Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Monday 31 January 2022

असं कधी होतं का तुमचं..?!


असं कधी होतं का तुमचं…?


आनंदाचं उधाण येतं! चेहऱ्यावर सतत स्मित विलसतं…येणाऱ्या जाणाऱ्याला प्रसन्न करतं..कोणी अगदी धक्का दिला तरी मन म्हणतं "छोड दिया आज! तू भी क्या याद रखेगा..?"…
सरळ वाटेने न जाता वाकडी वाट करुन काहीतरी आवडीचं करतं..उगाचच एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करतं…
मधेच स्वतःसाठी एखादं चाफ्याचं फुल घेतं..बसने न जाता सरळ रिक्षात बसुन मोकळं होतं..उगाच स्वतःचेच लाड करतं!

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

स्वच्छ आभाळात क्षणात मळभ दाटतं..ऐन थंडीत पावसाची सर झेलतं..
नेहेमीच्या वेगात काम करत असताना एखादी कटू आठवण मनाची तार अशी छेडून जाते, की ती तुटून डोळ्यात
टचकन पाणीच येतं ..
मग क्षणात आपण कुठे आहोत हे लक्षात येतं..
काहीतरी करुन मग मन डोळ्यातलं पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं..
हळूच कुणी बघितलं नसेल ना म्हणून आजूबाजूला डोकावून बघतं…आणि पुन्हा कामात व्यस्त होतं, पण ते लपवलेले अश्रू उशीवर डोकं टेकताच रिते करतं...

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

प्रचंड आनंदी वातावरणात सगळीकडे उत्साह असताना, एखादं मंगलकार्य असताना, आपलं आनंदी मन उगाचच एका शंकेच्या पालीने चुकचुकतं..
मग उगाच कुणाची दृष्टच लागेल का सगळ्याला..?
सगळं अगदी सरळ कसं पार पडलं..?
मग आता काही विघ्न येईल का..?
असे एक ना अनेक विचार करत त्या क्षणाच्या आनंदाला थोडं का होईना, पण मुकतं..

.

.

असं होतं का कधी तुमचं..?

.

.

आपलं मन, आयुष्यातले मोठा निर्णय घेताना स्वतःपेक्षा बाकीच्यांचाच विचार करतं..
"आपलं सुख-दुःख" या पलीकडे जाऊन आपल्या निर्णयाने बाकी सगळे खुश होतील ना..? मग ठीक! असा विचार करतं..
पण मग काही दिवसांनी मात्र मागे वळून बघताना आपण चुकलो की काय असं वाटून हळहळतं..पण तेव्हा..? तेव्हा हातात काहीच राहिलं नसतं…

.

.

असं होतं का कधी तुमचं…?

.

.

आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण आनंदाची घटना घडते! ती जिवश्च कंठश्च मित्राला सांगायला मन धावतं..
पण मग त्याच्याकडून, त्याच्या आयुष्यात आलेला कटू प्रसंग कळून क्षणात स्वतःच्याच आनंदावर विर्जण पडतं..
स्वतःसाठी आनंदी व्हावं..? की त्याच्यासाठी दुःखी..?

अशा कात्रीत मन सापडतं..आणि मग उगाचच देवाला या परिस्थितीचा जाब विचारतं..

.

.

असं कधी होतं का तुमचं..?

.

.

अशा आनंद-दुःखाच्या किनाऱ्यावर असताना, असं काहीतरी लिखाण हातून होतं..

मग हे आत्ताच कुठे टाकलं तर त्या मित्राला आपली अवस्था कळेल, म्हणून लिहिलेलं सगळं ड्राफ्ट म्हणून मोबाईल मध्ये पडुन रहातं..

आणि मग अनेक अनेक दिवसांनी फोनची स्वछता करताना वरची जळमटं दूर केली, की खाली खजिन्यासारखं सापडतं!

दुसऱ्याचं मन जपण्यासाठी स्वतःचं मन मारुन त्या वेळेला घेतलेला जड निर्णय कधीतरी अचानक समोर येऊन मन सुखावतं!

.

म्हणून, असं कधी होत असेल तुमचं, तरी ते चांगलंच असतं बरं..

कारण जे चांगल्या मनाने केलं जातं त्याचे चांगले परिणाम उशिराने का होईना, पण उपभोगायला मिळतातच !

.

१३-१२-२०१९ ला लिहिलेलं,

आज गवसलेलं, 

शेवटच्या ओळी लिहून तुमच्यासाठी सादर..

©राधा_उवाचं..

Picture Credits - ©Swapnil Bhade