Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Tuesday 13 November 2018

वाढदिवस!

वाढदिवस, जन्मदिन, Birthday, सालगिराह इत्यादी इत्यादी अनेक शब्दांनी संबोधलेला एक खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच!
तसंच प्रत्येकाच्या जन्माची काहीतरी कहाणी असतेच..
केव्हातरी आपली आई, आजी, आत्या, काकू, बहीण वगैरे कोणीतरी सांगतंच…साधारण असं "काय सांगू तुला, इतकाss पाऊस पडत होता त्यादिवशी आणि नेमकं घरात कोणी नाही" किंवा "दिलेली तारीख होती महिन्यानंतरची आणि तुला कोण घाई झाली होती, आठव्याच महिन्यात अवतरलास" ..किंवा (विशेषतः आमच्या किंवा आमच्या आधीच्या "दुसऱ्या" मुलींच्या बाबतीत) मुलगी झाली म्हणून बघायला सुद्धा आल्या नव्हत्या सासूबाई"  किंवा "तुझ्या बाबांना कळवलं तेव्हा ते एका हॉटेलात जेवत होते, त्यांनी चक्क तिथे बसलेल्या सगळ्यांना गुलाबजाम द्यायला सांगितले!!"
एक ना दोन! अशी आपल्याच जन्माची कथा रंगवून रंगवून नातेवाईक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो! तेवढंच काय ते आपल्याला समाधान!
कधी कधी बारीक विचार केला की कळतं आपल्या जन्माने आपण कित्तीsss लोकांना आनंद दिलेला असतो. आई-बाबांच्या डोळ्यात तो आयुष्यभर दिसतोच! आपण म्हणजे ज्यांची दुधावरची साय असतो त्या आजी-आजोबांच्या प्रत्येक स्पर्शात तो दडलेला असतो..
आपल्या मोठ्या भावंडांच्या चिडवण्यात तो दडलेला असतो, प्रत्येक लहान भावंडाला हमखास हे ऐकायला मिळतं - तू सावत्र आहेस, तुला कोंड्यावर घेतलं आहे वगैरे वगैरे!
हे झाले घरातले अगदी जवळचे लोक, ह्या नंतर येतात नात्याने जवळचे नसलेले, पण सहवासाने जवळचे असलेले म्हणजे शेजारी!
चाळ संस्कृतीत बघायला गेलं तर मुलं आपल्या घरी कमी आणि दुसऱ्याच्या घरीच जास्ती असतात..कारण सगळ्यांची दारं सतत उघडी असतात आणि कुणाच्याच घरात जायला संकोच वाटत नाही!
ह्या लोकांनी आपल्याला अंगा-खांद्यावर खेळवलेलं असतं..कित्येक वेळेला आपल्या आईने, " जरा ह्याच्याकडे बघा, मी पटकन भाजी घेऊन येते!" असं हक्काने सांगून निर्धास्तपणे आपल्याला ह्या सगळ्यांवर सोपवलेलं असतं! आपल्या नुसत्या खिदळण्याने ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो ते हेच सख्खे शेजारी!
त्यानंतर येतो उर्वरीत परिवार!
परिवारातील प्रत्येक व्यक्तीशी आपलं एक equation असतं!
काही भावंडं, मामा, आत्या इ. खूप हव्याशा वाटतात तर काहींना टाळावं कसं ह्याचे बहाणे शोधत असतो आपण! पण ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या येण्याने एक बारीकसा का होईना, फरक पडलेला असतोच!
मग कळायला लागल्यानंतर येतो मित्रपरिवार! केव्हातरी एखादा मित्र म्हणून जातो, "यार तू नसतास तर काय झालं असतं आज!"..
तसं बघायला गेलं तर हे वाक्य किती कॉमन आहे नाही..?
आपल्या भावनांच्या एखाद्या परमोच्च क्षणी आपण आपल्या तारणहार व्यक्तीला किती सहज हे म्हणून जातो!
पण अगदी शब्दशः विचार करत मागे गेलो आणि असं समजलो की आपण जन्मालाच आलो नसतो तर या प्रत्येकाच्या आयुष्यात काय फरक पडला असता…?
खरं या जगाचा अलिखित नियमच असा आहे की कोणावाचून काही अडत नसतं!
हे जरी खरं असलं, तरी प्रत्येकावाचून काहीतरी बदल होत असतात! काही अडत नसेल नक्की, पण फरक नक्कीच पडत असतो!
आपण जन्माला येतो, आणि बहुतेक वेळा प्रत्येक जन्माला आलेला जीव आनंद घेऊन असतो…काही अपवाद असणारच!
आपल्या येण्याने आणि आपल्या असण्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती फरक पडतो हे बरेचदा आपल्याला माहीतच नसतं!
तसं असतं तर कदाचित आत्महत्यांचं प्रमाण इतकं जास्ती नसतं आपल्याकडे!
काहीही न करता आपल्याला एक सुंदर आयुष्य आयतं मिळत असतं..
त्याला आकार देणं मात्र आपल्या हातात असतं!
आता प्रत्येक जीव अगदी सुस्थितीत असलेल्या परिवारात जन्म घेईलच असं नाही, अनेकांना जन्मतः परिवार काय एक आई सोडल्यास कुणीच नसतं..पण तरी असे अनेक लोक आपल्या आयुष्याला सुंदर आकार देत असतात आणि दुसऱ्यांपुढे आदर्श ठेवत असतात, त्या प्रत्येकाला एक कडकडीत सलाम!
काही महाभाग असेही असतात की असलेल्या सुस्थितीत तंगड्या पसरुन वर उद्धटपणे तोंड वर करुन आपल्यालाच सांगतात आमच्या सात पिढ्या बसून खातील इतकी इस्टेट आहे आमची!
पण त्यांना बिचाऱ्यांना असा प्रश्न कधी पडत नसेल का की आपला जन्म काय इस्टेट वाया जाऊ नये म्हणून झाला काय..?
असो..
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या एका सुंदर आणि सगळ्यात महत्वाच्या आठवणीचा उजाळा करणारा दिवस असतो!
प्रत्येक वर्षी आपण वयाने, शरीराने, बुद्धीने वाढत असतो!
पण प्रत्येक वाढदिवसाला आपलं आयुष्य एका वर्षाने कमी होत असतंच की!
वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे होतीच, पण त्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत चालला आहे!
पूर्वीच्या काळी वाढदिवसाला औक्षण केलं जायचं, झालंच तर एखादा नवीन कपड्याचा जोड मिळायचा..
नंतर नंतर आसपासच्या लहान मुलांना घरी बोलावलं जाई..
मग केक कापायची एक प्रथा रूढ झाली..
नंतर सगळ्यांना एखाद्या हॉटेल किंवा मूल लहान असेल तर हॉलमध्ये बोलावून जेवण द्यायची पद्धत आली..
मध्येच अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करायची एक लाट येऊन गेली..
आणि सध्या म्हणजे सकाळी घरातून गेलं की पार्टी (पार्ट्या) करुन उत्तर रात्री घरी येण्याची प्रथा रूढ होत आहे!
अर्थात या सगळ्याची टक्केवारी ६०-८० टक्के असेल!
बाकी २०-४० टक्के लोकांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करणारे, एकट्याने साजरा करणारे, लक्षात असून साजरा न करणारे, लक्षातच नसणारे, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा घरच्यांची हौस म्हणून साजरा करणारे इ. लोक येतातच!
प्रत्येक वाढदिवसाच्या आपल्या आठवणीही असतातच..
फोटोत बघितलेला पहिला वाढदिवस..
खरं पहिला वाढदिवस दणक्यात केला जातो, पण त्यात त्या मुलाला काय कळत असतं हा मोठा प्रश्नच आहे!
त्या नंतरचे लहान मुलांच्या घोळक्यात केलेलं वाढदिवस..
शाळेत नवी ड्रेस घालून केलेले वाढदिवस..
कॉलेजमध्ये मित्रांना पहिल्यांदा बाहेर पार्टी दिलेला वाढदिवस..
स्वतःच्या कमाईतून घरच्यांसाठी काहीतरी नेलेला वाढदिवस!
प्रेमात पडल्यानंतरच्या वाढदिवस!
(प्रेमभंगा नंतरचा एखादा sad वाढदिवस)
लग्नानंतरचा वाढदीवस!
आपल्या पोटच्या गोळ्याने पहिल्यांदा आपल्याला बोबड्या बोलात विश केलेला वाढदिवस!
नंतर मुलं मोठी झाल्यावर त्यांनी आपला साजरा केलेला वाढदिवस!
पन्नाशी, साठी, सत्तरी, पंचाहत्तरी, अंशी!
बघा किती आठवतायत ते!
हल्ली तो YOLO चा फंडा आलाय खरा, पण त्या बरोबरच प्रत्येक माणसाने वाढदिवशी मागे वळून त्या वर्षात आपण काय चांगलं केलं, काय शिकलो, इतरांना काय दिलं…एकूणच काय कमावलं आणि काय गमावलं ह्याचा विचार करुन तो दिवस साजरा करावा!
शेवटी प्रत्येक माणूस हा स्पेशल असतोच, अनेकांसाठी!
आणि सहज म्हणून हवंतर आपल्या वाढदिवसाला हा खेळ खेळून बघा, आपल्या जवळच्या लोकांना एवढंच विचारा की माझ्या असण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला…?!
ता.क. - मित्रांना विचारू नका, घोर निराशा झाल्यास मी जबाबदार नाही!
जाता जाता हा लेख त्याच्या स्फुर्तीस्थानाला, एका नवीन मैत्रीला आणि खास विसराळू मित्राला अर्पण,
ज्याने आज सहज मला सांगितलं, "अगं आपण उद्याच्या ऐवजी परवा भेटूया! माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे की उद्या माझा वाढदिवस आहे!"
काय बोलणार आता…?!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
जुग जुग जियो मित्रा! :)
©कांचन लेले
Photo Courtesy - Google

Thursday 2 August 2018

नटखट लल्ला!

नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो,
नटखट लल्ला जेव्हा चार महिने अवतरतो,
तेव्हा अनेक रूपाने चराचराला व्यापून टाकतो..!
आला की चैतन्यात येतो..
ढगात लपून बसला की मात्र नैराश्य देतो..
नकोसा वाटला की हक्काने समोर येऊन उभा रहातो,
आणि हवाहवासा वाटला की ढगांआडून हुलकावण्या देतो!
किती वाट पहायला लावायची...? असं म्हणून आपण दरडवावं तर इतका मोहक बरसतो की धरणीमाताच त्याची बाजू घ्यायला सुगंधाने उभी रहाते!
मग आपणही पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्यावाचून राहूच शकत नाही!
तो असाच आहे..तुम्ही त्यावर प्रेम करा अथवा द्वेष करा,
तुम्ही त्याला टाळू शकत नाही..आणि आला की प्रेमात पडल्यावाचून राहू शकत नाही!
शेवटी सगळ्यांची तहान भागवणारा तो एकच तर आहे!
मग सांगा त्याला कृष्ण म्हंटलं तर चुकलं कुठे..?!
©कांचन लेले
Photo Credits - Google

Tuesday 29 May 2018

अमावस्येचा चंद्र!


अमावस्येचा चंद्र!
अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र!
शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे!
चंद्र…
सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती!
शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना!
खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत..
गमतीदार आहे नाही..?
तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो..
किती दिवस आपलं लक्ष जातं..?
पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही!
अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..'
कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक!
पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला..
शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त्यासारखं सुख नाही! तो १५ दिवस असतो, पण लक्ष मात्र जातं आपलं फक्त पौर्णिमेला! त्यादिवशी नजर ठरत नाही असं रूप धारण करतो तो..
मग त्या दिवशी जरा ढगांआड गेलेला दिसला तरी आपण सारखे बघतो की ढग गेले की नाही, चंद्र पूर्ण दिसतो की नाही! जवळपास ढग म्हणजे त्याच्या उत्कर्षाला, सौंदर्याला लागणारी दृष्टच जणू!
पुढे वद्य प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत त्याची तब्बेत खालावत जाते..त्यातही एक वेगळं सौंदर्य धारण करून असतोच तो, फक्त आपलं लक्ष जात नाही! मग अचानक एक दिवस अंधःकार जाणवू लागतो…कदाचित या धकाधकीच्या आणि जलद जीवनपद्धतीत फक्त क्षणभर जाणवत असेल, पण तेवढा पुरून उरतो!
अचानक चंद्राचं महत्व कळतं..पण प्रतिपदेपर्यंत वाट बघावीच लागते!
म्हणून अमावस्येला चंद्र जास्त हवाहवासा वाटतो!
माणसांचंही काही वेगळं नसतं…
प्रत्येक व्यक्तिभोवती एक वलय असतं..
त्यात अग्रगण्य परिवार, मग नातलग, दोस्त मंडळी आणि आणि काही अशी नाती जी रक्ताची नसतात पण त्याहून सरस ठरतात!
ह्यातली काही माणसं सतत आपल्या अवतीभवती असतात, काही असतातच असं नाही, पण दोहोंपैकी कोणी लांब गेलं की पोकळी मात्र जाणवते!
उदाहरणार्थ घ्यायचं झालं, तर वडीलधारे आपल्या जन्मापासून-वयात येण्यापर्यंत पौर्णिमेचं शिखर गाठून जातात! पुढे एका एका कलेने बारीक होत जातात..तेव्हा गरज असते खरं लक्ष देण्याची! पण दुर्दैवाने बरेचदा आपलं लक्ष जातं ते एकदम अमावस्येलाच…
आणि सामान्यतः बघायचं झालं तर,
अनेक माणसांनी आपलं छोटंसं जग व्यापलेलं असतं..
ही माणसं सतत आपल्यासाठी असतात..काहींच्या संपर्कात आपण असतो सतत..पण काहींशी मात्र आपल्याला रोज संवाद साधता येतो, भेटता येतं असं नाही..ते त्यावर रागवतही नाहीत, ते सुद्धा असतात चंद्रासारखे सतत साक्षीला!
आणि कुठलंही नातं प्रेमाने आपलंसं केलं की ते दिवसागणिक कलेकलेने दृढ होत असतं.. ऋणानुबंध तयार होत असतात!
अशातच ज्या दिवशी ही मंडळी काही काळासाठी का होईना, पण लांब जातात असं दिसतं तेव्हा मात्र मन उचंबळून येतं!
डोळे पाणावतात! आपल्याला माहीत असतं की ती काही कायमची चालली नाहीत, सुट्टी संपली, काम झालं किंवा इतर असलेलं नियोजन साफल्य पावलं की ते येणार आहेत परत! पण तरी वेडं मन ऐकत नाही..
सतत आठवण काढत रहातं आणि मग आपणही खूप आतुरतेने वाट पहातो ती प्रतिपदेची!
कदाचित चंद्रही वाट पहात असतो प्रतिपदेची..
कारण अमावस्येला तुम्हाला तो दिसला नाही तरी तो बघत असतो तुम्हाला आणि असतो तुमच्या बरोबरच...कायम!
फक्त थोडासा ब्रेक घेतो अधूनमधून..कारण शेवटी
विरहाने नात्यातील प्रेम वाढत असतं ना!

काही विशेष लोकांना समर्पित ज्यांच्याशिवाय आयुष्य इतकं सुंssदर नसतं! I'm missing you all! लवकरच भेटू! :)
©कांचन लेले

Saturday 12 May 2018

मातृत्व!


स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी..
असं पूर्वापार मानलं गेलं आहे…
आई!
या एका शब्दभोवती खूप मोठ्ठं वलय आहे…
आणि म्हंटलं तर तो फक्त दोन अक्षरी शब्द आहे!
म्हणजे कुठूनही घरात आलं आणि आईने दार नाही उघडलं की पहिला प्रश्न असतो "आई कुठंय?"
तिच्याकडे काही काम असतं असं नाही.. पण तरी तिचं असणं गरजेचं असतं..
बरं वाटत नसलं की कुणी म्हणतं डॉक्टरांकडे जाऊ..तेव्हा उत्तर एकच असतं..आधी आईला बोलवा..
कुठलीही वस्तू सापडत नसेल की वरवर शोधूनच पहिला फोन जातो आईला..मग अगदी लगेच सापडते…बरेच दिवस बाहेरगावी असलं की फोन करो ना करो, पण परतायच्या एक दिवस आधी जेवायला काय हवंय ते सांगायला फोन नक्की होतोच! एक ना दोन..म्हणून म्हंटलं..मोठ्ठं वलय आहे!
शाळेत असताना आम्हाला एक कविता होती..
आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर,
निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर!
डोक्याने खूपच लहान होतो तेव्हा..पण आईवर काहीतरी म्हणजे भारी ना..असं वाटायचं!
पण 'आकाशाएवढा पदर' असं वाचल्यावर घरी जाऊन दोन्ही हात पसरून तो मोजला नक्कीच असेल कोणीतरी! कारण त्या वयात 'मायेचा' या शब्दाचा अर्थ तितकासा कळत नसतो..
पण वर्षं उलटत जातात आणि अर्थही लागत जातात..
काही लोकांना वाटत असेल इतक्या लहान मुलांना हे काय कळणार..? नाहीच कळत..मान्य आहे..पण त्या लहान वयात शिकलेलं, मुलं कधीच विसरत नाहीत..त्यावेळी त्यांचा मेंदू टिपकागदाचं काम करत असतो.. आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा खरंच कळु लागतं, तेव्हा हे टिपलेलं सगळं रवंथ करत जातो..
संस्कार आणखी वेगळे काय असतात..?
फक्त चांगलं पेरत जायचं..इतकंच!
संस्कार म्हंटलं की पुन्हा आईचा त्यात सिंहाचा…अ…सिंहिणीचा वाटा असतो असंही मानलं जातं!
अगदी मातृत्वाची चाहूल लागल्यापासून एका स्त्रीचं, किंबहुना हल्ली बरेचदा एका बेफिकीर बिनधास्त मुलीचं रूपांतर 'आई'मधे होतं..मग चांगलंच खायचं, चांगलं ऐकायचं, चांगले विचार करायचे इत्यादींची मनात यादी केली जाते..गर्भसंस्काराची पुस्तकं पिंजून काढली जातात..पोथ्या पुराण वाढतं..स्वच्छता वाढते आणि कधी नव्ह ते प्रत्येक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागते!
एखाद्या बिनधास्त मुलीच्या भावनांमध्ये तरंग उठत असतात..प्रत्येक गोष्टीवर 'react' व्हायचा 'angle' बदलत असतो..सगळी गणितं बदलत जातात..
लग्नाआधी 'मी नाही असलं काही करणार' असं म्हणणारी मुलगी बघता बघता कात टाकत असते!
हे सगळं बाळ गर्भात असताना..जन्माला आल्यावर तर बघायलाच नको..
जरा आधी म्हणायला गेलं तर बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो..त्या मरणप्राय यातना भोगल्यावरच एका जिवाच्या जन्माचा आनंद असतो! आपलं बाळ, आपल्या पोटचा गोळा!
पण जन्मा नंतर  मात्र त्या बाळाचे अनेक वाटेकरी असतात! फक्त गर्भात असताना ती एकटी मालकीण! त्या नंतर तिचं आयुष्यच बदलून जातं..खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो!
कारण ती स्वतःला विसरून जाते..आणि फक्त आई म्हणून जन्माला येते! अगदी सगळ्यात आवडत्या गोष्टीचा मोह सुद्धा ती सहज सोडून देते, कारण एकच असतं, घरी पिल्लू वाट बघत असेल!
खरंतर बरेचदा पिल्लू मजेत असतं, पण तिलाच करमत नाही त्याच्यावाचून!
पण हा आनंद प्रत्येक स्त्रीला अनुभवता येतोच असं नाही ना…?
मातृत्व हे कायम आईशी जोडलं गेलेलं आहे..
अर्थात ते सत्यही आहेच..पण खरंच या संज्ञेची व्याप्ती इतकीच आहे…?
नाही..नक्कीच नाही..जितकं मोठ्ठं वलय 'आई' या शब्दाभोवती आहे, त्याहून कितीतरी अधिक मोठं ते 'मातृत्व' या संज्ञेभोवती आहे!
पुराणातील उदाहरण घ्या, देवकी आणि यशोदा..
एक आई होती नात्याने, दुसरी ममत्वाने!
मातृत्व हे ममत्वाशी जोडलेलं आहे..
काही स्त्रियांना निसर्गाने गर्भधारणेचा अधिकार दिलेला नसतो, काहींना दिला असून त्याची कदर नसते, काहींचं लग्नच होत नाही, तर काही स्त्रिया आई होऊनही आपल्या मुलाला मातृत्वाने वाढवू शकत नाहीत!
अजब दुनिया आहे आपली..
पण म्हणून या जगात जन्माला येणारी मुलं वाढायची थांबत नाहीत ना..?
ज्यांना आई नाही, त्याची आई होणारं कुणीतरी असतंच ना..? मग ते अगदी बाबा, आजी, आजोबा, मावशी, आत्या, शाळेतल्या बाई, अनाथाश्रमातल्या बाई, पाळणाघरातल्या बाई इत्यादी इत्यादी..यादी खूप मोठी होऊ शकते..
कधी कधी एखादी मैत्रीणच आपली आई होऊन जाते..तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या हळव्या क्षणी मित्र असा डोक्यावर हात ठेवतो की क्षणभर कळूच नये नेमका कोणाचा हात आहे ते!
कधी एखाद्या एकट्या मुलाने एखादी मांजर किंवा कुत्रा पाळला असेल तर त्याचं नीट निरीक्षण करून बघा..तो त्याची आई झालेला असतो केव्हाच!
जन्मलेल्या प्रत्येक जीवामध्ये मातृत्व दडलेलं असतं..आणि प्रसंगानुरूप ते बाहेर येत असतं!
म्हणून म्हंटलं खुप मोठी व्याप्ती आहे 'मातृत्वाची'!
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी कळत नकळत प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात जेव्हा आई समोर नसते त्या क्षणाला..पण ती जागा तात्पुरती कुणीतरी भरून काढत असतं!
ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना कधी कुणाच्या मुलांना सांभाळताना बघितलं आहे..?
पोटच्या गोळ्याला कुणी लावणार नाही इतका जीव ती माऊली कुठल्याही मुलाला सहज लावते..
निसर्गाची क्रूर चेष्टा तिच्यातील मातृत्व आणखी दृढ करते हे मात्र निश्चित!
अशा प्रत्येक माउलीला एक सलाम आणि लोकांमध्ये दडलेल्या मातृत्वाच्या ओढीला नम्र अभिवादन!
अशा अनेक जीवलगांनी आयुष्य सुंदर होत असतं..
गरज असते फक्त त्यांना धरून ठेवण्याची
आणि प्रत्येकाने आपल्यातील संवेदना जपण्याची, न जाणो तुम्हीच कधी कुणाची आई होऊन जाल!
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
©कांचन लेले

चित्र सौजन्य - Google

Friday 11 May 2018

आंडू गुंडू थंडा पाणी!


काल एका बाल मैत्रिणीने एक 'meme' पाठवलं..
त्यात एक जण दुसऱ्याला म्हणत असतो - "ए तो बघ south indian!"
आणि दुसरा लगेच ओरडतो - "ए आंडू गुंडू थंडा पाणी!"
एवढं वाचल्याबरोबर माझ्या मनाचं टाइम मशीन अचानक सुरू झालं आणि मला एक दशक किंवा आणखी थोडं जास्ती मागे घेऊन गेलं!
आत्ता मूर्खपणा वाटत असेल पण खरंच आम्ही असं करायचो तेव्हा..दाक्षिणात्य लोकांना आंडू गुंडू म्हणायचो, सरदारजी दिसला की चंगोटी (पहिली दोन बोटं टोकाला टोक जुळवून धरायची, म्हणजे त्यातून एक भोक होतं आणि मग कोणीतरी त्यात बोट घालून ते फोडायचं!),  केस कापले की 'ताजी' मारणं, नवीन वस्तू घेतली आणि कळलं की जोरात धपाटा मारणं, birthday bombs मारणं! इत्यादी इत्यादी!
हे झाले जनरल खेळ..मग शाळेतले खेळ वेगळे!
ऑपस्-बँट्स, जॉली, पेन फाइट, स्केल फाइट..हे न लिहिता खेळायचे खेळ..आणि लिहून खेळायचे तर कहरच!
त्यात दोन प्रकारचे लोक! एक म्हणजे कुठल्याही वहीच्या मागे हे खेळ खेळणारे, तर दुसरे बाकी सगळ्या विषयाच्या वह्या रिकाम्या असल्या तरी त्याला हात न लावता एका वर्षात साधारण ५-६ रफ बुक भरणारे! (म्हणजे माझ्यासारखे!! आणि मग पुढच्या वर्षी विषयांच्या रिकाम्या वह्या रफ बुक म्हणून वापरणारे!!)
तर ह्या खेळात मुख्यत्वे "नाव-गाव-फळ-फुल", बिंगो, एक अक्षर घेऊन जास्तीत जास्त नावं लिहिणं आणि लिहून दम-शेराज (चित्रपटांच्या नावाचा)! हे असायचे! कित्येक वेळा शिक्षक शिकवतानाच ते खेळले जायचे हे वेगळं सांगणे न लगे!
बाकी अगदी लहानपणी चिठ्या टाकून चोर पोलीस वगैरे बरेच खेळ खेळलेलो!
पण आज माझ्याकडे काही वह्या जपून ठेवल्या आहेत त्यात हे सगळे खेळ आहेत! आज बघताना इतकं छान वाटतं..आम्हाला कधी फोनची गरज नाही पडली खेळायला!
आता माझाही वडीलधाऱ्यांसारखा 'आमच्या वेळी…' असा सूर लागतोय पण त्याला पर्यायच नाही!
अलीकडे एका शाळेतल्या मैत्रिणीबरोबर शाळेच्या बाहेरच्या रस्त्याने जाताना आम्ही थांबलो आणि बराच वेळ बदललेली शाळा बाहेरूनच बघितली..
सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या!
खरंतर त्या भागात गेले की नेहेमीच माझा १०० चा स्पीड अचानक २० वर येतो आणि पावलं रेंगाळतात!
एक एक जागा आजही आठवते! इथे कैरीवाला असायचा, इथे बाबू वडापाववाला, इथे झोपडी..
आज यातली अगदी एक दोनच लोकं आहेत..पण ती अजूनही ओळखतात आम्हाला!
त्या झोपडीत पेप्सीकोला, गोळ्या, चिंचेची एक दोन प्रकारची चॉकलेट्स, पेपरमिंटच्या सिगारेट ज्या आमच्यासाठी त्या वेळी 'swag' ची परिसीमा असायच्या! त्या पेप्सी कोला मध्ये सुद्धा दोन प्रकार असायचे! एक जाड जी आठ आण्याला मिळायची आणि दुसरी खूप लांब, कोपरापासून बोटांपर्यंत लांब आणि बारीक जी एक रुपयाला मिळायची!
एकदा जाड पेप्सी संपल्या होत्या तेव्हा मी आणि मैत्रिणीने आठ-आठ आणे एकत्र करून मोठी लांब पेप्सी घेतली..आणि एका बाजूने तिने आणि दुसऱ्या बाजूने मी खाल्ली! किती वेडेपणा!
आता ही मजा कधी घेता येणार..?!
आणखी एक जबराट आठवण म्हणजे..
एका स्पोर्ट्स डे ला मी आणि माझी मैत्रीण चक्क दादरहून कुर्ल्याला चालत आलो! कशासाठी..? तर चिंच आणि कैरी खायची होती पण पैसे नव्हते! म्हणून बसच्या तिकिटाचे पैसे त्यात घालून आम्ही ते खात खात चालत आलो! आता AC गाड्यातून येणाऱ्या पोरांना हे सांगितलं तर हसतील लेकाचे!
पण तेव्हा एवढं उन्हाचं चालून ना आम्ही आजारी पडलो ना आम्हाला कोणी पळवून नेलं! (हे धोक्याचं होतं हा विचारही तेव्हा बालमनाला शिवला नाही!)
असे अनेक किस्से आहेत! 
बिल्डिंग मध्ये खेळायचे खेळ आणखी निराळे
Red Letter, बॅडमिंटन, आणि अर्थातच क्रिकेट..आणि तेव्हाचं क्रिकेट आणी बॅडमिंटन खेळायचे विशेष नियम बरं! क्रिकेट म्हणजे अर्थातच एक टप्पा आउट! आणि बॅडमिंटन म्हणजे एकदा शटल खाली पडलं की गेला टर्न! काय मज्जा यायची पण!
गटारात बॉल गेला की हातानेच तो काढणं, सुदैवाने
आमच्या वेळी लाइफ बॉय हॅन्ड वॉश नव्हता बाई!
आणि तरी आम्ही धुवत रहा धुवत रहा…असं काही केलं नाही बाबा….असो! 
प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये किंवा सोसायटी मध्ये एखाद्या आजी असतातच ज्या कायम मुलांच्या खेळण्यावर डोळा ठेवून असतात! मग त्यांना मुद्दाम पिडणं आलंच! शाळेतही आम्ही कित्येक शिक्षकांना नावं पाडली होती, अर्थात टोपण नावं! मी तर एक चार पानी कविता सुद्धा केली होती!
एक ना दोन!
पण ह्या सगळ्या भानगडीत आम्ही कधीच मोठ्यांचा अनादर नाही केला..टिंगल मणभर केली, पण मन भरून आदरही दिलाच!

हा महिनाच असा "nostalgic" होण्याचा आहे नाही..?!
विशेषतः उन्हाळी सुट्यांमुळे!
प्रत्येकाच्या बालपणीच्या, उन्हाळी सुट्य्यांच्या, मामाच्या गावाच्या कित्ती आठवणी असतील ना..?
माझ्यामते आम्ही सगळ्यात भाग्यवान..आमचं बालपण कोकणात गेलं!
आंब्याचा वीट येण्याइतका अस्सल हापूस खाण्यात आणि नंतर गळवं आली की इंजेक्शन घेण्यात गेलं!
ते सुट्टीचे खेळ आणखीनच वेगळे! 
जिना भो! किंवा डबा ऐस पैस..डोंगर का पानी, विष अमृत, इत्यादी! सकाळचा मऊ भात खाल्ला की मागे पाय लावून जे पसार व्हायचो ते दुपारी जेवायला हाका मारून बोलवायला लागायचं..पुन्हा निजा-निज झाली की कोणाच्यातरी माडीवर जमून लपाछपी, सोंगट्या, भातुकली वगैरे खेळायचं..किंवा ठकठक, चंपक, चांदोबा वाचायचं!
संध्याकाळी पुन्हा खळ्यात! मग सातच्या जरा आधी घरात जायचं, हात-पाय धुवायचे..आणि शुभंकरोती म्हणायला सगळे झोपळ्यावर! मग रात्र असायची पत्यांच्या नावावर! आणि शेवटी अगदी घाबरत असूनही लाइट घालवून भुताच्या गोष्टी ऐकायच्या, आणि सगळे झोपले की पांढरे पंचे हवेने हलले तरी रामरक्षा म्हणायला सुरवात करायची!
भाड्याने कॅसेट आणून पिक्चर बघणं! मारिओ सारखे खेळ खेळणं! फक्त मे महिन्यातच व्हायचं!
त्या वेळचे पिक्चर सुद्धा इतके भारी असायचे, मुख्य म्हणजे संपूर्ण परिवाराबरोबर बसून बघता यायचे..कारण सगळ्यात हॉट scene दाखवायचा असेल (म्हणजे थोडक्यात bedroom scene) की दोन फुल एकमेकांवर अपटायची आणि ब्लॅक आऊट होऊन पुढील सिन सुरू व्हायचा..समझने वाले समझते, बाकी सचमे pogo देखते!
हल्ली काही scenes दाखवायला bedroom लागतेच असंही नाही, आणि ते बघायला कोणाला बंदी करतात असंही नाही! Afterall we should give children their own space!
द्या स्पेस..आणि मग खऱ्या space मध्ये जायची स्वप्न बघायच्या ऐवजी वाया जातायत पोरं!
अर्थात प्रत्येक generation मधे वाया जाणाऱ्या पोरांचा एक भाग असतोच, पण त्यात कमालीची वाढ होते आहे हे दुर्दैव! हल्लीची पोरं खूप शार्प आहेत..पण त्यांची ही हुशारी योग्य कामी येत नाही हे दुर्दैव!
अलीकडेच मी शाळेत गेले होते, प्रिन्सिपल कडे काही काम असल्याने ऑफिसच्या बाहेर बसले होते, तेवढ्यात एक टीचर आल्या..एक साक्षात्कारी नजर माझ्याकडे टाकली आणि म्हणाल्या "तुम्ही फाssर  बरे होतात गं!" मी सुद्धा गमतीत तेव्हा "बघा, तेव्हा आम्ही हे म्हणायचो तर तुम्हाला पटायचं नाही!" असं उत्तर दिलं खरं पण हल्लीच्या शिक्षकांची व्यथा तेच जाणे! आधी जनरेशन गॅप ही खरोखर एका पिढीची असायची, हल्ली ती दशकावर येऊन ठेपली आहे!
असो!
आमचं बालपण मात्र खूपच भारी होतं!
आठवणी काढू तेवढ्या थोड्याच!
रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी!
बरं त्या वयातल्या महत्त्वाकांक्षा तर इतक्या भारी असायच्या की दृष्टच काढावी स्वतःची!
रोज काहीतरी नवं व्हायचं असायचं आपल्याला..
काही उदात्त विचारांच्या लोकांना डॉक्टर वगैरे व्हायचं असायचं..पण मला आपलं इस्त्रीवाल्याला बघितलं की इस्त्रीवाला व्हायचं असायची, त्याचं ते सफाईदारपणे शर्ट सुरकुती न पाडता उलट करणं आणि कडक घडी करणं मला जाम आवडायचं!
मला बसची, कंडक्टर ओढतो ती दोरी आणि तिकीट पंच करायच्या स्टॅपलर सारख्या वस्तूची टिकटिक पण आवडायची..म्हणून मला कंडक्टर व्हायचं होतं..नंतर मला ACP प्रद्युमन व्हायचं होतं! जाऊदे लिस्ट फारच लांब होईल आणि उगच कशाला स्वतःची अक्कल पाजळा ना! 
पण आज मागे वळून बघितलं की वाटतं हे सगळं भांडवल आहे आपल्या आयुष्याचं!
हल्ली डिप्रेशन नावाचा एक साथीचा रोग पसरत चालला आहे...मला मनापासून वाटतं, जेव्हा असे क्षण येतील तेव्हा ह्या सगळ्या आठवणी किती मोठा आधार आहेत! एक गोष्ट जरी आठवली तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य विलसतं! मग डिप्रेशनकी क्या हिम्मत मुझे हात लागये..?!
सुखी आयुष्याचा कानमंत्र सांगते..असं कधीही झालं की तुम्ही लहानपणी केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा करून बघा! कल्ला करून बघा! शाळेतल्या मित्रांना भेटा! पुन्हा आयुष्य भरभरून जगावंसं वाटेल!
"पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे किती वाटते..
उतरून ओझे वयाचे चला रे, पहा कोवळे ऊन बोलावते!
वर्षांचे पूल आज, ओलांडून ये आल्याड!
घे तुला हवीच मधली सुट्टी!
थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी!"
( कवी - संदीप खरे!)
सध्या परीक्षेचा काळ आहे..आणि मागच्या रिकामटेकड्या महिन्यात काही म्हणजे काही सुचलं नाही..आता कादंबरी लिहून होईल इतकं सुचतं आहे..आता येतं ह्याचं डिप्रेशन मला..पण उद्या त्यावर एक उपाय करणार आहे!
उद्या एखादा दाक्षिणात्य दिसल्यावर जोरात ओरडणार आहे
 'एsss आंडू गुंडू थंडा पाणी!!!!"

©कांचन लेले

Monday 23 April 2018

अंत


पृथ्वीतलाच्या भवपटलावर विधात्याने मांडलेल्या खेळातील कटपुतळ्या म्हणजे माणूस…
या पृथ्वीवर एके काळी जीव निर्माण झाला..
मग जीवाचे विविध प्रकार निर्माण झाले..
सुक्ष्मापासून सुरुवात होऊन अगदी अवाढव्य जीव सुद्धा ह्या पृथ्वीने निर्माण केले..आणि पुन्हा स्वतःच्या पोटात त्यांना जागा दिली…
मग पाण्यात रहाणारे, जमिनीवर रहाणारे चार पायी,  अवकाशात उंच भरारी घेणारे दोन पायी, सरपटणारे, वळवळणारे, कीटक, अनेक पायी इत्यादी इत्यादी…आणि प्रत्येक प्रकाराच्या अनेक जाती…variety मध्ये कुठेही कमी ठेवली नाही त्या विधात्याने…
सोबतीला हिरवागार निसर्ग दिला..डोंगर दऱ्या, धबधबे, महासागर, समुद्र..प्रदेश जोडणाऱ्या आणि अवखळपणे वाहणाऱ्या नद्या दिल्या..
वरती आकाशात दिवस रात्रीची विभागणी करून दोन खंदे पहारेदार दिले ते म्हणजे चंद्र-सूर्य..आणि रात्रीच्या अंधाराला चंद्राला आणखी अगणित हात म्हणून तारका दिल्या…
आणि या सगळ्यांची काळजी घेणारा आणि सर्वत्र विहार करणारा वायू दिला…
पुढे या सगळ्याची सुंदर गुंफण होऊन ऋतुचक्र सुरू झालं…विविध ऋतू काही काळाने बदलत गेले..मग त्या त्या ऋतूमध्ये वाढणारी झाडं-फळं-फुलं आली..
अगदी अगदी दृष्ट लागण्यासारखं जग निर्माण केलं..
मग या जगाला खरी दृष्ट लागली…किंवा या जगाचा उद्धार करण्याची क्षमता खऱ्या अर्थाने असणारा निर्माण झाला…जो अर्थ वाटतो तो घेऊ शकतो!
मानवाची उत्क्रांती झाली…
असं मानलं जातं की माकडाच्या विशिष्ट जातीतून पुढे मानवाचा जन्म झाला…
आता इतके जीव निर्माण केले त्यात मानव आणखी एक, त्यात काय नवल…?
पण कदाचित माणूस निर्माण करताना विधाता द्युत खेळत असावा कदाचित…म्हणून अशी चमत्कारिक निर्मिती त्याच्या हातून झाली!
पुढे माणसाने खऱ्या अर्थाने सिद्ध केलं की तो ह्या सृष्टीची सर्वोत्तम निर्मिती आहे..जग कुठून कुठे नेऊन ठेवलय आज माणसाने! केवळ त्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर अनेक शोध लावले, विज्ञानात प्रचंड प्रगती केली!
ह्या सगळ्या निर्मितीनचा मिलाफ करून जे जग निर्माण केलं ते तर किती अद्भुत!
कवी संदीप खरे म्हणतात
"सुरवंटातून कधी सुरंगी फुलपाखरे उमलवशी,
कोठे राजस कमळ फुलवुनी भवताली चिख्खल रचशी,
जलथेंबांचे करशी मोती, मोत्याची माती करशी,
ज्याची त्याचि मापे सारी काय हिशोबाने भरशी…?!"
या शेवटच्या ओळीवर मात्र मला कायम थबकायला होतं…
फक्त एकाच गोष्टीवर आजवर कुणालाही उपाय शोधता आला नाही…
कुठली गोष्ट…? सोप्पं आहे की…
मरण…
मृत्यू..
अंत.
कधी केव्हा कुठे येईल हे आजवर कुणालाही सांगता आलेलं नाही…मग तो कितीही मोठा वैज्ञानिक असो किंवा सामान्य माणूस असो…
या एका भीतीने पछाडलेला असतो माणूस अंतर्बाह्य...
उपाय मात्र काहीच नाही…
म्हणून सुरवातीलाच म्हंटलं, मनुष्य म्हणजे केवळ कटपूतळी आहे…केव्हा खाली सोडायची आणि केव्हा वर उचलून आणायची हे मात्र त्याच्या हातात…
पण तरी प्रश्न उरतोच तो म्हणजे
"ज्याची त्याची मापे सारी काय हिशोबाने भरशी…?"
काय अधिकार असतो त्याला भरलेल्या संसारातून एखाद्याला घेऊन जायचा…?
काय अधिकार असतो एखाद्या लेकराला माता-पित्यापासून वेगळं करण्याचा..?
काय अधिकार असतो अंगा खांद्यावर खेळलेल्या, नुकत्याच वयात आलेल्या मुलाला आई-वाडीलांदेखत हिसकावून घेण्याचा…?
जन्माला आलेला मरणारच हे जर विधात्याने निर्मिलेल्या जगाचं सत्य असेल आणि जर मानव,पशु,पक्षी हे सुद्धा त्याचीच निर्मिती असेल तर मग मृत्यू पचवण्याची ताकद सुद्धा जन्मतःच का देत नाही तो या जीवांना…? या अंतापायी किती क्लेश..?
एक कवी असं म्हणतो तर एक कवी, कवी भा. रा. तांबे मारणाचं सत्य स्वीकारून आणि त्याहीपुढे जाऊन म्हणतात,
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?
खरंच..काय बदलतं एक सामान्य व्यक्ती गेल्याने..? ह्या अवाढव्य जगात त्याचं वलय ते किती..? १००० माणसाचं..? डोक्यावरुन पाणी १०००० माणसाचं..?
पूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात ही संख्या खूपच क्षुल्लक नाही का..?
माणसाच्या जाण्यानं ना चंद्र-सूर्य त्यांचं कार्य थांबवतात ना ऋतू…काळ पुढे जातच रहातो..
आणि मनुष्य सुद्धा पुढे जातोच की…आपली कितीही जवळची व्यक्ती गेली तरी आपण काही दिवसांपलिकडे निष्क्रिय बसूच शकत नाही..शेवटी पापी पेट का सवाल है ना!
पण ह्या मृत्यूच्या त्रासाचं खरं कारण  मात्र वेगळंच आहे..ते म्हणजे भावना..किंवा भावनिक गुंतवणूक…कुठल्याही FD पेक्षा मौल्यवान…
देवाने शरीरात जे अवयव दिले त्या बरोबरच एक अदृश्य मन दिलं…आणि याच मनावर चालतो खरा आयुष्याचा खेळ!
जो माणूस आपल्या मनातून उतरलेला असतो त्याच्या मृत्यूने आपल्याला विशेष फरक पडत नाही..पण एखाद्या जीवलगाचा मृत्यू मात्र कायमचा चटका लावून जातो…अंताची क्रिया समान आहे, पण फरक पडतो तो भावनिक गुंतवणुकीने…
आपण आपल्या माणसाला जीव लावतोच, आपल्या म्हणजे रक्ताच्या नात्याने जोडलेल्या! पण माणसाच्या छोट्याशा विश्वात असे अनेक जीवलग येतात ज्यांचा त्याच्याशी खरंतर काही संबंध नसतो…पण कधीकधी सूर जुळायचे असतात ते जुळतातच!
मग दिवसागणिक नातं फुलत जात..
आणि दिवसागणिक माणूस इतका सवयीचा होतो, की आपण आपल्याच माणसाला गृहीत धरत जातो..
आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटायला वेळ काढायला दिरंगाई करतो, वेळ द्यायला मागे पुढे बघतो…
भेटू ना उद्या, कुठे पळून जातोय…असा विचार करतो…
आणि..आणि अशाच वेळी नेमकी ती व्यक्ती पळून जाते…कायमची…जीवाला घोर लावून…
मग हातात उरतात त्या फक्त आठवणी…
ती व्यक्ती तर निघून जाते, पण प्रत्येक वेळी एखाद्या नेहेमीच्या भेटायच्या ठिकाणी गेलं की नकळत कुठेतरी ती दिसेल असं वाटतं..तिच्या आवडती गोष्ट समोर आली की घास नकळत अडकतो…
एखाद्या कलेशी ती निगडित असेल तर प्रत्येक उल्लेखासरशी तिची आठवण अगदीच ताजी होते..
तिच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक हाती घेतलं की मन भुर्रकन उडून त्या व्यक्तीपाशी जातं..
अगदीच काही नाही तर एखाद्या दिवशी चांगली घटना घडली की रात्री उशीवर डोकं टेकल्या टेकल्या डोळे भरून येतात…
आणि शेवटी म्हणजे त्याच्या वाढदिवसाला आणि मृत्यू दिवसाला दिवसभर अस्वस्थता वाटते..
आणि सतत काहीतरी राहून गेल्याची भावना मन खात रहाते…दुःख करत बसण्यापलीकडे हाती काही उरत नाही…श्वास बंद पडत नाहीत की भूक लागायची थांबत नाही…पण ज्याच्यासाठी घालमेल होते तो मात्र कुठेतरी शांssत असतो…अगदी शांत..
मृत्यू अटळ आहे, आणि त्याची नेमकी वेळ कळणंही अशक्य आहे हे त्रिभुवनातील सत्य आहे!
अशावेळी मृत्यू, स्वतःचा व स्वतःभोवतीच्या लोकांचाही कसा सुसह्य करू शकतो आपण एवढंच आपल्या हातात रहातं…
मृत्यू हे एक असं सत्य आहे जे कधीच सुसह्य असू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे…
पण तरी..
आणखी एक गोष्ट एकदम खरी आहे ती म्हणजे अंत हा सगळ्यात मोठा गुरू आहे…तो खूप काही शिकवून जातो…
अशाच एका जीवलगाच्या जाण्याने धक्का बसला होता किंबहुना आहे..पण त्याने खूप काही शिकवलं...
आपण मृत्यू सुसह्य करू शकत नाही कदाचित, पण ईच्छापूर्ती नक्कीच आपल्या हातात असते!
आपल्याकडे असं मानतात की माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर तो सुखाने पुढील प्रवासास जातो..आणि अपूर्ण इच्छा असतील तर त्याचा आत्मा घुटमळत रहातो…
खरं खोटं माहीत नाहीत, किंवा विश्वास ठेवणं व्यक्तिसापेक्ष असू शकतं! पण ह्याचाच दुसरा अर्थ असा की माणसाचं इच्छित त्याला मिळत असेल, तर तो आनंदी असतो…आणि मृत्यू यायचाच असेल तर आनंदी असतानाच यावा! इतकं साधं गणित..
त्यामुळे या पुढे,
आई म्हणाली देवदर्शनाला जावं वाटतं, तर अगदी सुट्टी काढून जा..
वडील म्हणाले तुला पायावर उभं राहिलेलं बघायचं आहे तर झोकून कामाला लागा..
लेकरू म्हणालं माझ्याशी खेळा ना, तर बिनपगारी रजा घेऊन मनसोक्त खेळा त्याच्याशी…
आणि एखादा जुना मित्र म्हणाला की खूप दिवस झाले रे भेटून, भेटूया का..?
तर त्याच दिवशी भेटायला जा..
कारण उद्या कोणीच बघितलेला नाही..
आणि या बाबतीत उद्याची वाट बघणाऱ्यांचे हाल कुत्रंही खात नाही, असं म्हणावं लागेल असे अनुभव प्रत्येकालाच आले असतील…
कित्येक वेळा भेटायचं राहून जातं आणि ती व्यक्ती भेटण्याच्या कितीतरी पलीकडे निघून जाते एक क्षणात! आपण मात्र पश्चाताप करत राहतो आयुष्यभर!
या पेक्षा थोडी तडजोड करून नाती जपुया!
आदि-अंत आपल्या हाती नाही, पण वर्तमान आपल्या हाती आहे…आपल्या माणसाला आपल्या जवळ ठेवा..पैसा ऐहिक सुख मिळवून देऊ शकत असेल पण मायेने पाठीवर फिरणारा हात पैसा कधीच देऊ शकत नाही!
हल्लीच्या काळात पैशाने रोबोट विकत घेता येत असतील, पण त्यांना भावना नाहीत..आणि भावनांनी जोडलेलं जिवलग गमवण्याइतकं दुर्दैव दुसरं नाही!
एका आकस्मिक क्षणी सोडून गेलेल्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवशी अर्पण…
©कांचन लेले
२३-०४-२०१८

Image Credit - Google

Saturday 6 January 2018

कोकण कन्या!


कोकण कन्या! शिर्षकावरून साधारण लक्षात येऊ शकतं की अशा नावाची एक रेल्वे म्हणजेच ट्रेन आहे..आणि माझ्यामते त्या ट्रेनचं नामकरण करणारा माणूस थोर आहे!!
कोकणची कन्या म्हणवून घ्यायला त्या निर्जीव ट्रेनला सुद्धा अभिमान वाटतो..तर आम्हाला किती वाटत असेल ह्याचा अंदाजच करावा!
आमचो कोकण म्हणताना जे मूठभर मास चढतं त्याने मी सुद्धा थोडी जाड दिसत असेन!
तर आज पुन्हा एकदा, बरेच वर्षांनी कोकण कन्येने प्रवास करायची संधी मिळाली…थोडं दुःख इतकंच की या वेळी कोकणात न जाता ती कन्या ह्या कन्येला गोव्यात सोडणार होती, सुखरूप! हो..कारण प्रवास एकटीने करायचा आहे!
मला नेहेमीच एकटीने प्रवास करायला आवडतं..त्यात तो कोकणातला आणि ट्रेनने म्हणजे तर चार चांद! त्यामुळे reservation करताना ACचे पर्याय आणि घरातल्यांच्या सूचना सपशेल धुडकावून माझ्या लाडक्या साईड लोवर सीटचं स्लीपर कोचचं reservation केलं! कोकणात जाताना कसं खिडकी उघडीच पाहिजे..आमच्या कोकणातली हवा अशी अंगावर घेताना काय सुख मिळतं म्हणून सांगू..आणि इतकी स्वच्छ की तो जळ्ळा AC पण गुदमरत असेल तिकडे बंद डब्यात!
आणि एवढं निसर्ग सौंदर्य दिसतं ते काय काचेआडनं बघायचं…? छे…अशक्य!
तर काल रात्री कन्या नेहेमीप्रमाणे उशिरा आली..एव्हाना सगळ्यांना हे माहीत आहे की ती उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध आहे..पण आल्यावर जे काही समाधान देऊन जाते म्हणून सांगू…
म्हणजे एखादा गायक मैफिलीसाठी उशिरा यावा..मग तंबोरे लावत बसावा..इतका वेळ रसिक वर्ग ताटकळत असावा…पण पहिला सा लावल्यावर जे सुख मिळतं ना! तेच ही कन्या आल्या आल्या मिळतं..
एरवी कुठे एकटं जाताना तुम्ही कितीही धीट असलात तरी मनाच्या कुठल्यातरी बारीकशा कोपऱ्यात एखादी शंका असतेच! पण कोकणात जाताना..? कधीच नाही..एकतर प्लॅटफॉर्म वर अर्धा एक तास वाट बघताना कानावर जी आपली भाषा पडते, त्यानेच सगळी चिंता पळून जाते..मराठीच ती, पण कोकणातली ओ…काय समजलात..? त्याची गोडी जेका कळली तो खरा कोकणचा!
अशा सगळ्या आपल्या माणसांमध्ये एकटेपणा कधी वाटतंच नाही..कारण खरंच म्हंटलंय कोकणची माणसं साधी भोळी! त्यांच्यापासून आपल्याला काही धोका आहे असं वाटणारच नाही! उलट घरची मंडळी आहेत असंच वाटतं…
तर प्रवास पाऊण तास उशिरा सुरू झाला..गर्दी खूप होती, पण सकाळी जाग आली तेव्हा बरीच गर्दी ओसरलेली आणि मुंबईची हवा मागे टाकून कोणातल्या हवेने माझ्या प्रवेश केलेला...स्वच्छ हवा..आणि त्यात ओलावा आपुलकीचा, प्रेमाचा…!
सकाळी उठल्या उठल्या लाल मातीचं दर्शन होणं ह्या इतकी रम्य सकाळ माझ्यासाठी तरी दुसरी नाही!
असंख्य आठवणी या लाल मातीशी जोडलेल्या आहेत…आणि त्याला जोडून लांबच्या लांब पसरलेले मोकळे मळे..माडांची रांग….चिऱ्यांची कौलारू घरं…घरापुढे सारवलेलं अंगण..गवताच्या पेंढी…शेजारी केळ…चरणारी गुरं…असं सगळं चालत्या गाडीतून बघण्याचा आनंद काही औरच…
आणि इकडली स्टेशनं सुद्धा मला प्रचंड आवडतात..का काय माहीत…खरंतर लांबच्या लांब पसरलेला प्लॅटफॉर्म आपण अगदी ओसाड…पण लहानपणापासूनच मला तो खूप आवडत आला…कदाचित लोकांना मुंबईचे तुडुंब भरलेले प्लॅटफॉर्म बघण्यात जे अप्रूप असतं, तेच मला हे रिकामे..शांत, स्थीर प्लॅटफॉर्म बघण्यात मिळतं…इथे आलं की माणूस सुद्धा असाच शांत होत असतो..सगळी टेन्शन बाजूला ठेऊन निवांत चार दिवस घालवून जातो!
पण या वेळी जरा दुःख होत होतं कारण मला हे सगळं मागे टाकून पुढे गोव्यात जायचं होतं..गोव्याला  सुद्धा जायची इच्छा होऊ नये आणि कोकणातच उतरावं वाटतं तेव्हा खरी मी कोकणची कन्या!
आमचं कोकण आहेच तसं…तुम्ही अनुभवलंय की नाही…? नसेल तर नक्कीच अनुभव घ्या..कारण आम्ही येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हसतमुखानेच करत असतो..तर…येवा..कोकण आपलाच असा!!
©कांचन लेले

Thursday 4 January 2018

Happy 1st Birthday!


वाढ दिवस म्हणजे जन्म दिवस…मोठं होण्याचं पाहिलं पाऊल…जाणतं होण्याकडची वाटचाल..
प्रत्येक वर्षी अनेक विविध पैलूंनी समृद्ध होणं..
तसंच प्रत्येक वर्षात काही चूका करणं..आणि मग आश्वासन घेऊन येतं पुढचं वर्ष…आश्वासन त्या चुका सुधारायच्या उमेदीचं..आश्वासन नाविन्याचं…आश्वासन टिकून रहायचं!
तसा प्रत्येक दिवस सुर्योदयानेच सुरू होतो, आणि सूर्यास्तानेच मावळतो…पण तरी प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी वेगळा असतो…असाच एक दिवस आपलं आयुष्य बदलून टाकणारा येतो, किंवा आपलं आयुष्य घडवणारा येतो! तोच जन्म दिवस…अर्थात मराठीत Birthday!
तिथून सुरवात होते एका नवीन प्रवासाची..अनेक नवीन गोष्टींची!
तर एवढं सगळं रामायण, कारण आज आहे पहिला वाढदिवस, माझ्या ब्लॉगचा..खरंतर गेल्यावर्षी अजिबात असं वाटलं नव्हतं की मी लिहू शकेन, कारण मुळात मी लेखिका नाही..आणि माझं लिखाण पावसापेक्षा बेभरोशी आहे असं म्हणायला हरकत नाही..कारण तो किमान चार महिन्यांचं आश्वासन देऊन दोन महिने तरी येतो...माझं लिखाण म्हणजे दुष्काळ पडला तर कदाचित पुढच्या पावसाळ्यापर्यंत काही सुचणार नाही इतकं बेभरवशी!
तर ही छोटीशी कहाणी आहे 'राधा उवाचं'च्या जन्माची..
मी असंच काहीबाही लिहीत असे..ते फेसबुकच्या ग्रुपवर आणि काही जवळच्या लोकांना whatsapp वर पाठवत असे..मग एक दोनदा असं झालं की कोणीतरी विचारलं 'तुझा तो लेख पाठव ना..' किंवा 'ह्या कथेचा चौथा भाग पाठव ना'..मग मला नाईलाजाने सांगायला लागायचं की शोधून पाठवते..तेव्हा काही मित्रमंडळींनी बौद्धिक घेतलं आपापल्या परीने..आणि त्याची वेळ मात्र एकच होती! म्हणून विचार केला..काय हरकत आहे एक ब्लॉग सुरू करायला…? किमान जे काही थोडं लिहिलं आहे ते एक जागी नीट राहील.. पण मग वाटलं आपल्यात आणि उठसूट लेखक होणाऱ्यांत काय फरक..?! पण परत काही छान प्रतिसाद आठवले..
जे अशा लोकांकडून आले होते की ते अगदी स्वतःच्या सख्ख्या लोकांसाठी सुद्धा खोटी स्तुती करत नाहीत..
मग बरंच हो-नाही हो-नाही करता करता ब्लॉग सुरू करायचा असं ठरवलंच!
साधारण ऑक्टोबर-नोव्हेंम्बर दरम्यान..पण थोडा अवधी घेऊन, आणखी थोडं लिखाण करून मग ह्यात उतरायचं असं ठरवलं होतं..डिसेंबर मध्ये परीक्षा होत्या, त्यामुळे त्या नंतर काय ते बघू म्हणून तात्पुरता विषय बंद केला..आणि परीक्षा संपल्यानंतर एक दिवस सहज लिहिता लिहिता प्रस्तावनेचा लेखच लिहून काढला…राधा उवाचं हेच नाव असणार हे खूप आधीच ठरलं होतं माझं..मग तो लेख एक दोन जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवला..आणि हिरवा सिग्नल मिळताच १ जानेवारीला ब्लॉग सुरू करायचा असं ठरवलं..पण परत आपण उगच शायनिंग मारतोय असं वाटून तो बेत मी रद्द केला..पुन्हा हो-नाही करत ३ तारखेला रात्री करूच या, काय व्हायचं ते होउदे असं ठरवलं!
४ जानेवारी उजाडला..मी सकाळीच लॅपटॉप घरुन बसले, blogger च्या website वर फॉर्मलिटी पूर्ण केल्या आणि domain name 'radhauvacha' असं टाकलं…ते accept झाल्यावर कोण आनंद झाला होता…मग सहज वर बघितलं तर बहिणीचं gmail account signed in होतं…कपाळावर हात मारायची वेळ आली..म्हणजे हा ब्लॉग तिच्या account वरून सुरू होत होता…प्रचंड चिडचिड झाली! मग कसलाही विचार न करता मी ते सगळं delete केलं..log out केलं…माझ्या account वरून signin केलं..आणि पुन्हा blogger वर domain name तेच टाकताच 'not available' असं आलं…झालं..संपलं सगळं..
गूगल बाबाची मदत घेतली तर त्यावर असं कळलं की एकदा domain name वापरलं आणि delete केलं की ते पुन्हा त्या माणसाला सुद्धा वापरता येत नाही…सगळी उरली सुरली आशा संपली होती…मी पणावल्या डोळ्यांनी लॅपटॉप बंद केला…कारण नाव तेच हवं हे माझं ठरलेलं होतं. आणि ते नाव नाही तर ब्लॉग सुद्धा नाही असं ठरवून मी दैनंदिन कामांना लागले…
डोक्यात विचार मात्र तेच होते…एकदा वाटून गेलं की कदाचित मी ब्लॉग सुरू करणं वेडेपणा ठरला असता म्हणून असं झालं असेल (जे होतं ते चांगल्यासाठीच अशी एक theory आहे आपल्याकडे..त्यावरून स्वतःला छाsssन दिलासा देता येतो)…
पण रात्री झोपताना उशीवर डोकं टेकलं आणि मात्र राहवलं नाही मला…असं एक फटक्यात मागे हटणं बरोबर नाही…मग माझंच मन मला उलट सांगू लागलं की कशावरून ही परीक्षा नसेल माझ्या patienceची….?  सगळं सरळ सरळ तर आपल्याला आयुष्यात कधी मिळालं नाही..मग आत्ताच ते एका फटक्यात मिळावं अशी अपेक्षा कशी करायची…? नाही…पुन्हा प्रयत्न करायचे असं ठरवून झोपले…
खरंतर आपलं मन आपल्या हातात असतं..मन हे हळवं आणि मेंदू हा वैचारिक अशी सांगड असते..चांगल्या विचारांना मनाचं पाठबळ मिळालं तर उंच भरारी घेता येते…कारण त्यासाठी लागणारा निर्धार, हेच हळवं मन करत असतं, कणखर होऊन!
पण डोक्यात येणाऱ्या वाट्टेल त्या विचारांना ह्याच मनाने हिरवा सिग्नल दिला तर सगळं आयुष्य उध्वस्त करायची ताकद सुद्धा ह्याच मनात असते बरं! तर..पुन्हा विषयाकडे येताना..
दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉप उघडला, माझं account उघडलं…आणि डोमेन नेम टाकताना 'radhauvacha' टाकून बघितलं…नाही मान्य झालं..मग थोडं डोकं लावलं आणि 'radhauvaacha' असं नाव न बदलता त्यात एक 'a' वाढवून लिहिलं…आणि ते accept झालं!
काय आनंद झाला…पण हा आंनद ते accept झाल्याचा कमी, आणि मी हार न मानता माझ्याच अटींवर ते पूर्ण केलं ह्याचा जास्ती होता! वास्तविक अगदी लहान प्रश्न होता..पण क्षुल्लक कारणावरून, हलगर्जीपणामुळे तो झाला नाही म्हणून चिडचिड होऊन तो वाढला! त्यामुळे राग कमी करणे आणि संयम वाढवणे हे ब्लॉगबरोबर सुरू करायचं असं तेव्हाच ठरवलं…
वर्षभर बऱ्यापैकी लेखन झालं ह्याचा आंनद आहे..आता ते पुढे होत राहील असं म्हणायला हरकत नाही..तुम्हा सर्वांनी भरभरून प्रेम-आशीर्वाद दिल्यामुळे आजचा हा वाढदिवस छान झाला आहे..किंवा मुळातच होतो आहे हेच खरं! नाहीतर माझा टिकाव कितपत लागेल ह्याबद्दल साशंकता होतीच..असंच प्रेम-आशीर्वाद कायम राहूदे..!

गेल्या नवीन वर्षात केलेला हा संकल्प आज पूर्ण होतो आहे ह्याचा सगळ्यात जास्ती आनंद आहे..नाहीतर संकल्प न करणे हाच खरा संकल्प…पण ह्यावर्षी ब्लॉग संकल्प पूर्ण झाल्याने नवीन संकल्प करायला उत्साह निर्माण झाला आहे..आणि राग कमी आणि संयम वाढवण्याचा संकल्प जsssरा अपुरा राहिला असल्याने तोही येत्या वर्षात पूर्ण करायचा आहे!
अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे..पण म्हणतात ना 'Well begun is half done!'
म्हणून हे लिहिण्याचा घाट घातला!

शेवटी  पुन्हा नवीन वर्ष, पुन्हा नवीन सुरवात..
खरंतर पुन्हा तेच वर्ष, पुन्हा तीच सुरवात..
पण तरीही प्रत्येक वर्षी तीच ओढ नाविन्याची..
पुन्हा नवीन संकल्प करण्याचा उत्साह, आणि आता  मात्र पुढच्यावर्षी संकल्पपूर्ती होण्याची ओढ…!

माझं नवीन वर्ष सकारात्मकतेने सुरू झालं! तुमचं झालं का…? नसेल तर ते सकारात्मक करून घ्या…कारण ते तुमच्याच हातात असतं! :)
- एका वर्षाची राधा.....!
©कांचन लेले