Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 30 July 2017

उधळण...!


कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर वेड असेल तर त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. किंवा ते वेड तुम्हाला खेचून घेतं असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये..शेवटी बाबासाहेबांनी शिवकल्याण राजा मध्ये म्हणूनच ठेवलं आहे, 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही!'..आपल्याला काही इतिहास घडवायचा नाही, पण असो! 
तर काल संध्याकाळी काम आटपून असाच बसलो होतो. सहज बाहेर लक्ष गेले. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. मस्त वारं सुटला होते. थोडे थोडे निळे आकाश दिसत होते. हे वातावरण म्हणजे 'between the lines' म्हणतात तसं म्हणायला हरकत नाही..कोसळणाऱ्या पावसाचं सौंदर्य सगळ्यांनाच दिसतं..पण ह्या वातावरणातही एक वेगळंच सौंदर्य दडलेलं आहे..आणि त्याच सौंदर्याच्या ओढीने पटकन गाडी काढली, बायको (कॅमेरा)ला बरोबर घेतले आणि पटकन ARAI टेकडी गाठली. पावसामुळे गर्दी कमी होती. असलं भारी वाटलं...! आणि जरा दृष्टी फिरवली तर निसर्गाचे अनोखे रुपडे दिसत होते. 
मधे निळे, मधेच काळे, त्याच्या बरोबर मधेच सांजवेळेचा केशरट पिवळा,  खाली धरतीच हिरवा अशी सुरेख रंगात माखलेली सृष्टी दिसत होती!
मागच्या बाजूला गेलो. बोटावर मोजण्या एवढीच लोक होती. प्रचंड भारी वाटत होते. फोटो काढून घेतले. नंतर एका दगडावर जाऊन शांत पणे  निसर्गाचा अनुभव घेत बसलो. हा सुद्धा 'between the lines' आनंद असतो बरं का! 
देवही आपल्या आकाशरूपी कॅनव्हास वर मुक्त हस्ताने ब्रश फिरवत होता, निराळे रंग दाखवत होता. एकूणच मस्त वाटत होतं... मधेच एक पावसाची छोटी सर आली. जणू त्या चित्राला मिळालेली उत्स्फूर्त दादच! तीही एका वेगळ्याच आनंदात न्हाऊ घालून गेली!

'आयुष्याची आता, झाली उजवण।
येतो तो तो क्षण अमृताचा..'

 बाकीबाब यांचे शब्द आपोआपच कानात रुंजी घालू लागले...

'संधीप्रकाशात अजून जो सोने,
तो माझी लोचने मिटो यावी..'

 खूप शांत वाटत होतं. आनंद म्हणजे वेगळा काय असतो..? 
बाजूला गायी मस्तपैकी चरत होत्या. कुठलं दडपण नाही-व्यथा नाही, निसर्गाच्या कवेत, त्यानेच मांडलेल्या मेजवानीचाच जणू आस्वाद घेत होत्या..!
अशा रम्य वातावरणात तृप्त न वाटेल तरच नवल!
वेळ पुढे सरकत होती तसे रंग पालटत होते..एका वेगळ्या दुनियेला उजळून टाकायला, तेही प्रवास करत होते..
आणि ते परत येईपर्यंत आपल्यावर पांघरूण घालायला मागून आला अंधार.. त्यातही एक वेगळंच सौंदर्य आहेच की! शेवटी काळा हा सुद्धा रंगच आहे ना!
मग मनाचे काही तुकडे झाले…एक तुकडा त्या जाणाऱ्या रंगांबरोबर गेला..दुसरा गाईंबरोबर त्यांच्या घरी निघाला..तिसरा माझ्याबरोबर माझ्या घरी निघाला आणि चौथा मात्र त्या अंधाऱ्या सौंदर्याचा आनंद घेत आणि घेतलेला अमृतानुभव गाईंसारखा रवंथ करत तिथेच घुटमळला..!

©कांचन लेले






Photo & Write-up Concept Credit - स्वप्नील भदे

Wednesday 26 July 2017

अंगणी पारिजात फुलला!


'अंगणी पारिजात फुलला..'
गाणं रेडिओ वर वाजत होतं..
पहाटेकडून सकाळकडे जाणाऱ्या प्रहरात पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता..
आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीला खिडकीबाहेरील पारिजातकाची काही फुलं गळुन पडत होती..
पारिजातक म्हणजे इन्ट्रोव्हर्ट माणसासारखं वाटतं मला..
एरवी अख्खं जग सूर्याच्या आगमनाने जागं होतं..पण हे मात्र सगळं जग शांत झालं की रातराणीच्या सुगंधाने जागं होतं!
रात्रीच्या कुशीत फुलणारं..पहाटेचं तांबड फुटल्यावर बहरणारं..
आणि दिवस सुरू झालं की मात्र गळून पडणारं..आगळंच झाड!
'बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला..पारिजात फुलला'
जयमालाबाई गातच होत्या..
झाडावरुन पडणाऱ्या आणि पडायची वाट बघणाऱ्या फुलाच्या मनात काय विचार असतील असा विचार सहज मनात येऊन गेला..
काही फुलं नुसतीच खाली गळून पडतात..काही पडलेली फुलं वेचली जातात..पुढे एखादीच्या केसात माळलेली दिसतात..झाडावरची काही फुलं तोडून पूजेसाठी नेली जातात..
तर काही फुलं नुसतीच ओंजळीत घेऊन प्रिय व्यक्तीवर बरसली जातात..प्रेमाचा नाजूक सुमन वर्षाव!
पण खरं सौंदर्य असतं ते पडलेलं फूल तसंच रहाण्यात..
त्यात प्रत्येक पडणाऱ्या फुलाची भर पडण्यात..
आणि काही वेळा नंतर अगदी पायघड्या घालाव्या तसा सुंदर सडा तयार होण्यात…
काही तासांचं आयुष्य त्या नाजूक कोमल फुलाचं..
पण किती आयुष्यांमध्ये बहर आणून जातं..नाही..?!
आपल्याला मिळतात अनेक दिवस-महिने-वर्ष…
खरंच त्याचा उपयोग करतो का आपण…?
'धुंद मधुर हा गंध पसरला, गमले मजला मुकुंद हसला,
सहवासातून मदीय मनाचा कणकण मोहरला..
पारिजात फुलला…'
रेडिओवरचं गाणं आणि परिजातकाचा सुंदर बहर अंताकडे मार्गस्थ होत होता…आणि दुनिया धावत्या आयुष्याची वेगवान सुरवात करण्यात मग्न होती…©कांचन लेले


Photo Credit - Swapnil Bhade