Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Saturday 30 April 2022

शेर शिवराज..स्वारी अफझलखान!

शेर शिवराज...स्वारी अफझलखान!

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज (स्वारी अफजलखान)!
श्री शिवराज अष्टकातील चौथा मणी!

"अहोरात्र लाथा बुक्क्यांचा अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. कालपुरुषाचाही कानठळ्या बसल्या आssणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करित करित प्रगटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते, शिवराय!!"

चित्रपटाची सुरवात मला थेट इथे घेऊन गेली. शिवकल्याण राजा या अल्बम मध्ये शिवशाहीर बाबासाहेबांनी केलेल्या निवेदनाचा हा भाग. 
लेखकाला जर ही सुरवात इथून सुचली असेल तर त्याचं कौतुक आहे, कारण शिवशाहीरांइतकं महाराजांना कुणी वाहून घेतलेलं नाही. आणि नवीन पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर ते कौतुकास्पदच आहे. यातून लेखकाचा अभ्यास, निरीक्षण व समयसुचकता दिसून येते. 
पण जर ही सुरवात तिथून आली नसेल तर मात्र लेखकाच्या प्रतिभेचं विशेष कौतुक करावं, कारण ती थेट बाबासाहेबांच्या प्रतिभेच्या जवळ गेलेली आहे!

आता ही सुरवात सुरवात म्हणजे काय असा प्रश्न चित्रपट न बघितलेल्या लोकांना पडेल, पण त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा! आणि अगदी सहकुटुंब जाऊन बघा, कारण शिवरायांचे संस्कार पुढच्या पिढीवर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्यालासुद्धा त्या चरित्रातले अनेक बारकावे कळणं गरजेचं आहे.

गेल्या बुधवारी चित्रपट पहायचा योग आला. मधला वार आणि अगदी संध्याकाळच्या सुरवातीला शो असल्याने थेटर बऱ्यापैकी रिकामं होतं. प्राईम टाइम शो या चित्रपटाला दिलेले नाहीत याचं प्रचंड दुःख वाटतं.

पावनखिंड बघितल्यावर प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आणि अगदी लगेचच शेर शिवराज आल्याने दुधात साखर असा योग आला! काही लोकांनी असाही सूर छेडला आहे की लागोपाठ एकाच विषयावरचे किंवा एका सिरीजचे दोन चित्रपट आल्याने इंटरेस्ट वाटत नाही किंवा तोचतोचपणा येतो. पण प्रेक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पावनखिंड हा कोविड मुळे उशिरा release झाला. व त्यामुळे तो रिलीज होईपर्यंत पुढचा पिक्चर शूट करुन तयार होता म्हणून ते लागोपाठ आले. असो, तर आता चित्रपटाकडे येताना..

सुरवातीचा गोंधळ (गाणं) अगदीच मनात रुंजी घालेल असा झालेला आहे. नंतर बराच काळ ते मनात आणि डोक्यात फिरत रहातं!
 तिथून चित्रपट उत्तम गती घेतो. चिन्मय मांडलेकरांनी घेतलेलं महाराजांचं बेअरिंग प्रत्येक चित्रपटागणिक सहजसुंदर आणि परिणामकारक होताना दिसून येतं. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांची शरीरयष्टी (एक सीन वगळता) विशेष डौलदार दिसून येते!
बहिरजींच्या भूमिकेत यावेळी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर झळकत आहेत. त्यांचा अभिनय अगदी सहज आहे, पण विषेश लक्ष वेधून घेते ती त्यांच्या गालावरची खळी! हरीश दुधाडेंनी आजवर बहिर्जी या पात्राला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, की त्यांचं कास्टिंग बदलणं हे एक धाडसच म्हणावं लागेल. पण जर तुलना नाही केली, तर पात्राला न्याय दिला आहे असं म्हणता येईल.

मृणाल कुलकर्णी नेहेमीप्रमाणेच अतिशय लक्षवेधी ठरतात! पण सईबाई आणि सोयराबाई यांच्याबरोबरच्या सीन्समध्ये त्या फारच तरुण दिसतात अशी गोड तक्रार करावी लागेल!

मुकेश ऋषी यांनी साकारलेला अफझलखान आपलं रक्त उसळायला भाग पाडतो. या व्यतिरिक्त त्यांच्या अभिनयाबद्दल आणखी काहीच बोलायची गरज नाही!

वर्षा उसगावकर यांचं कास्टिंग एकदम चपखल झालेलं दिसून येतं. सईबाई राणीसाहेबांचं पात्र साकारलेल्या ईशा केसकर यांनी संपूर्णतः डोळ्यातून व्यक्त केलेला अभिनय मनात घर करुन रहातो, त्याच बरोबर माधवी निमकरांनी साकारलेल्या सोयराबाई त्याला उत्तम साथ देतात.

दीप्ती केतकरांनी दीपाईआऊ बांदल हे पात्र उत्तम साकारलं आहे. अगदी लढाईचे सीन सुद्धा सफाईदारपणे केलेले जाणवतात.

अजय पुरकर यांनी साकारलेले तान्हाजी मनात घर करुन रहातात. व सगळ्यात सुखद धक्का येतो तो म्हणजे समीर धर्माधिकारी यांनी साकारलेले कान्होजी जेधे. विशेषतः त्यांच्या costumes मध्ये  वापरलेला "इकत" कपडा अतिशय डौलदार दिसतो. आता त्या काळी इकत होतं का अशा भंपक चर्चा न केलेल्या बऱ्या. पण ते अतिशय सुंदर शोभलं आहे हे मात्र निश्चित. हेच दुसऱ्या कुठल्याही किरदाराला दिलं असतं तर ते अजिबात शोभलं नसतं हेही निश्चित!
बाकी एकूणच महाराजांचे कपडे सुद्धा अतिशय रुबाबदार आणि तरीही भपकेदार वाटत नाहीत. सर्व costumes अप्रतिम झालेले आहेत व त्याने screen presence नक्कीच अधिक सुखावह झालेला आहे यात वादच नाही.

आयुर्वेदाचार्य आणि शस्त्रकार यांची पात्र विशेष सहजसुंदर निरागस अभिनयाने नटलेली आहेत! त्या दोन्ही अभिनेत्यांचं विशेष कौतुक.

आस्ताद काळे, निखिल लांजेकर, सुश्रुत मंकणी, रोहन मंकणी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, संग्राम साळवी, विक्रम गायकवाड, अलका कुबल, बिपीन सुर्वे आणि बऱ्याच नवीन कलाकारांनीही आपली पात्र उत्तम वठवली आहेत.
अनेक अभिनेत्यांची नावं माहीत नसल्याने उल्लेख करता येत नाही त्याबद्दल माफी!
तरीही अंकित मोहन या तशा बाहेरच्या असलेल्या पण या सिरीजचा अविभाज्य भाग झालेल्या कलाकाराची कमी, तसेच हरीश दुधाडेंची कमी नक्कीच भासते!

वैभव मांगलेंनी साकारलेले गोपीनाथपंत बोकील त्यांच्या नेहेमीच्याच शैलीतील अभिनयाने व्यापले आहेत. रंजकता आणायच्या दृष्टीने मिश्किल पात्र असणं गरजेचं असलं तरीही महाराजांचे वकील असे बाष्कळ वागत असतील हे मनाला पटत नाही. मांगलेंचा अभिनय उत्तम असला तरी दिग्दर्शकाने या गोष्टीचा विचार जरुर करावा.
कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा ही पात्र सुद्धा अभिनेत्यांनी चांगली साकारली आहेत.

रवींद्र मंकणी शहाजी राजे म्हणून उत्तम शोभतात. एके काळी स्वामी मध्ये मृणाल कुलकर्णी आणि त्यांची जोडी हिट झालेली आपल्याला माहीतच आहे. पण आता परिस्थिती व वय यात फार फरक आहे. पण त्या दोघांचे यात एकत्र सीन्स नसल्याने हे कास्टिंग अगदीच उत्तम चालून गेलेलं आहे.

सुरवातीपासून आजूबाजूला कुठेही न जाता चित्रपट थेट मुद्द्यावरच येतो. गती उत्तम आहे, रटाळपणा नाही. अनेक पात्र ज्यांचा महाराजांच्या कारकिर्दीत वाटा आहे त्यांचा उल्लेख आवर्जून दिग्दर्शक करतो हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर एका बलाढ्य शत्रूला शक्तीने नाही तर युक्तीच्या बळावर शक्तीने मारलं हेच आजवर आपल्याला माहीत होतं. पण त्या युक्तीचं व्यापक रूप या चित्रपटात पहायला मिळतं. त्याचे अनेक बारकावे उत्तम रीतीने दाखवलेले आहेत. ते इथे फोडून मी spoiler देणार नाही, पण आवर्जून बघावं अशी ही विचारमांडणी आहे. 
पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी, संगीत, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा इत्यादी सगळं उत्तम प्रतीचं झालेल दिसून येतं. व cinematic quality च्या बाबतीत मराठी सिनेमा करत असलेल्या प्रगतीबद्दल विशेष अभिमान वाटतो.

चित्रपटात काही प्रमाणात VFX चा वापर केलेला दिसून येतो. काही ठिकाणी तो उत्तम साधला आहे, तर काही ठिकाणी अनावश्यक वाटतो. मधे बहिरजींच्या तोंडी असलेलं गाणं चित्रपटाची लय खेचतंय असं वाटून गेलं, थोडं अनावश्यक वाटलं पण रंजकतेच्या गणितानुसर ते ठेवलं असल्याची शक्यता आहे. सईबाई राणीसाहेब गेल्याची बातमी काळतानाचा सीन थोडा कमी परिणामकारक झाल्यासारखं वाटतं. काही पुस्तकांमध्ये त्याचं नुसतं वर्णन इतकं अंगावर येणारं केलेलं आहे की प्रत्यक्ष अभिनयात तो दिसत असेल तर साहजिकपणे अपेक्षा खूप उंचावल्या जातात. महाराज तलवारबाजी करतानाचा एक bare body सीन आहे त्यात शरीर पिळदार नसलेलं दिसल्याने परिणाम किंचित कमी झालेला वाटतो. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णींच्या सीन ने शेवट झाला असता तर तो आणखी उंचीवर गेला असता असंही जाणवलं. 
या काही गोष्टी वगळता चित्रपट सर्वांगसुंदर जाहला आहे हे माझं वैयक्तिक मत आहे!

त्याचबरोबर शेवटी नवीन चित्रपटाची घोषणा करणं हा प्रकार मस्त आहे! आग्रा स्वारीची आम्ही आतुरतेने वाट बघू!

या सिरीजचा प्रत्येक चित्रपट आपण सर्वांनी पाहणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन पिढीला चौथी आणि सातवीच्या इतिहासातील पुस्तकांपलिकडे महाराज कळले पाहिजेत. आणि चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून जर ते कळत असतील तर मुलं सुद्धा आवडीने त्याकडे वळल्याशिवाय रहाणार नाहीत. तूर्तास इतकेच!

जय शिवराय!

- राधा
©कांचन लेले