Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Wednesday 26 August 2020

Connecting Connections!


To connect, is to bring together!
A connection is established when two things are linked or associated together!
But what if all these connections are again connected?
That is what I meant by connecting connections!

So here I am writing about a beautiful experience we had yesterday, that is on 25th of August 2020, of course virtually (maybe secretly thanking the pandemic situation in mind.)

The concept was of Kedar Naphade dada who is a senior disciple of Pt.Tulsidas Borkar guruji and is currently located in New Jersey. The idea was to take a week, schedule 4 sessions of two hours each, per day and include people or students all over the world in their preferable time slots, grouping them in 4 per session. 
Each session was very well articulated, the structure being -
Everyone joining over video call, firstly discussing about what is to be practiced and then taking a specific taan/alaapi/alankar/palta and practising it for 10 minutes by muting themselves. Then after 10 minutes each one is to demonstrate one by one how they practiced, the fingering used etc. 
 Again taking a goal and proceeding for next 10 minutes..this was the basic structure.

Kedar dada fondly called it 

 "Harmonium Hangout: Wicked Workout Week" 
 Or the
 "सुर-मय  सह-संवादिनी-साधना सप्ताह शिबिर"

I was a little intimidated being a novice amidst all these "दादा लोक" (as I love to call all of them). But Kedar dada saw to it that I joined..and I can't thank him enough!

So coming back to the title of this write-up..what were the connecting connections?

Firstly all the people participating were based in 
  New Jersey, Boston, Toronto, Mumbai, Thane, Pune, Bangalore, Koteshwar (Karnataka) and Raigad (Maharashtra)! 

We connected geographically!
Then we come to the participants, right from me (who must be the junior most) to Sudhir dada, Kedar dada or Ravindra ji who have decades of experience in the field and vast knowledge which I need not mention, all were at the same level trying to practice a particular taan/palta..
 Some were direct students of Borkar Guruji, some were students of Kedar dada, Sudhir dada and Siddhesh dada..but did it make any difference? 
Not at all!

Here we connected generations!

Did everyone have the same mother tongue?
No. Right from Marathi to Kannada to English, we all managed to converse well having bits of hindi as well!

Here we connected emotions inspite of the Language differences!

Yesterday's session was based on Jod Raagas which is a connection of two Raagas! 
As Sudhir dada enlightened us newbies जो राग जोडी से चलते है वो जोड राग!
Here we connected Raags! 

Borkar guruji was well recognized for his humor!
कोटी करावी ती गुरुजींनीच!
It seems all his students have taken the quality of Guruji and Ravindra ji added to it! What a session full of Puns we had, Hillarious! 
Here we bridged Humor!

After every 10 minutes and individual demonstrations a lot of discussion took place about chalan of a Raag, specifically Jod raag, the fingering techniques etc.
Here we connected thoughts!

And last, and the best!
We connected gharanas!

Were they all disciples of Borkar Guruji?
No..almost all were of Guruji's tradition, but Ravindra Katotiji who is a very senior Harmonium Player and is a senior disciple of the great Rambhau Bijapureji.

In Hindustani Classical Music the 'घराणेशाही' is always highlighted as the negative part of classical music. Right from the iconic play "कट्यार काळजात घुसली" to the very recent web series named Bandish Bandits, none is an exception. 

But I can proudly say that this
"Harmonium Hangout: Wicked Workout Week" or the "सुर-मय  सह-संवादिनी-साधना सप्ताह शिबिर" is an exception.

Here we didn't restrict people from participating on any basis, right from their guru gharana to their age or their experience.
Infact in yesterday's session Kedar dada specially asked Ravindra ji to demonstrate a raag composed by him named AtalMalhar!
And also discussed about Bijapureji's left hand technique. (followed by Puns of feeling of being "Left-out" etc!)
So getting to the point, connecting each others music, and taking the good from every style is what we, the younger generation is learning from our elder gurubandhus..
संस्कार संस्कार म्हणतात ते याहून वेगळे काय असतात?!

गुरुजींची शिकवण, या सगळ्या ज्येष्ठ गुरुबंधूंची अपार मेहेनत आणि आमच्या सागळ्यांप्रति आणि संगीताप्रति असलेल्या प्रेमाने मन भरुन गेलंय! 
बरेच दिवस अनेक गोष्टींमुळे बॅटरी लो झालेली, ती काल फुल्ल चार्ज झाल्यासारखं वाटतंय! आजच्या सेशन मधे पॉवर बँक सुद्धा चार्ज करुन घेईन म्हणते!
आणि तूर्तास इथेच थांबते!
©कांचन लेले

Friday 24 July 2020

व्रतस्थ...

असेही व्रतस्थ..
प्रिय डायरी,
आज खूप दिवसांनी तुझ्याकडे आले म्हणून रुसली नाहीयेस ना गं..?
पण तुलाही सांगितलं होतंच की..आमचं लग्न ठरल्याचं..
त्यामुळे तुझ्याशी कमी आणि त्याच्याशीच बोलणं जास्ती व्हायचं...तेवढं तर घेशीलच की समजून...
लग्नाची तारीख अशी दोन महिन्यावर आली असताना हा कोरोना येऊन ठाण मांडून बसलाय..कुठे जाणं नाही, कुणाला, म्हणजे अगदी अमितलाही भेटणं नाही..खरेदी नाही, निमंत्रणं नाही..काही काही नाही..
आणि त्यात जीवाला सतत घोर..माझं ऑफिस सुरू नाहीये, मी घरूनच काम करतीये..आई-बाबा सुद्धा घरीच आहेत...पण आता एवढं एकच घर नाही ना माझं..?
अमित रोज कामावर जातोय..सुट्टी वगैरे सब झूठ..कधीकधी तर ऑफिस मध्येच रहातोय..ठिकठिकाणी जाऊन लोकांची परिस्थिती  पडताळतोय..अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्सची मुलाखत सुद्धा घेतोय..काय करावं अशा वेळी..? जीवाला घोर लागणार नाही तर काय..?
मग तर लग्नाची तारीख उलटून गेली तरी स्वस्थ बसून राहण्याशिवाय दुसरं काही करता आलं नाही...त्या दिवशी फक्त अमित ऑफिसला जाताना मित्राची बाईक घेऊन बिल्डिंग खालून गेला..काही मिनिटं थांबला..ती नजरानजर झाली तेवढीच...तो सुद्धा इतका लांब होता की हेल्मेट-मास्क यांच्या कचाट्यात डोळ्यातले भावही बंदिस्त झालेले जणू..इतक्या लांबून दिसलेच नाहीत...आमच्या बिल्डिंगमधे एक जण पॉसिटीव्ह आल्यामुळे बिल्डिंग सील केलेली..
अगदी हातातोंडाशी असलेला घास, पण घेता काही आला नाही...
 काल त्याच्या एका कलीगचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला..
 उद्या अमितची टेस्ट होणारे..सध्या पूरतं एका हॉटेल मध्ये quarantine केलंय त्याला..फोनचा चार्जर सुद्धा न्यायचा राहिला..त्याने एक शेवटचा मेसेज केलाय फक्त..आणि त्यातही तो म्हणतोय "डोन्ट वरी, I will be fine" 
 कुठून आणतो एवढा धीर..? तोच जाणे..आता सगळं दोन दिवसांनी टेस्टचा रिपोर्ट आल्यावरच कळेल..तोपर्यंत चार्जर पोहोचवायची व्यवस्था होत्ये का बघत्ये आहेच मी..पण तरी...शांतता काही मिळत नाही..आपलं माणूस डोळ्यासमोर असलं तर काहीही एकत्र सहन करु शकतो आपण..पण तो इतका लांब, एकटा आहे हा विचारच मन खातोय..
 घरात सुद्धा टेन्शनच आहे..त्यामुळे कुणाशी बोलून मन मोकळं करू..?
 फक्त आता कान असुसलेत ते त्याच्याकडून टेस्ट निगेटिव्ह आल्याचं ऐकायला...आणि मग मी त्याला स्पष्ट सांगणारे..गपचूप घरी बसायचंय..नोकरी नको नी काही नको..आपलं घर आपली माणसं काळजीत टाकून काय करायची नोकरी..? कुठे घेऊन जायचा तो पैसा..?
 (स्वतःशीच खिन्न हसली)
 मग त्यावर तो शांतपणे म्हणेल..माझी नोकरी ही फक्त पैशासाठी नाहीये...हे मी घेतलेलं व्रत आहे असं समज हवंतर.. 

ही चर्चा काही पहिल्यांदा नाही होणार आमच्यात..गेल्या दोन तीन महिन्यात अनेकदा झाली आहे..भांडणं सुद्धा यावरूनच झाली आहेत..पण शेवटी खोल कुठेतरी मलाही माहीत आहे, आज अनेक लोकांचा तो आधार आहे..तो आणि त्याच्यासारखे असंख पत्रकार आणि त्यांची टीम..
आज ते आहेत, म्हणून आम्ही घरात बसून सर्व समाचार अगदी गरमागरम चहा पीत ऐकत आहोत..
त्यांना मात्र चहा-पाणी-ऊन-पाऊस-उपास-तापास कसली कसली तमा नाही..भय नाही, तक्रार नाही..आबाळ झाली तरी खंत नाही..कोरोना येवो, नाहीतर निसर्ग वादळ..यांचा झंझावात कायमच..कारण ते आहेत त्यांच्या व्रताशी बांधलेले व्रतस्थ..

©कांचन लेले

Wednesday 8 April 2020

खम्माघणी राजस्थान - भाग ५!

भाग ५
आम्ही पहाटे जोधपूरला पोहोचलो,
स्टेशहून झोस्टेलला जायला ओला केली होती, ती सुद्धा वेळेत आली आणि आम्ही मार्गस्थ झालो..
भल्या पहाटे कुठलंही शहर सारखंच दिसत असावं…untouched beauty म्हणतात तसं!
बऱ्याच गल्या गल्या असणाऱ्या भागात आम्ही पोहोचलो आणि  एका जागी द्रायव्हरने गाडी थांबवली, आणि पुढे गाडी जाणार नाही सांगितलं…झालं, मग आम्ही आणि बॅग्स असं पायी झोस्टेलकडे..तसं अगदीच जवळ होतं ते, एका गल्लीत शिरुन पुन्हा लगेच डावीकडे गेलं की समोरच…पण तेवढ्या वेळात आमच्या ट्रॉली बॅग्सचा जो काही आवाज होत होता त्याने सगळी वस्ती जागी होते की काय असं वाटलं!
तर एकदाचे आम्ही पोहोचलो, झोस्टेल या चेन ची खासीयतच आहे ते म्हणजे त्यांचं इंटिरियर, ब्राईट vibrant कलर वापरून, आणि authentic वस्तूंनी सजवलेली जागा कोणाला आवडणार नाही!
तर आत गेलो, पण मानून कुणी दिसेना, साधारण सहा वाजले होते आणि त्यात दिवस थंडीचे..खरंतर अशात कुणाची झोप मोडायचं पातकच लागत असणार, व काय करणार..पर्याय नव्हता मग आवाज देऊन, टेबल बडवून, त्यानेही काही होईना म्हणून फोन करुन थोड्या वेळाने कुठून तरी एका माणसाचा आवाज आला, आणि मग तो साक्षात प्रगट झाला..जवळजवळ फक्त एक सेंटीमीटर डोळे उघडून आमच्यासमोर उभा होता तो मुलगा!
तर सगळं त्याला सांगितल्यावर मग त्याने नाव लिहून एन्ट्री केली, पण आमचे बेड अजून occupied होते..आधीच्या लोकांनी चेक आऊट केल्याशिवाय आम्हाला ते मिळणार नव्हते..मग आमच्या बॅग्स लॉकर रुम मध्ये ठेऊन त्याने आम्हाला कॉमन रुम कुठे आहे ते सांगितलं..तिथे जाऊन आम्ही सकाळ होईपर्यंत ताणून द्यायचं ठरवलं! 
झोस्टेल मध्ये ही एक उत्तम सोय आहे, कॉमन रूम्सचा खूप फायदा होतो, असं लवकर चेक इन, चेक आऊट असेल तर खूपच फायदा होतो! आणि व्यवस्था पण सगळी उत्तम असते, दोन-चार माणसं झोपतील अशी सोय बऱ्याच झोस्टल्स मध्ये असते..
तर सकाळी उठलो, आमच्या रुम रिकाम्या झाल्या होत्या पण क्लिनिंग व्हायचं होतं..मग बाहेर कुठे न जाता आम्ही कॉमन रुमच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या कॅफे मध्ये जाऊन आधी नाश्ता करायचं ठरवलं..
आणि वरती जाऊन बघतो तर अजस्त्र मेहरानगड किल्ल्याचा जबराट view तिथून दिसत होता!!
मग तो view डोळ्यात साठवत आलू पराठा आणि चॉकलेट मिल्कशेक घेऊन आम्ही पटकन आवरायला गेलो!
आवरुन आम्ही बाहेर पडलो ते थेट मेहरानगड बघायला..
तिथे पोहोचलो, एन्ट्री तिकीट आहे, ते काढलं आणि पुढे guide घ्यायची सोय आहे..एर्वीच फिरणारे गाईड, गव्हर्नमेंट गाईड, किंवा त्याहून भन्नाट आणि खिशाला परवडणारा उत्तम पर्याय म्हणजे Audio Guide!
हे एक छोटं यंत्र असतं,  कॉर्डलेस फोन दिसतो तसं दिसणारं, आणि त्याबरोबर हेडफोन्स दिले जातात, (आपल्याला हवी असलेली भाषा सांगितल्यावर ती फीड केलेला audio guide ते देतात)
तर त्याची यंत्रणा अशी आहे की ज्या स्पॉटची माहिती त्यात दिलेली असते, त्या स्पॉटवर सूचक फलक लावलेला असतो आणि त्यावर नंबर लिहिलेला असतो, त्यावरुन आपण ओळखुही शकतो, आणि एखाद-दोन जागा skip केल्या तर थेट आहोत तिथे उडी मारू शकतो!
तर असा हा ऑडिओ guide आणि आम्ही दोघी असल्याने दोन headphones घेऊन आम्ही किल्ल्यात प्रवेश केला!
आधी म्हंटल्या प्रमाणेच हा किल्ला अजस्त्र आहे!
पण व्यवस्था इतकी सुंदर केलेली आहे की कुठेही हरवल्यासारखं वाटत नाही!
आत प्रवेश करते झाल्यावर वाजंत्री अगदी राज पोशाखात बसलेले असतात आपले कान तृप्त करायला!
पुढे आत गेल्यावर वेगवेगळं विभाजन केलेलं आहे..राजांचे महल आणि बाकी वस्तुसंग्रहालय वेगळं..दोन्ही अतिशय बघण्यासारखं आहे, (मी इथे खूप तपशील दिसणार नाही, कारण तो तुम्ही तिथे जाऊनच अनुभवावा असं वाटतं!)
आत महालात सुंदर कचकाम केलेलं दालन आहे, त्याचा हा फोटो!
तसंच सोनेरी नक्षीकाम असलेलं दालन, राजाचा महल, राणीचा महल असे अनेक भाग अगदी बघण्यासारखे आहेत..त्या व्यतिरिक्त इतर दालनात काही विविध कलाकारांना आश्रय दिला आहे!
तर वस्तू संग्रहालय अतिशय उत्तम नियोजित आहे, सगळ्या वस्तू काचांमध्ये बंद, आणि त्यातच त्याची माहिती दिलेली आहे..विविध शास्त्र उत्तमपणे showcase केलेली आहेत!
अनेक वस्तूंमध्ये अगदी अत्तराच्या बाटल्या, हुक्का पात्र, जुनी स्वयंपाकाची भांडी, पानदान, चिलीम इत्यादी इत्यादी..किती वस्तूंची नावं घ्यावी..?
आणि सगळं बहुतेक करुन चांदीचं आहे!
१९व्या शतकातील राजपेहराव सुद्धा एका काचेच्या पेटिट बंद केलेला आहे..तो पेहराव आणि त्याचा आकार बघून त्या वेळच्या लोकांची आडदांड शरीरयष्ठी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही!
त्याचबरोबर या गडाचा संपूर्ण नकाशा ही आहे!
तर वरती गेल्यावर संपूर्ण जोधपूरचं मोहक दृश्य दिसतं! जोधपूर ही Blue City मानली जाते! इथून वरुन एक भाग पूर्ण निळ्या घरांचा दिसतो..
फिरत फिरत अख्खा दिवस गेला इतका हा नितांत सुंदर किल्ला!
आम्ही खाली आलो, भूक प्रचंड लागली होती कारण जेवलोच नव्हतो, साधारण ५ वाजले असतील..खाली एक कॅफे आहे..तिथून सँडविच, कॅरॅमल क्रोसॉ, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी आणि ढोकळा असं सगळं ढोसलं, खरंतर एक चांगला नसेल तर दुसरं असावं म्हणून विविध ओरकर घेतलेले पण सगळ्याची चव अगदी उत्तम होती!
मग ते झाल्यावर आम्ही पायीच खाली जायला निघालो..५ वाजून गेले होते, आणि बाकी सगळं बऱ्यापैकी लांब होतं, मग पायी जाऊन थोडं explore करावं, थोडी लोकल खरेदी करावी आणि छान जेवून झोपावं असा प्लॅन होता!
मागच्या बाजूने पायवाट आहे खाली जायला..आम्ही तिथून चालू लागलो, खरं पाय पण दुखतच होते, पण चालत होतो..आणि थोडं पुढे गेल्यावर अगदी गोड चिवचिवाट कानी आला, आणखी पुढे गेल्यावर एका झाडावर चिमण्यांची सभाच भरली होती! चांगल्या गोल गरगरीत चिमण्या! मुंबईच्या माणसांना चिमण्यांचं फार अप्रुप! मग काही वेळ तिथे मांडा ठोकून बसलो आणि गंम्मत बघितली, काही खारु ताई पण दिसल्या, त्यांचे फोटो काढले आणि अंधार होतोय लक्षात येऊन पुढे गेलो,
खाली उतरला उतरल्या वस्तीच आहे लगेच, तिथे आधी दोन राजस्थानी पगड्या घेतल्या..आणि मग काही लोकांशी गप्पा मारत, माहिती काढत, दुकानं फिरत, आणि जेवून आम्ही झोस्टेलवर आलो, थोडं फ्रेश होऊन कॉमन रूम मध्ये जाऊन पुस्तकं चाळून शेवटी एकदा लुडो खेळून झोपी गेलो! 

क्रमशः 
©कांचन लेले

Sunday 29 March 2020

खम्माघणी राजस्थान! भाग ४

या सगळ्या दरम्यान अंगावर तीन थर होतेच…आणि परत जाताना थंडी आणखी वाढलेली..कॅम्प मध्ये गेल्यावर तिथे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची तयारी होत आलेली दिसली..अंधार बऱ्यापैकी पडला होता थोडं फ्रेश होऊन बाहेर येऊन बसलो…चहा-पोहे आले…तिकडचे पोहे म्हणजे गोड आणि भरभरून तेल असलेले…आणि कार्यक्रम सुरू झाला केसरिया बालम ने…दरम्यान आमच्या शेजारी थायलंडचे दोघे, बंधू-भगिनी येऊन बसले…त्यांच्याशी थोडी ओळख होत होती…एकीकडे कार्यक्रम गाण्यावरून नृत्याकडे आलेला..तिथले स्थानिक नृत्य प्रकार झाल्यावर काही थोडे अघोरी प्रकार (पापणीने सुई उचलणे, काचांवर चालणे इत्यादी) झाल्यावर डोक्यावर घागरी/घडे घेऊन नृत्य झालं…मग जेवण करुन, आणि दुसऱ्या दिवशी थायलंड जोडीबरोबर एकत्र जैसलमेरला जायचं ठरवून, एकमेकांचे नंबर घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी गेलो..

दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो माणूस आम्हाला न्यायला आला..पुन्हा ओपन जीप सवारी आणि प्रचंड वाऱ्यात प्रवास झाला! त्या दिवशी आमचा मुक्काम नव्हता, रात्री उशिराची ट्रेन होती तरीही आम्ही झोस्टेलचं बुकिंग केलेलं..जो निर्णय अतिशय उत्तम ठरला!

राजपुत योध्दा रावल जैसल यांनी बांधलेला हा अत्यंत मनोहर सोनेरी किल्ला! याचं संपूर्ण बांधकाम हे पिवळ्या रंगाच्या दगड आणि रेतीने केल्यामुळे हा संपूर्ण किल्ला त्या रंगाचा दिसतो, आणि त्यात सूर्यदेवाची कृपा झाली की लखलखतं सोनेरी तेज असल्यासारखा भासतो! म्हणूनच त्याचं नाव सोनारदुर्ग आणि इंग्रजीत Golden Fort असं पडलं आहे!
हा संबंध किल्लाच म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे! अगदी रेखीव दरवाजे खिडक्यांपासून दालनांची आखणी, जिने इत्यादी प्रत्येक लहान सहान गोष्ट कलात्मक रित्या केलेली आहे! संपूर्ण राजस्थानातील हवेल्या आणि किल्ले हे म्हणजे नयनरम्य दृश्यच! म्हणजे विचार करताना तोचतोचपणा वाटू शकतो, पण त्यामुळे यातलं काहीही टाळू नका! प्रत्येक वास्तूत काहीतरी वेगळंच दिसेल हे नक्की!
आम्ही चौघे zostelच्या दिशेने रवाना झालो..आता हा जैसलमेरचा किल्ला म्हणजे गावच आहे! किल्ल्याच्या आतच हॉटेल, दुकानं, वस्ती, असं सगळं आहे! तिथेच आमचं झोस्टेलसुद्धा होतं..तिथली दोन माणसं आम्हाला लगेच न्यायला आली, अमच्याबरोबरच्या "वॅरीसा" आणि "विट" या दोघांना त्यांचं बुकिंग नसतानाही सामान ठेऊ दिलं आणि संध्याकाळी फ्रेश व्हायला यायलाही सांगितलं!! बाहेर पडल्यावर महाल बघायला गेलो..तिथेही आम्ही guide घेतलेला..मग तो guide आणि आम्ही अतिथींचे translator झालो! ;)
आत गेल्यावर सुंदर चित्रांनी आणि काचकामाने बहरलेला रंगमहल लक्ष वेधून घेतो, पुढे राजाचा महाल, राणीचा महाल, राज्याभिषेकाचं सिंहासन, जुनी नाणी (मुद्रा) इत्यादी अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत!
दरवाजा आणि खिडक्याचं इतकं सुंदर रेखीव काम सगळीकडे बघायला मिळतं!
त्याचबरोबर, तिकडे अख्या किल्ल्याचा एक नकाशा आहे, तो देत आहे!
वरती गच्चीत गेलं, की अख्या खालचं हे दिसणारं दृश्य!

नंतर आम्ही तिथल्या मुख्य जैन मंदिरात गेलो..मंदिरातील अतिशय रेखीव खांब आणि घुमट बघून मन निवतं..
पुढे आम्ही पटवो की हवेली बघायला गेलो..ही इथली सगळ्यात पहिली बांधलेली हवेली आहे! आणि ही एक हवेली म्हणजेच पाच लहान हवेल्यांचं एकत्रित रूप आहे, तेही पाच मजली! पुन्हा अतिशय सुंदर आणि रेखीव काम इथे बघायला मिळतं, त्यात बरंच काचेचं काम भिंतीवर दिसतं..
त्यानंतर गेलो ते गडीसर लेक बघायला! तिथे आम्ही तिघींनी, बोटिंग सुद्धा केलं! आणि काही खूप सुंदर पक्षी सुद्धा बघितले!
दिवसभर उन्हात फिरल्यावर त्या पाण्याची शीतलता पूर्ण जाणवली!
शांत पाणी कायम आपल्याला शांतता देत असतं…आणि नदीचं खळाळतं पाणी कायम सकारात्मकता देत असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं..किंबहुना तो अनुभव मी कायम घेत असते! 
आणखी एका गोष्टीचं कौतुक म्हणजे तिथे बाहेरच "सुलभ" सेवा आहे. बऱ्यापैकी मोठं, प्रशस्त आणि मुळात म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह बघून आनंद वाटला.

महाल, जैन मंदिर, हवेली आणि गडीसर लेक अस सगळं फिरुन, मधे एका ठिकाणी जेवून, अधे मधे थोडी खरेदी करुन आमचा दिवस एकदम मस्त गेला!

या संबंध दिवसात वॅरीसा आणि विट बरोबर गप्पा होत होत्या..दोन्ही देशांच्या परंपरा, संस्कृती इत्यादींची देवाणघेवाण होत होती! संध्याकाळी आम्ही झोस्टेलवर आलो तिथून सगळ्यात वरच्या मजल्यावरून दिसणारा अप्रतिम सूर्यास्त बघितला आणि मग तिथल्याच कॉमन रूम मध्ये "Jenga" या खेळाचे दोन चार डाव खेळून वॅरीसा आणि विट ला निरोप दिला! मग आम्ही बॅग पॅक केली आणि वरती किचन मध्ये सूप करुन प्यायलं..मग पॅकिंग केल्यावर थोडावेळ चक्कर मारुन जेवायला जायचं ठरवलं तर एकतर तितकं खावंसं वाटेना, आणि बऱ्यापैकी उशीर झाल्याने कुठल्याच हॉटेलमध्ये लोकं दिसेना आणि मग हॉटेलच्या जेवणावर पैसे घालवावेसे वाटेना..मग आम्ही एका दुकानातून मॅगीची पाकिटं घेतली आणि पुन्हा zostelच्या किचन कडे रवाना झालो..मग तिथल्या स्टाफबरोबर गप्पा मारत, पुढील टप्प्यांची माहिती काढत मॅगी केलं आणि मस्त ताव मारला!!
रात्री १ ची गाडी होती, १२ वाजता तिथल्याच स्टाफने आमच्यासाठी रिक्षा सांगितली होती. अगदी लागेल ती मदत करणारे इथले लोक मनाला एकदम भावले आणि खरंच अतिथी देवो भवः का म्हणतात ते कळलं!!
ट्रेन वेळेवर होती..आम्ही स्टेशनला पिहोचलो आणि प्लॅटफॉर्म वर जाऊन थांबलो..गाडी आल्यावर आमच्या बर्थ वर गेलो तर तिथे आणखी दोन स्त्रिया होत्या..(ladies कोट्यातून बुकिंग केल्याचे फायदे). त्यांनी थोडा वेळ आमच्या हालचाली, गप्पा ऐकल्या व मग आमचाच interview घ्यायला लागल्या, (एकीला मराठी थोडं येत होतं)की आम्ही दोघीच, बरोबर मोठं कोणी नाही, परराज्यात अशा रात्रीच्या कशा काय फिरतो वगैरे..मग त्यांच्या गरजेपूर्ती आणि थोड्या प्रबोधनापूर्ती ;) माहिती दिली!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं वेगळ्या शहरात, देशात एकटी गेली की पालकांना काळजी वाटणं स्वाभाविकच असतं, हे लक्षात घेऊन कायम बाहेर फिरायला गेलं की दिवसातून ४-५ वेळा स्वताहून कुठे आहोत, काय करतोय हे कळवलं की मला नाही वाटत कुठलेही पालक फार आडकाठी करतील..कारण त्यांना आपल्या सुरक्षिततेपलीकडे काहीही नको असतं!

तर त्याप्रमाणेच पुन्हा आपापल्या घरी गाडी मिळाल्याचे आणि सगळं नीट असल्याचे मेसेज करुन, असलेलं नसलेलं सगळं अंगाखाली, अंगावर घेऊन आम्ही जोधपुरमध्ये जागं होण्यासाठी झोपी गेलो!!

क्रमशः
©कांचन लेले

Thursday 26 March 2020

खम्माघणी राजस्थान! - भाग ३

ते मनोहर दृश्य मनात साठवून आम्ही स्टेशनच्या आत गेलो, थोडावेळ वेटिंग रुम मध्ये थांबलो व नंतर प्लॅटफॉर्मकडे निघालो..जयपूर रेल्वे स्टेशनला लिफ्टची सुविधा सुद्धा आहे हे तिथे एक बोर्ड बघून कळलं, बॅग्स असल्याने आणि थंडीने हात सुन्न पडल्याने त्याचा खूप फायदा झाला..आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर अगदी वेळेत पोहोचलो..गाडी सुद्धा वेळेवर आली. 
 तशा आम्ही दोघीच मुली आणि रात्रीचा प्रवास, खरंतर घरचे नेहेमी अशावेळी AC चं तिकीट काढायला सांगतात..पण या वेळी मी ठरवून स्लीपर क्लासचंच तिकीट काढलेलं, फक्त त्यात लेडीज कोट्यात काढलं, ही सुद्धा एक उत्तम सुविधा भारतीय रेल्वे देत आहे. फक्त तोटा एवढाच होतो की स्लीपर क्लास मध्ये अंथरूण, पांघरूण दिलं जात नाही. पण आम्ही त्या तयारीनिशी गेलेलो, तरीही थंडी इतकी प्रचंड होती की खिडकीच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्याने हुडहुडी भरत होती! तरी दमल्यामुळे पूर्ण गुर्गटून पांघरूण घेऊन झोपलो..आणि दुपारी १ दरम्यान जैसलमेरला पोहोचलो..
आमचा ठरलेला प्लॅन असा होता की जैसलमेरला दोन दिवस ठेवलेले, त्यापैकी आज आम्ही सरळ वाळवंटात, म्हणजे "सम" येथे जाऊन तिथे "Desert Camp" मध्ये रहाणार होतो, व दुसऱ्या दिवशी सकाळी जैसलमेरला जाऊन किल्ला वगैरे फिरणार होतो. या desert camp बद्दल मी बरंच सर्फिंग केलेलं, आणि online दिसणाऱ्या किमती खूप जास्ती वाटल्याने मी Spot booking करायचं असा निर्णय घेतलेला.
तर आम्ही स्टेशनबाहेर आलो. दृश्य असं होतं की बहुतांश लोकांना न्यायला हॉटेलच्या, कॅम्पच्या गाड्या आलेल्या. आणि बाहेर काही रिक्षा उभ्या होत्या आणि त्या सम ला जात नाहीत असं आम्हाला कळलं. प्रायव्हेट गाडीवाले मागे लागले, पण त्यांचे भाव ऐकून आम्ही त्यांना भाव दिला नाही! ;)
१ वाजून गेलेला, आणि ट्रेन मध्ये काही खायला मिळालं नव्हतं, डिंकाचे लाडू आणि Lays Kurkure सारख्या खाद्यावर असताना भूक लागली होती त्यामुळे आम्ही आधी तिथेच जेवायचं ठरवलं. जैसलमेर स्टेशनच्या बाहेर तसं प्रशस्त हॉटेल वगैरे काहीच नाही. अगदीच सुमार दर्जाची दोन तीन हॉटेल आहेत, पण भूक लागलेली असताना असलं काही सुचत नाही. म्हणून आम्ही सगळ्यात सेफ पर्याय म्हणून शेव भाजी आणि पोळ्या आणि ताक अशी ऑर्डर दिली. शेवभाजी पिवळ्या ग्रेव्ही मध्ये मी पहिल्यांदाच बघितली..म्हणजे ताकातली शेवभाजी म्हंटलं तरी गैर नव्हे! पण पुन्हा भूक लागलेली असताना पोटात ढकलणे यापलीकडे काही नाही! जेवण झाल्यावर आम्ही तिथल्याच एक दोन लोकांना पुन्हा विचारलं, पण ८००, १०००  असे वाट्टेल ते रेट आम्हाला फक्त समला पोहोचवण्याचे सांगण्यात आले. मग आम्ही रिक्षा असतात तिथे जाऊन एका अनुभवी (छप्पर उडालेल्या ;) ) रिक्षावाल्या काकांना गाठलं आणि शेरिंगच्या गाडीतूनच जायचं असेल तर कसं जायचं विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढे एक जागा आहे तिथून शेरिंगमध्ये गाड्या जातात, मग त्यांनाच तिथे सोडायला सांगितलं. त्या जागेला नाव आहे "हनुमान सर्कल" तिथे गेलो, काकांनी दोन तीन वेळा शेअर जीप समजून लोकांना विचारलं पण त्या भलत्याच होत्या. शेवटी त्यांनी आम्हाला तिथे सोडलं आणि गाडी येईल वाट बघा असं सांगितलं. काही वेळ असाच गेला, त्यातही एक दोन गाडीवाल्यांनी शेरिंग ने गेलात तर रात्र होईल पोहोचायला, फिरत जाते खूप, रस्ता खराब आहे असं वाट्टेल ते सांगायचा प्रयत्न केला पण आम्ही भुललो नाही, आणि थोड्या वेळातच समोरच्या बाजूला गाडी दिसल्यावर धावत जाऊन आधी सीट रीझर्व केल्या. ती Open jeep होती! पुढे कव्हर, मध्ये चार जण बसतील अशी आडवी सीट, आणि मागे उभ्या दोन सीट, अशी तवेरा सारखी बसण्याची सोय. पण आमच्याकडे ट्रॉली बॅग्स होत्या त्यामुळे तो जरा कटकट करू लागला, मग अनुभव पणाला लावून त्याला म्हंटलं चार सीटचे पैसे देते, मधे कोणालाही बसवू नको. आणि अशा प्रकारे आम्ही आणि आमच्या दोन बॅग्स ओपन जीप सफारीला अवघ्या २०० रुपयात निघालो! भर दुपारी त्या जीपमध्येसुद्धा इतकी थंडी वाजत होती, आणि ड्रायव्हर म्हणजे शुमाकरचा भाऊ शोभावा अशी गाडी चालवत होता. त्यामुळे आम्ही असेल नसेल ते सगळं अंगावर चढवून, डोक्याला बांधून बसलेलो!  ड्रायव्हरशी आधीच बोलून बघितलेलं, माणूस बरा वाटला, मग त्यालाच संगीतलेलं की आम्हाला एखादा चांगला desert camp सुचवायला..साधारण सव्वा तासाने आम्ही तिथे पोहोचलो, त्याने आम्हाला कॅम्प बघून घ्यायला सांगितलं आणि तो थांबला तोपर्यंत. सगळं व्यवस्थित, अगदी अद्ययावत नाही आणि अगदी सुमार नाही असं बघून, बार्गेनिंगचं कौशल्य पणाला लावून, दोघींचे मिळून १६०० रुपयात फायनल केलं, ह्यात संध्याकाळचा चहा-नाश्ता, उंटांची राईड, रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम, जेवण आणि सकाळचा चहा नाश्ता असं सगळं आलं. आणि ज्या माणसाने आम्हाला सोडलं त्यालाच दुसऱ्या दिवशी आणायला यायलाही सांगितलं. तिथे टेंट आणि कॉटेज असे दोन पर्याय होते. सेफ्टीचा विचार करून आम्ही भक्कम दार असलेलं कॉटेज निवडलं. नंतर एक दीड तास विश्रांती घेऊन आम्ही उंटाची सवारी करायला निघालो!
उंटावर बसणं आणि बसून रहाणं दोन्ही अवघडच आहे तसं!
तसं बघायला गेलं तर हल्ली (racing) bikeची सवय असणाऱ्यांना ते छान जमेल!! 
कुठल्याही जीवावर स्वार होताना मनात संमिश्र भाव येऊ शकतात..
जयपूरला हत्तीवर स्वारीला जाणं टाळलं त्याचं किंमत हे एक कारण होतंच, पण दुसरं कारण असं होतं की त्यांच्या डोळ्यात मला उदासीनता दिसली..जी बहुतांशवेळेला मला प्राणी संग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यात दिसते! तसंच उंटावर बसतानाही वाटलं…पण शक्यतो त्याला पाय लागू न देता आणि संधी मिळेल तेव्हा त्याच्या डोक्यावर, पाठीवर प्रेमाने हात फिरवून, थांबल्यावर त्याच्याशी गप्पा मारून मी ते भरुन काढलं!
तिथे मधे एक माणूस एक छोटं वाद्य तोंडाने वाजवत होता..कानाला तो आवाज लांबूनच कळला, मग उंटवाल्या भाईंना तिकडे न्यायला सांगितलं..खाली उतरलो आणि थोडावेळ ऐकलं..
नंतर त्या माणसाशी बोलल्यावर कळलं त्या वाद्याचं नाव "मोरचंग" किंवा बरंच प्रचलित असलेलं "मोरसिंग". ते वाद्य असं दिसतं..
त्यांचे आभार मानून पुढे निघालो!
सनसेट पॉईंट पर्यंत गेल्यावर उंटवाल्या भाईने आम्हाला खरं "थार" वाळवंट आणखी पुढे आहे, जिथे त्यांच्या भाषेत "लेहरे" दिसतात…म्हणजे वाळूवर येणारी विशिष्ट नक्षी दिसते…म्हंटलं इथवर आलो आहोत तर जाऊया…तिथेही जोरदार बार्गेनिंग करुन..आम्ही कशा त्याच्या बहिणीसारख्या आहोत असं सांगून ४०० रुपयात जवळपास तासभर आत वाळवंटात फेरफटका मारला…सूर्यास्त होईपर्यंत तिथेच वाळूवर पथारी पसरुन यथेच्छ डोळे भरून सूर्यास्त बघितला…आणि मग पुन्हा कॅम्प कडे वळलो..
क्रमशः
©कांचन लेले

Tuesday 24 March 2020

खम्माघणी राजस्थान! - भाग २


दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो, नाश्त्याला वेळ न घालवता घरुन नेलेले डिंकाचे लाडू खाल्ले आणि पुन्हा बसने आमेरकडे निघालो..आमेरला जाताना वाटेतच जल महल सुद्धा दिसतं!
तर आमेरला पोहोचलो..
आत जात असताना अनेक गाईड तुमच्या मागे लागतात.. नजर काम करते. माणूस पारखून घेणं अतिशय महत्वाचं आहे, तरच दिलेले पैसे वसूल होतात! अशा चार पाच लोकांना नाही म्हणून सहाव्याला नाही म्हंटलं आणि तो मागे मागे नाही आला. बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी दिसत होते काका. मागे गेले त्यांना म्हंटलं किती घेणार तर म्हणाले २००. म्हंटलं १५० फायनल. आणि ते आमच्याबरोबर आले. (खरं हत्तीवरून जायचं म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो, पण त्याचं तिकीट ₹११०० हे ऐकून रद्द केलं!)
सुरवातीलाच आत शिरताना उजवीकडे एका  वाड्याचे भग्न अवशेष दिसतात..पण ते ही खरंतर आकर्षक दिसतात! 
पुढे थोडं वरती गेलं की खाली माओटा तलाव दिसतो..आणि त्याच्या मध्ये दिसते ती केशर बाग..राजा काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांना केशर खूप भावलं आणि त्यांनी एक मोठी रक्कम देऊन ते इकडे लागवड करायला आणलं, पण राजस्थानातील हवामानामुळे तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही! पुढे आतल्या टोकाला गेल्यावर मागे जयगढ किल्ल्याची भिंत दिसते! नंतर तिथे तिकीट काढून आत जावं लागतं. आत जायच्या आधी उजवीकडे एक शिला देवीचं मंदिर आहे. सुंदर प्रसन्न असं हे मंदिर. आत जाताना दारावरच चांदीच्या पत्र्यावर नव दुर्गा आणि दहा महाविद्या कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिर संगमरवरी आहे. आत गेल्यावर काही विशिष्ट ठिकाणी पायाखाली छोटी छिद्र येतात, ज्यातून थंड हवा येताना पायाला जाणवते! Ventilation ठेवण्यासाठी तेव्हाच्या अशा अनेक क्लुप्त्या राजस्थानातील वास्तूंमध्ये दिसून येतात..
दर्शन घेऊन बाहेर आल्यावर किल्ल्यात प्रवेश केला..
आत दिवाण-ए-खास आणि नंतर महालात जायला एक भव्य प्रवेशद्वार! इथून पुन्हा खालचं मोहक दृश्य दिसतं! 
आमेर किल्ल्याचं नाव मुळात अंबा मातेवरून आंबेर असं पडलं होतं. कालांतराने त्याचं "आमेर" झालं. परंतु आजही इंग्रजीत "Amber" असाच उल्लेख सगळीकडे येतो. या किल्ल्यावर आजही बळी द्यायची प्रथा सुरू आहे. आधी मनुष्य बळी दिला जायचा, आता दर रोज एक जनावर बळी म्हणून चढवलं जातं. ही प्रथा मात्र आजवर मला कळली नाही! जो जन्म देतो त्याला प्रसन्न करायला मृत्यू कसा चालेल?!
असो..तर पुढे किल्ल्यात फिरल्यावर  सगळं भव्य दिव्य दिसून येतं.
 इथल्या किल्ल्यांवर एक विशिष्ट नक्षीकाम केलेलं दिसतं. 
याचं वैशिष्ट्य असं की हे रंग नैसर्गिक असतात. फळ-भाज्यांपासून हे रंग त्याकाळी बनवत असत व आज चारशेहुन जास्त वर्ष झाली तरीही तो रंग तसाच्या तसा आहे हे विशेष! पुढे एके ठिकाणी आत गेल्यावर एक रहाट दिसला..
खाली वाकून बघितलं तर मडक्याला मडकी बांधलेली दिसली..ती अशी! 
बरंच फिरुन आम्ही बाहेर पडलो..तिथून खाली आल्यावर, थोडं लांब मीराबाईंचं मंदिर आहे..काका आम्हाला तिकडे घेऊन जात असताना मधे रस्त्यात काही वादक "रावणहट्टा" नावाचं वाद्य सुंदर वाजवत होते!
हे राजस्थानी वाद्य अनेक चित्रपट संगीतात आपल्याला ऐकायला मिळालं आहे!
थोडा त्याचा आस्वाद घेतला आणि पुढे गेलो..
मीरा बाईंचं मंदिर फारच सुंदर आहे! सहसा कोणी लोकांना तिकडे नेत नसावं, कारण किल्ल्यात खूप गर्दी असताना मंदिरात मात्र एक माणूसही नव्हता! 
अतिशय प्रसन्न वाटावं असं मीराबाईंचं मंदिर बघितलं आणि काका आम्हाला तिथल्या गव्हर्मेंटच्या दुकानात घेऊन गेले…तिथे त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग कसं करतात, तिथलेही रंग नैसर्गिक असतात, त्याचं तंत्र दाखवलं..तिथे साड्या, लेदर चप्पल, जयपूरची खास १०० ग्राम रजई, ड्रेस, ओढणी अशी खूप व्हरायटी आहे!
तिथून काकांना मुक्त केलं! अतिशय छान माहिती देत फिरवलं त्यांनी आम्हाला! मग जेवलो खास राजस्थानी दालबाटी थाळी! 
पुढे तसंच अलबर्ट हॉल मुसीयम बद्दल वाचलं होतं त्यात ते एवढं आकर्षक वाटलं नाही, पण ती वस्तू मात्र अतिशय रेखीव आणि सुबक आहे..
त्यामुळे तिथे गेलो, बाहेरूनच तिचा आस्वाद घेतला आणि वेळे आभावी आत न जाता, City Palace कडे कूच केली..हा सिटी palace सवाई जय सिंह यांनी बांधलेला, पुढे उल्लेख येणार आहे तो हवा महलचा, तो बांधण्याचं श्रेय सुद्धा ह्यांच्याच पदरी जातं!
मुळात जयपूरच मुळी त्यांनी निर्माण केलं, आणि त्यांच्या नावावरुनच हे नाव ठेवलं आहे..
तर पुन्हा city palace कडे येताना, अतिशय भव्य दिव्य आणि नायनरम्य वास्तू! 
आमच्या हातात वेळ कमी असल्याने खूप वरवर बघितलं..या महालाचा एकच भाग लोकांसाठी खुला आहे, एका भागात अजूनही इथल्या राजघराण्यातील लोकांचं वास्तव्य आहे..
तिथून पुढे आम्ही हवा महल बघायला गेलो..हवा महल खरंच अतिशय सुंदर बांधलं आहे! नजर हटत नाही इतकं अप्रतिम आहे! 
फक्त ऐन मुख्य रस्त्यावर असल्याने शांतता मात्र त्याच्या वाट्याला अजिबात नाही! त्याच्या बरोब्बर समोर जागा हेरुन काही हुशार लोकांनी कॅफे सुरू केले आहेत..तिथे बसून हवा महलचा आस्वाद घेता येतो..(आम्ही मात्र वरती गेलो view साठी, पण कॅफे च्या दारातून छान फोटो काढून पैसे न उधळता तसेच खाली आलो ;) )
जयपूर आणि एकूणच राजस्थानात ५.३०-६ नंतर हळू हळू सगळं बंद होऊ लागतं. थंडी पडू लागते. त्यात आम्ही दोन दिवस असताना वातावरण पावसाने घेरलेलं, त्यामुळे आणखीनच कमी वेळ मिळाला सगळं फिरायला! त्याच दिवशी रात्रीची ट्रेन होती, जैसलमेरसाठी..त्यामुळे पटापट फिरुन zostel वर आलो, सामान पॅक केलं आणि स्टेशनकडे रवाना झालो!
तारीख होती २५ जानेवारी..स्टेशनला पोहोचल्यावर जे बघितलं त्याने मन भरुन गेलं आणि अशाप्रकारे तो दिवस उत्तम संपला!

क्रमशः
©कांचन लेले