-सूर्य..आणि रात्रीच्या अंधाराला चंद्राला आणखी अगणित हात म्हणून तारका दिल्या…
आणि या सगळ्यांची काळजी घेणारा आणि सर्वत्र विहार करणारा वायू दिला…
पुढे या सगळ्याची सुंदर गुंफण होऊन ऋतुचक्र सुरू झालं…विविध ऋतू काही काळाने बदलत गेले..मग त्या त्या ऋतूमध्ये वाढणारी झाडं-फळं-फुलं आली..
अगदी अगदी दृष्ट लागण्यासारखं जग निर्माण केलं..
मग या जगाला खरी दृष्ट लागली…किंवा या जगाचा उद्धार करण्याची क्षमता खऱ्या अर्थाने असणारा निर्माण झाला…जो अर्थ वाटतो तो घेऊ शकतो!
मानवाची उत्क्रांती झाली…
असं मानलं जातं की माकडाच्या विशिष्ट जातीतून पुढे मानवाचा जन्म झाला…
आता इतके जीव निर्माण केले त्यात मानव आणखी एक, त्यात काय नवल…?
पण कदाचित माणूस निर्माण करताना विधाता द्युत खेळत असावा कदाचित…म्हणून अशी चमत्कारिक निर्मिती त्याच्या हातून झाली!
पुढे माणसाने खऱ्या अर्थाने सिद्ध केलं की तो ह्या सृष्टीची सर्वोत्तम निर्मिती आहे..जग कुठून कुठे नेऊन ठेवलय आज माणसाने! केवळ त्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर अनेक शोध लावले, विज्ञानात प्रचंड प्रगती केली!
ह्या सगळ्या निर्मितीनचा मिलाफ करून जे जग निर्माण केलं ते तर किती अद्भुत!
कवी संदीप खरे म्हणतात
"सुरवंटातून कधी सुरंगी फुलपाखरे उमलवशी,
कोठे राजस कमळ फुलवुनी भवताली चिख्खल रचशी,
जलथेंबांचे करशी मोती, मोत्याची माती करशी,
ज्याची त्याचि मापे सारी काय हिशोबाने भरशी…?!"
या शेवटच्या ओळीवर मात्र मला कायम थबकायला होतं…
फक्त एकाच गोष्टीवर आजवर कुणालाही उपाय शोधता आला नाही…
कुठली गोष्ट…? सोप्पं आहे की…
मरण…
मृत्यू..
अंत.
कधी केव्हा कुठे येईल हे आजवर कुणालाही सांगता आलेलं नाही…मग तो कितीही मोठा वैज्ञानिक असो किंवा सामान्य माणूस असो…
या एका भीतीने पछाडलेला असतो माणूस अंतर्बाह्य...
उपाय मात्र काहीच नाही…
म्हणून सुरवातीलाच म्हंटलं, मनुष्य म्हणजे केवळ कटपूतळी आहे…केव्हा खाली सोडायची आणि केव्हा वर उचलून आणायची हे मात्र त्याच्या हातात…
पण तरी प्रश्न उरतोच तो म्हणजे
"ज्याची त्याची मापे सारी काय हिशोबाने भरशी…?"
काय अधिकार असतो त्याला भरलेल्या संसारातून एखाद्याला घेऊन जायचा…?
काय अधिकार असतो एखाद्या लेकराला माता-पित्यापासून वेगळं करण्याचा..?
काय अधिकार असतो अंगा खांद्यावर खेळलेल्या, नुकत्याच वयात आलेल्या मुलाला आई-वाडीलांदेखत हिसकावून घेण्याचा…?
जन्माला आलेला मरणारच हे जर विधात्याने निर्मिलेल्या जगाचं सत्य असेल आणि जर मानव,पशु,पक्षी हे सुद्धा त्याचीच निर्मिती असेल तर मग मृत्यू पचवण्याची ताकद सुद्धा जन्मतःच का देत नाही तो या जीवांना…? या अंतापायी किती क्लेश..?
एक कवी असं म्हणतो तर एक कवी, कवी भा. रा. तांबे मारणाचं सत्य स्वीकारून आणि त्याहीपुढे जाऊन म्हणतात,
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?
खरंच..काय बदलतं एक सामान्य व्यक्ती गेल्याने..? ह्या अवाढव्य जगात त्याचं वलय ते किती..? १००० माणसाचं..? डोक्यावरुन पाणी १०००० माणसाचं..?
पूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात ही संख्या खूपच क्षुल्लक नाही का..?
माणसाच्या जाण्यानं ना चंद्र-सूर्य त्यांचं कार्य थांबवतात ना ऋतू…काळ पुढे जातच रहातो..
आणि मनुष्य सुद्धा पुढे जातोच की…आपली कितीही जवळची व्यक्ती गेली तरी आपण काही दिवसांपलिकडे निष्क्रिय बसूच शकत नाही..शेवटी पापी पेट का सवाल है ना!
पण ह्या मृत्यूच्या त्रासाचं खरं कारण  मात्र वेगळंच आहे..ते म्हणजे भावना..किंवा भावनिक गुंतवणूक…कुठल्याही FD पेक्षा मौल्यवान…
देवाने शरीरात जे अवयव दिले त्या बरोबरच एक अदृश्य मन दिलं…आणि याच मनावर चालतो खरा आयुष्याचा खेळ!
जो माणूस आपल्या मनातून उतरलेला असतो त्याच्या मृत्यूने आपल्याला विशेष फरक पडत नाही..पण एखाद्या जीवलगाचा मृत्यू मात्र कायमचा चटका लावून जातो…अंताची क्रिया समान आहे, पण फरक पडतो तो भावनिक गुंतवणुकीने…
आपण आपल्या माणसाला जीव लावतोच, आपल्या म्हणजे रक्ताच्या नात्याने जोडलेल्या! पण माणसाच्या छोट्याशा विश्वात असे अनेक जीवलग येतात ज्यांचा त्याच्याशी खरंतर काही संबंध नसतो…पण कधीकधी सूर जुळायचे असतात ते जुळतातच!
मग दिवसागणिक नातं फुलत जात..
आणि दिवसागणिक माणूस इतका सवयीचा होतो, की आपण आपल्याच माणसाला गृहीत धरत जातो..
आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटायला वेळ काढायला दिरंगाई करतो, वेळ द्यायला मागे पुढे बघतो…
भेटू ना उद्या, कुठे पळून जातोय…असा विचार करतो…
आणि..आणि अशाच वेळी नेमकी ती व्यक्ती पळून जाते…कायमची…जीवाला घोर लावून…
मग हातात उरतात त्या फक्त आठवणी…
ती व्यक्ती तर निघून जाते, पण प्रत्येक वेळी एखाद्या नेहेमीच्या भेटायच्या ठिकाणी गेलं की नकळत कुठेतरी ती दिसेल असं वाटतं..तिच्या आवडती गोष्ट समोर आली की घास नकळत अडकतो…
एखाद्या कलेशी ती निगडित असेल तर प्रत्येक उल्लेखासरशी तिची आठवण अगदीच ताजी होते..
तिच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक हाती घेतलं की मन भुर्रकन उडून त्या व्यक्तीपाशी जातं..
अगदीच काही नाही तर एखाद्या दिवशी चांगली घटना घडली की रात्री उशीवर डोकं टेकल्या टेकल्या डोळे भरून येतात…
आणि शेवटी म्हणजे त्याच्या वाढदिवसाला आणि मृत्यू दिवसाला दिवसभर अस्वस्थता वाटते..
आणि सतत काहीतरी राहून गेल्याची भावना मन खात रहाते…दुःख करत बसण्यापलीकडे हाती काही उरत नाही…श्वास बंद पडत नाहीत की भूक लागायची थांबत नाही…पण ज्याच्यासाठी घालमेल होते तो मात्र कुठेतरी शांssत असतो…अगदी शांत..
मृत्यू अटळ आहे, आणि त्याची नेमकी वेळ कळणंही अशक्य आहे हे त्रिभुवनातील सत्य आहे!
अशावेळी मृत्यू, स्वतःचा व स्वतःभोवतीच्या लोकांचाही कसा सुसह्य करू शकतो आपण एवढंच आपल्या हातात रहातं…
मृत्यू हे एक असं सत्य आहे जे कधीच सुसह्य असू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे…
पण तरी..
आणखी एक गोष्ट एकदम खरी आहे ती म्हणजे अंत हा सगळ्यात मोठा गुरू आहे…तो खूप काही शिकवून जातो…
अशाच एका जीवलगाच्या जाण्याने धक्का बसला होता किंबहुना आहे..पण त्याने खूप काही शिकवलं...
आपण मृत्यू सुसह्य करू शकत नाही कदाचित, पण ईच्छापूर्ती नक्कीच आपल्या हातात असते!
आपल्याकडे असं मानतात की माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर तो सुखाने पुढील प्रवासास जातो..आणि अपूर्ण इच्छा असतील तर त्याचा आत्मा घुटमळत रहातो…
खरं खोटं माहीत नाहीत, किंवा विश्वास ठेवणं व्यक्तिसापेक्ष असू शकतं! पण ह्याचाच दुसरा अर्थ असा की माणसाचं इच्छित त्याला मिळत असेल, तर तो आनंदी असतो…आणि मृत्यू यायचाच असेल तर आनंदी असतानाच यावा! इतकं साधं गणित..
त्यामुळे या पुढे,
आई म्हणाली देवदर्शनाला जावं वाटतं, तर अगदी सुट्टी काढून जा..
वडील म्हणाले तुला पायावर उभं राहिलेलं बघायचं आहे तर झोकून कामाला लागा..
लेकरू म्हणालं माझ्याशी खेळा ना, तर बिनपगारी रजा घेऊन मनसोक्त खेळा त्याच्याशी…
आणि एखादा जुना मित्र म्हणाला की खूप दिवस झाले रे भेटून, भेटूया का..?
तर त्याच दिवशी भेटायला जा..
कारण उद्या कोणीच बघितलेला नाही..
आणि या बाबतीत उद्याची वाट बघणाऱ्यांचे हाल कुत्रंही खात नाही, असं म्हणावं लागेल असे अनुभव प्रत्येकालाच आले असतील…
कित्येक वेळा भेटायचं राहून जातं आणि ती व्यक्ती भेटण्याच्या कितीतरी पलीकडे निघून जाते एक क्षणात! आपण मात्र पश्चाताप करत राहतो आयुष्यभर!
या पेक्षा थोडी तडजोड करून नाती जपुया!
आदि-अंत आपल्या हाती नाही, पण वर्तमान आपल्या हाती आहे…आपल्या माणसाला आपल्या जवळ ठेवा..पैसा ऐहिक सुख मिळवून देऊ शकत असेल पण मायेने पाठीवर फिरणारा हात पैसा कधीच देऊ शकत नाही!
हल्लीच्या काळात पैशाने रोबोट विकत घेता येत असतील, पण त्यांना भावना नाहीत..आणि भावनांनी जोडलेलं जिवलग गमवण्याइतकं दुर्दैव दुसरं नाही!
एका आकस्मिक क्षणी सोडून गेलेल्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवशी अर्पण…
©कांचन लेले
२३-०४-२०१८

Image Credit - Google