Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 29 March 2020

खम्माघणी राजस्थान! भाग ४

या सगळ्या दरम्यान अंगावर तीन थर होतेच…आणि परत जाताना थंडी आणखी वाढलेली..कॅम्प मध्ये गेल्यावर तिथे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची तयारी होत आलेली दिसली..अंधार बऱ्यापैकी पडला होता थोडं फ्रेश होऊन बाहेर येऊन बसलो…चहा-पोहे आले…तिकडचे पोहे म्हणजे गोड आणि भरभरून तेल असलेले…आणि कार्यक्रम सुरू झाला केसरिया बालम ने…दरम्यान आमच्या शेजारी थायलंडचे दोघे, बंधू-भगिनी येऊन बसले…त्यांच्याशी थोडी ओळख होत होती…एकीकडे कार्यक्रम गाण्यावरून नृत्याकडे आलेला..तिथले स्थानिक नृत्य प्रकार झाल्यावर काही थोडे अघोरी प्रकार (पापणीने सुई उचलणे, काचांवर चालणे इत्यादी) झाल्यावर डोक्यावर घागरी/घडे घेऊन नृत्य झालं…मग जेवण करुन, आणि दुसऱ्या दिवशी थायलंड जोडीबरोबर एकत्र जैसलमेरला जायचं ठरवून, एकमेकांचे नंबर घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी गेलो..

दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो माणूस आम्हाला न्यायला आला..पुन्हा ओपन जीप सवारी आणि प्रचंड वाऱ्यात प्रवास झाला! त्या दिवशी आमचा मुक्काम नव्हता, रात्री उशिराची ट्रेन होती तरीही आम्ही झोस्टेलचं बुकिंग केलेलं..जो निर्णय अतिशय उत्तम ठरला!

राजपुत योध्दा रावल जैसल यांनी बांधलेला हा अत्यंत मनोहर सोनेरी किल्ला! याचं संपूर्ण बांधकाम हे पिवळ्या रंगाच्या दगड आणि रेतीने केल्यामुळे हा संपूर्ण किल्ला त्या रंगाचा दिसतो, आणि त्यात सूर्यदेवाची कृपा झाली की लखलखतं सोनेरी तेज असल्यासारखा भासतो! म्हणूनच त्याचं नाव सोनारदुर्ग आणि इंग्रजीत Golden Fort असं पडलं आहे!
हा संबंध किल्लाच म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे! अगदी रेखीव दरवाजे खिडक्यांपासून दालनांची आखणी, जिने इत्यादी प्रत्येक लहान सहान गोष्ट कलात्मक रित्या केलेली आहे! संपूर्ण राजस्थानातील हवेल्या आणि किल्ले हे म्हणजे नयनरम्य दृश्यच! म्हणजे विचार करताना तोचतोचपणा वाटू शकतो, पण त्यामुळे यातलं काहीही टाळू नका! प्रत्येक वास्तूत काहीतरी वेगळंच दिसेल हे नक्की!
आम्ही चौघे zostelच्या दिशेने रवाना झालो..आता हा जैसलमेरचा किल्ला म्हणजे गावच आहे! किल्ल्याच्या आतच हॉटेल, दुकानं, वस्ती, असं सगळं आहे! तिथेच आमचं झोस्टेलसुद्धा होतं..तिथली दोन माणसं आम्हाला लगेच न्यायला आली, अमच्याबरोबरच्या "वॅरीसा" आणि "विट" या दोघांना त्यांचं बुकिंग नसतानाही सामान ठेऊ दिलं आणि संध्याकाळी फ्रेश व्हायला यायलाही सांगितलं!! बाहेर पडल्यावर महाल बघायला गेलो..तिथेही आम्ही guide घेतलेला..मग तो guide आणि आम्ही अतिथींचे translator झालो! ;)
आत गेल्यावर सुंदर चित्रांनी आणि काचकामाने बहरलेला रंगमहल लक्ष वेधून घेतो, पुढे राजाचा महाल, राणीचा महाल, राज्याभिषेकाचं सिंहासन, जुनी नाणी (मुद्रा) इत्यादी अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत!
दरवाजा आणि खिडक्याचं इतकं सुंदर रेखीव काम सगळीकडे बघायला मिळतं!
त्याचबरोबर, तिकडे अख्या किल्ल्याचा एक नकाशा आहे, तो देत आहे!
वरती गच्चीत गेलं, की अख्या खालचं हे दिसणारं दृश्य!

नंतर आम्ही तिथल्या मुख्य जैन मंदिरात गेलो..मंदिरातील अतिशय रेखीव खांब आणि घुमट बघून मन निवतं..
पुढे आम्ही पटवो की हवेली बघायला गेलो..ही इथली सगळ्यात पहिली बांधलेली हवेली आहे! आणि ही एक हवेली म्हणजेच पाच लहान हवेल्यांचं एकत्रित रूप आहे, तेही पाच मजली! पुन्हा अतिशय सुंदर आणि रेखीव काम इथे बघायला मिळतं, त्यात बरंच काचेचं काम भिंतीवर दिसतं..
त्यानंतर गेलो ते गडीसर लेक बघायला! तिथे आम्ही तिघींनी, बोटिंग सुद्धा केलं! आणि काही खूप सुंदर पक्षी सुद्धा बघितले!
दिवसभर उन्हात फिरल्यावर त्या पाण्याची शीतलता पूर्ण जाणवली!
शांत पाणी कायम आपल्याला शांतता देत असतं…आणि नदीचं खळाळतं पाणी कायम सकारात्मकता देत असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं..किंबहुना तो अनुभव मी कायम घेत असते! 
आणखी एका गोष्टीचं कौतुक म्हणजे तिथे बाहेरच "सुलभ" सेवा आहे. बऱ्यापैकी मोठं, प्रशस्त आणि मुळात म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह बघून आनंद वाटला.

महाल, जैन मंदिर, हवेली आणि गडीसर लेक अस सगळं फिरुन, मधे एका ठिकाणी जेवून, अधे मधे थोडी खरेदी करुन आमचा दिवस एकदम मस्त गेला!

या संबंध दिवसात वॅरीसा आणि विट बरोबर गप्पा होत होत्या..दोन्ही देशांच्या परंपरा, संस्कृती इत्यादींची देवाणघेवाण होत होती! संध्याकाळी आम्ही झोस्टेलवर आलो तिथून सगळ्यात वरच्या मजल्यावरून दिसणारा अप्रतिम सूर्यास्त बघितला आणि मग तिथल्याच कॉमन रूम मध्ये "Jenga" या खेळाचे दोन चार डाव खेळून वॅरीसा आणि विट ला निरोप दिला! मग आम्ही बॅग पॅक केली आणि वरती किचन मध्ये सूप करुन प्यायलं..मग पॅकिंग केल्यावर थोडावेळ चक्कर मारुन जेवायला जायचं ठरवलं तर एकतर तितकं खावंसं वाटेना, आणि बऱ्यापैकी उशीर झाल्याने कुठल्याच हॉटेलमध्ये लोकं दिसेना आणि मग हॉटेलच्या जेवणावर पैसे घालवावेसे वाटेना..मग आम्ही एका दुकानातून मॅगीची पाकिटं घेतली आणि पुन्हा zostelच्या किचन कडे रवाना झालो..मग तिथल्या स्टाफबरोबर गप्पा मारत, पुढील टप्प्यांची माहिती काढत मॅगी केलं आणि मस्त ताव मारला!!
रात्री १ ची गाडी होती, १२ वाजता तिथल्याच स्टाफने आमच्यासाठी रिक्षा सांगितली होती. अगदी लागेल ती मदत करणारे इथले लोक मनाला एकदम भावले आणि खरंच अतिथी देवो भवः का म्हणतात ते कळलं!!
ट्रेन वेळेवर होती..आम्ही स्टेशनला पिहोचलो आणि प्लॅटफॉर्म वर जाऊन थांबलो..गाडी आल्यावर आमच्या बर्थ वर गेलो तर तिथे आणखी दोन स्त्रिया होत्या..(ladies कोट्यातून बुकिंग केल्याचे फायदे). त्यांनी थोडा वेळ आमच्या हालचाली, गप्पा ऐकल्या व मग आमचाच interview घ्यायला लागल्या, (एकीला मराठी थोडं येत होतं)की आम्ही दोघीच, बरोबर मोठं कोणी नाही, परराज्यात अशा रात्रीच्या कशा काय फिरतो वगैरे..मग त्यांच्या गरजेपूर्ती आणि थोड्या प्रबोधनापूर्ती ;) माहिती दिली!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं वेगळ्या शहरात, देशात एकटी गेली की पालकांना काळजी वाटणं स्वाभाविकच असतं, हे लक्षात घेऊन कायम बाहेर फिरायला गेलं की दिवसातून ४-५ वेळा स्वताहून कुठे आहोत, काय करतोय हे कळवलं की मला नाही वाटत कुठलेही पालक फार आडकाठी करतील..कारण त्यांना आपल्या सुरक्षिततेपलीकडे काहीही नको असतं!

तर त्याप्रमाणेच पुन्हा आपापल्या घरी गाडी मिळाल्याचे आणि सगळं नीट असल्याचे मेसेज करुन, असलेलं नसलेलं सगळं अंगाखाली, अंगावर घेऊन आम्ही जोधपुरमध्ये जागं होण्यासाठी झोपी गेलो!!

क्रमशः
©कांचन लेले

Thursday 26 March 2020

खम्माघणी राजस्थान! - भाग ३

ते मनोहर दृश्य मनात साठवून आम्ही स्टेशनच्या आत गेलो, थोडावेळ वेटिंग रुम मध्ये थांबलो व नंतर प्लॅटफॉर्मकडे निघालो..जयपूर रेल्वे स्टेशनला लिफ्टची सुविधा सुद्धा आहे हे तिथे एक बोर्ड बघून कळलं, बॅग्स असल्याने आणि थंडीने हात सुन्न पडल्याने त्याचा खूप फायदा झाला..आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर अगदी वेळेत पोहोचलो..गाडी सुद्धा वेळेवर आली. 
 तशा आम्ही दोघीच मुली आणि रात्रीचा प्रवास, खरंतर घरचे नेहेमी अशावेळी AC चं तिकीट काढायला सांगतात..पण या वेळी मी ठरवून स्लीपर क्लासचंच तिकीट काढलेलं, फक्त त्यात लेडीज कोट्यात काढलं, ही सुद्धा एक उत्तम सुविधा भारतीय रेल्वे देत आहे. फक्त तोटा एवढाच होतो की स्लीपर क्लास मध्ये अंथरूण, पांघरूण दिलं जात नाही. पण आम्ही त्या तयारीनिशी गेलेलो, तरीही थंडी इतकी प्रचंड होती की खिडकीच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्याने हुडहुडी भरत होती! तरी दमल्यामुळे पूर्ण गुर्गटून पांघरूण घेऊन झोपलो..आणि दुपारी १ दरम्यान जैसलमेरला पोहोचलो..
आमचा ठरलेला प्लॅन असा होता की जैसलमेरला दोन दिवस ठेवलेले, त्यापैकी आज आम्ही सरळ वाळवंटात, म्हणजे "सम" येथे जाऊन तिथे "Desert Camp" मध्ये रहाणार होतो, व दुसऱ्या दिवशी सकाळी जैसलमेरला जाऊन किल्ला वगैरे फिरणार होतो. या desert camp बद्दल मी बरंच सर्फिंग केलेलं, आणि online दिसणाऱ्या किमती खूप जास्ती वाटल्याने मी Spot booking करायचं असा निर्णय घेतलेला.
तर आम्ही स्टेशनबाहेर आलो. दृश्य असं होतं की बहुतांश लोकांना न्यायला हॉटेलच्या, कॅम्पच्या गाड्या आलेल्या. आणि बाहेर काही रिक्षा उभ्या होत्या आणि त्या सम ला जात नाहीत असं आम्हाला कळलं. प्रायव्हेट गाडीवाले मागे लागले, पण त्यांचे भाव ऐकून आम्ही त्यांना भाव दिला नाही! ;)
१ वाजून गेलेला, आणि ट्रेन मध्ये काही खायला मिळालं नव्हतं, डिंकाचे लाडू आणि Lays Kurkure सारख्या खाद्यावर असताना भूक लागली होती त्यामुळे आम्ही आधी तिथेच जेवायचं ठरवलं. जैसलमेर स्टेशनच्या बाहेर तसं प्रशस्त हॉटेल वगैरे काहीच नाही. अगदीच सुमार दर्जाची दोन तीन हॉटेल आहेत, पण भूक लागलेली असताना असलं काही सुचत नाही. म्हणून आम्ही सगळ्यात सेफ पर्याय म्हणून शेव भाजी आणि पोळ्या आणि ताक अशी ऑर्डर दिली. शेवभाजी पिवळ्या ग्रेव्ही मध्ये मी पहिल्यांदाच बघितली..म्हणजे ताकातली शेवभाजी म्हंटलं तरी गैर नव्हे! पण पुन्हा भूक लागलेली असताना पोटात ढकलणे यापलीकडे काही नाही! जेवण झाल्यावर आम्ही तिथल्याच एक दोन लोकांना पुन्हा विचारलं, पण ८००, १०००  असे वाट्टेल ते रेट आम्हाला फक्त समला पोहोचवण्याचे सांगण्यात आले. मग आम्ही रिक्षा असतात तिथे जाऊन एका अनुभवी (छप्पर उडालेल्या ;) ) रिक्षावाल्या काकांना गाठलं आणि शेरिंगच्या गाडीतूनच जायचं असेल तर कसं जायचं विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढे एक जागा आहे तिथून शेरिंगमध्ये गाड्या जातात, मग त्यांनाच तिथे सोडायला सांगितलं. त्या जागेला नाव आहे "हनुमान सर्कल" तिथे गेलो, काकांनी दोन तीन वेळा शेअर जीप समजून लोकांना विचारलं पण त्या भलत्याच होत्या. शेवटी त्यांनी आम्हाला तिथे सोडलं आणि गाडी येईल वाट बघा असं सांगितलं. काही वेळ असाच गेला, त्यातही एक दोन गाडीवाल्यांनी शेरिंग ने गेलात तर रात्र होईल पोहोचायला, फिरत जाते खूप, रस्ता खराब आहे असं वाट्टेल ते सांगायचा प्रयत्न केला पण आम्ही भुललो नाही, आणि थोड्या वेळातच समोरच्या बाजूला गाडी दिसल्यावर धावत जाऊन आधी सीट रीझर्व केल्या. ती Open jeep होती! पुढे कव्हर, मध्ये चार जण बसतील अशी आडवी सीट, आणि मागे उभ्या दोन सीट, अशी तवेरा सारखी बसण्याची सोय. पण आमच्याकडे ट्रॉली बॅग्स होत्या त्यामुळे तो जरा कटकट करू लागला, मग अनुभव पणाला लावून त्याला म्हंटलं चार सीटचे पैसे देते, मधे कोणालाही बसवू नको. आणि अशा प्रकारे आम्ही आणि आमच्या दोन बॅग्स ओपन जीप सफारीला अवघ्या २०० रुपयात निघालो! भर दुपारी त्या जीपमध्येसुद्धा इतकी थंडी वाजत होती, आणि ड्रायव्हर म्हणजे शुमाकरचा भाऊ शोभावा अशी गाडी चालवत होता. त्यामुळे आम्ही असेल नसेल ते सगळं अंगावर चढवून, डोक्याला बांधून बसलेलो!  ड्रायव्हरशी आधीच बोलून बघितलेलं, माणूस बरा वाटला, मग त्यालाच संगीतलेलं की आम्हाला एखादा चांगला desert camp सुचवायला..साधारण सव्वा तासाने आम्ही तिथे पोहोचलो, त्याने आम्हाला कॅम्प बघून घ्यायला सांगितलं आणि तो थांबला तोपर्यंत. सगळं व्यवस्थित, अगदी अद्ययावत नाही आणि अगदी सुमार नाही असं बघून, बार्गेनिंगचं कौशल्य पणाला लावून, दोघींचे मिळून १६०० रुपयात फायनल केलं, ह्यात संध्याकाळचा चहा-नाश्ता, उंटांची राईड, रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम, जेवण आणि सकाळचा चहा नाश्ता असं सगळं आलं. आणि ज्या माणसाने आम्हाला सोडलं त्यालाच दुसऱ्या दिवशी आणायला यायलाही सांगितलं. तिथे टेंट आणि कॉटेज असे दोन पर्याय होते. सेफ्टीचा विचार करून आम्ही भक्कम दार असलेलं कॉटेज निवडलं. नंतर एक दीड तास विश्रांती घेऊन आम्ही उंटाची सवारी करायला निघालो!
उंटावर बसणं आणि बसून रहाणं दोन्ही अवघडच आहे तसं!
तसं बघायला गेलं तर हल्ली (racing) bikeची सवय असणाऱ्यांना ते छान जमेल!! 
कुठल्याही जीवावर स्वार होताना मनात संमिश्र भाव येऊ शकतात..
जयपूरला हत्तीवर स्वारीला जाणं टाळलं त्याचं किंमत हे एक कारण होतंच, पण दुसरं कारण असं होतं की त्यांच्या डोळ्यात मला उदासीनता दिसली..जी बहुतांशवेळेला मला प्राणी संग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यात दिसते! तसंच उंटावर बसतानाही वाटलं…पण शक्यतो त्याला पाय लागू न देता आणि संधी मिळेल तेव्हा त्याच्या डोक्यावर, पाठीवर प्रेमाने हात फिरवून, थांबल्यावर त्याच्याशी गप्पा मारून मी ते भरुन काढलं!
तिथे मधे एक माणूस एक छोटं वाद्य तोंडाने वाजवत होता..कानाला तो आवाज लांबूनच कळला, मग उंटवाल्या भाईंना तिकडे न्यायला सांगितलं..खाली उतरलो आणि थोडावेळ ऐकलं..
नंतर त्या माणसाशी बोलल्यावर कळलं त्या वाद्याचं नाव "मोरचंग" किंवा बरंच प्रचलित असलेलं "मोरसिंग". ते वाद्य असं दिसतं..
त्यांचे आभार मानून पुढे निघालो!
सनसेट पॉईंट पर्यंत गेल्यावर उंटवाल्या भाईने आम्हाला खरं "थार" वाळवंट आणखी पुढे आहे, जिथे त्यांच्या भाषेत "लेहरे" दिसतात…म्हणजे वाळूवर येणारी विशिष्ट नक्षी दिसते…म्हंटलं इथवर आलो आहोत तर जाऊया…तिथेही जोरदार बार्गेनिंग करुन..आम्ही कशा त्याच्या बहिणीसारख्या आहोत असं सांगून ४०० रुपयात जवळपास तासभर आत वाळवंटात फेरफटका मारला…सूर्यास्त होईपर्यंत तिथेच वाळूवर पथारी पसरुन यथेच्छ डोळे भरून सूर्यास्त बघितला…आणि मग पुन्हा कॅम्प कडे वळलो..
क्रमशः
©कांचन लेले

Tuesday 24 March 2020

खम्माघणी राजस्थान! - भाग २


दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो, नाश्त्याला वेळ न घालवता घरुन नेलेले डिंकाचे लाडू खाल्ले आणि पुन्हा बसने आमेरकडे निघालो..आमेरला जाताना वाटेतच जल महल सुद्धा दिसतं!
तर आमेरला पोहोचलो..
आत जात असताना अनेक गाईड तुमच्या मागे लागतात.. नजर काम करते. माणूस पारखून घेणं अतिशय महत्वाचं आहे, तरच दिलेले पैसे वसूल होतात! अशा चार पाच लोकांना नाही म्हणून सहाव्याला नाही म्हंटलं आणि तो मागे मागे नाही आला. बऱ्यापैकी वयस्कर आणि अनुभवी दिसत होते काका. मागे गेले त्यांना म्हंटलं किती घेणार तर म्हणाले २००. म्हंटलं १५० फायनल. आणि ते आमच्याबरोबर आले. (खरं हत्तीवरून जायचं म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो, पण त्याचं तिकीट ₹११०० हे ऐकून रद्द केलं!)
सुरवातीलाच आत शिरताना उजवीकडे एका  वाड्याचे भग्न अवशेष दिसतात..पण ते ही खरंतर आकर्षक दिसतात! 
पुढे थोडं वरती गेलं की खाली माओटा तलाव दिसतो..आणि त्याच्या मध्ये दिसते ती केशर बाग..राजा काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांना केशर खूप भावलं आणि त्यांनी एक मोठी रक्कम देऊन ते इकडे लागवड करायला आणलं, पण राजस्थानातील हवामानामुळे तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही! पुढे आतल्या टोकाला गेल्यावर मागे जयगढ किल्ल्याची भिंत दिसते! नंतर तिथे तिकीट काढून आत जावं लागतं. आत जायच्या आधी उजवीकडे एक शिला देवीचं मंदिर आहे. सुंदर प्रसन्न असं हे मंदिर. आत जाताना दारावरच चांदीच्या पत्र्यावर नव दुर्गा आणि दहा महाविद्या कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिर संगमरवरी आहे. आत गेल्यावर काही विशिष्ट ठिकाणी पायाखाली छोटी छिद्र येतात, ज्यातून थंड हवा येताना पायाला जाणवते! Ventilation ठेवण्यासाठी तेव्हाच्या अशा अनेक क्लुप्त्या राजस्थानातील वास्तूंमध्ये दिसून येतात..
दर्शन घेऊन बाहेर आल्यावर किल्ल्यात प्रवेश केला..
आत दिवाण-ए-खास आणि नंतर महालात जायला एक भव्य प्रवेशद्वार! इथून पुन्हा खालचं मोहक दृश्य दिसतं! 
आमेर किल्ल्याचं नाव मुळात अंबा मातेवरून आंबेर असं पडलं होतं. कालांतराने त्याचं "आमेर" झालं. परंतु आजही इंग्रजीत "Amber" असाच उल्लेख सगळीकडे येतो. या किल्ल्यावर आजही बळी द्यायची प्रथा सुरू आहे. आधी मनुष्य बळी दिला जायचा, आता दर रोज एक जनावर बळी म्हणून चढवलं जातं. ही प्रथा मात्र आजवर मला कळली नाही! जो जन्म देतो त्याला प्रसन्न करायला मृत्यू कसा चालेल?!
असो..तर पुढे किल्ल्यात फिरल्यावर  सगळं भव्य दिव्य दिसून येतं.
 इथल्या किल्ल्यांवर एक विशिष्ट नक्षीकाम केलेलं दिसतं. 
याचं वैशिष्ट्य असं की हे रंग नैसर्गिक असतात. फळ-भाज्यांपासून हे रंग त्याकाळी बनवत असत व आज चारशेहुन जास्त वर्ष झाली तरीही तो रंग तसाच्या तसा आहे हे विशेष! पुढे एके ठिकाणी आत गेल्यावर एक रहाट दिसला..
खाली वाकून बघितलं तर मडक्याला मडकी बांधलेली दिसली..ती अशी! 
बरंच फिरुन आम्ही बाहेर पडलो..तिथून खाली आल्यावर, थोडं लांब मीराबाईंचं मंदिर आहे..काका आम्हाला तिकडे घेऊन जात असताना मधे रस्त्यात काही वादक "रावणहट्टा" नावाचं वाद्य सुंदर वाजवत होते!
हे राजस्थानी वाद्य अनेक चित्रपट संगीतात आपल्याला ऐकायला मिळालं आहे!
थोडा त्याचा आस्वाद घेतला आणि पुढे गेलो..
मीरा बाईंचं मंदिर फारच सुंदर आहे! सहसा कोणी लोकांना तिकडे नेत नसावं, कारण किल्ल्यात खूप गर्दी असताना मंदिरात मात्र एक माणूसही नव्हता! 
अतिशय प्रसन्न वाटावं असं मीराबाईंचं मंदिर बघितलं आणि काका आम्हाला तिथल्या गव्हर्मेंटच्या दुकानात घेऊन गेले…तिथे त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग कसं करतात, तिथलेही रंग नैसर्गिक असतात, त्याचं तंत्र दाखवलं..तिथे साड्या, लेदर चप्पल, जयपूरची खास १०० ग्राम रजई, ड्रेस, ओढणी अशी खूप व्हरायटी आहे!
तिथून काकांना मुक्त केलं! अतिशय छान माहिती देत फिरवलं त्यांनी आम्हाला! मग जेवलो खास राजस्थानी दालबाटी थाळी! 
पुढे तसंच अलबर्ट हॉल मुसीयम बद्दल वाचलं होतं त्यात ते एवढं आकर्षक वाटलं नाही, पण ती वस्तू मात्र अतिशय रेखीव आणि सुबक आहे..
त्यामुळे तिथे गेलो, बाहेरूनच तिचा आस्वाद घेतला आणि वेळे आभावी आत न जाता, City Palace कडे कूच केली..हा सिटी palace सवाई जय सिंह यांनी बांधलेला, पुढे उल्लेख येणार आहे तो हवा महलचा, तो बांधण्याचं श्रेय सुद्धा ह्यांच्याच पदरी जातं!
मुळात जयपूरच मुळी त्यांनी निर्माण केलं, आणि त्यांच्या नावावरुनच हे नाव ठेवलं आहे..
तर पुन्हा city palace कडे येताना, अतिशय भव्य दिव्य आणि नायनरम्य वास्तू! 
आमच्या हातात वेळ कमी असल्याने खूप वरवर बघितलं..या महालाचा एकच भाग लोकांसाठी खुला आहे, एका भागात अजूनही इथल्या राजघराण्यातील लोकांचं वास्तव्य आहे..
तिथून पुढे आम्ही हवा महल बघायला गेलो..हवा महल खरंच अतिशय सुंदर बांधलं आहे! नजर हटत नाही इतकं अप्रतिम आहे! 
फक्त ऐन मुख्य रस्त्यावर असल्याने शांतता मात्र त्याच्या वाट्याला अजिबात नाही! त्याच्या बरोब्बर समोर जागा हेरुन काही हुशार लोकांनी कॅफे सुरू केले आहेत..तिथे बसून हवा महलचा आस्वाद घेता येतो..(आम्ही मात्र वरती गेलो view साठी, पण कॅफे च्या दारातून छान फोटो काढून पैसे न उधळता तसेच खाली आलो ;) )
जयपूर आणि एकूणच राजस्थानात ५.३०-६ नंतर हळू हळू सगळं बंद होऊ लागतं. थंडी पडू लागते. त्यात आम्ही दोन दिवस असताना वातावरण पावसाने घेरलेलं, त्यामुळे आणखीनच कमी वेळ मिळाला सगळं फिरायला! त्याच दिवशी रात्रीची ट्रेन होती, जैसलमेरसाठी..त्यामुळे पटापट फिरुन zostel वर आलो, सामान पॅक केलं आणि स्टेशनकडे रवाना झालो!
तारीख होती २५ जानेवारी..स्टेशनला पोहोचल्यावर जे बघितलं त्याने मन भरुन गेलं आणि अशाप्रकारे तो दिवस उत्तम संपला!

क्रमशः
©कांचन लेले

Monday 23 March 2020

खम्माघणी राजस्थान! - भाग १

(जानेवारी २०१९ रोजी केलेल्या राजस्थान सफरीचं प्रवासवर्णन करण्याचा प्रयत्न!)

भाग १

त्यावेळी अनेक दिवस राजस्थान खुणावत होतं..
सतत कुठेतरी उल्लेख यायचा, एखादं आर्टिकल फेसबुकवर दिसायचं, कोणीतरी स्टोरी टाकायचं…असं सगळं बघत बघत पुढल्या वर्षी राजस्थानच करायचं असं  २०१८ साली ऑक्टोबर-नोव्हेम्बर दरम्यान नक्की केलं..
मग कित्येक दिवस ८ दिवसाचं प्लॅंनिंग होतच नव्हतं..इतकं विस्तीर्ण पसरलेलं राज्य आहे, की नेमक्या कुठल्या जागा निवडाव्या हेच कळत नव्हतं..शेवटी एक बेस्ट ऑफ राजस्थान आणि एक रेस्ट ऑफ राजस्थान (offbeat places) असं वर्गीकरण करावं आणि या वेळी फेमस जागा करून घ्याव्या असं ठरवलं..त्याप्रमाणे जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूर करायचं असं नक्की केलं! तसा मॅप बघितला आणि कुठून कुठे जायचं त्याचा आराखडा केला..
फ्लाईट आणि ट्रेनची तिकिटं त्याप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बुक केली! एक फ्लाईट आणि  एकूण चार ट्रेन प्रवास, आणि एक बस प्रवास या आठ दिवसात करायचे ठरवले!
आणि शेवटी २४ जानेवारीला पहाटेच्या फ्लाईटने जयपूरच्या दिशेने कूच केली!
पूर्ण दिवस मिळण्यासाठी नेहेमी शक्यतो पहाटेच्या फ्लाईटचं तिकिट बुक करावं..आणि पहाटेचे आकाशाचे बदलते रंग इतके मोहक दिसतात की अशी फ्लाईट म्हणजे एकदम पैसा वसूल!! (आदल्या दिवशी रात्री जाऊ शकतो, पण मग एका रात्रीचा रहायचा खर्च वाढतो  :D )
तर त्याप्रमाणे ८ वाजता जयपूर एअरपोर्टला आम्ही लँड झालो..बाहेर पडल्या पडल्या बॅग्स पण पटकन मिळाल्या आणि अक्षरशः १० मिनिटात बाहेर पडलो..बाहेर पडायच्या आधी एका सिक्युरिटी गार्डला विचारलं की लोकल टॅक्सी स्वस्त पडेल की कसं जावं..तर त्याने सरळ ओला करा असं सुचवलं..त्याप्रमाणे ओला केली आणि साधारण अर्ध्या तासात "Zostel" ला पोहोचलो. 
(Zostel ही हॉस्टेल्सची चेन आहे. जवळपास २५ शहरांमध्ये ही zostels आहेत. इथे डोर्मिटोरी असतात, साधारण ५०० रुपये भाडं असतं. तिथे सुविधा बऱ्याच असतात, त्यांचं किचनसुद्धा असतं जिथे आपण आपापला स्वयंपाक करून जेऊ शकतो..पाणी फ्री असतं..कॉमन रूम असतात जिथे वेगवेगळे गेम्स, कॉम्पुटर असं बरंच काही असतं. आणि मुख्य म्हणजे  आपल्यासारखंच फिरणारी लोकं भेटतात, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव कळतात, ओळखी होतात! मी या आधी गव्हर्नमेंट युथ हॉस्टेल मध्ये रहायची सोय करायचे, पण या वेळी सगळीकडे बुकिंग फुल असल्याने हा पर्याय शोधला!)

तर ओलाच्या ड्राइव्हरकडून बरीचशी माहिती काढून घेतली, कुठल्या जागा, त्यांच्या वेळा काय, जायला साधन काय, स्वस्तात मस्त लोकल शॉपिंग कुठे करावं इत्यादी इत्यादी..आणि त्याने आम्हाला zostel ला सोडलं. तिकडे चेक इन केलं..फ्रेश झालो..जरा अर्धा तास पडून घरच्यांना पोहोचल्याचं कळवून १० दरम्यान बाहेर पडलो..एक दोन किलोमीटर इकडे तिकडे फिरुन एका ठिकाणी नाश्त्याला आलू पराठा खाल्ला आणि तिथे चौकशी करुन "आमेर किल्य्याला" जायला बस पडकली. फक्त १० रुपयात साधारण ८-९ किलोमीटरचा प्रवास पार पडला..साधारण १२.३० दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो..या किल्ल्याची खासियत अशी की इथे हत्तीवरून किल्ला फिरता येतो! आसपास थोडी चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ७.३०-११.३० या वेळेतच हत्तीची सवारी असते. आमेर किल्याहून पुढे नहरगढ आणि जैगढ असे दोन किल्ले आहेत तिकडे मात्र कुठलीही बस जात नाही. रिक्षा किंवा ओला करूनच जावं लागतं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच आमेर बघायला यायचं ठरवलं आणि तिथून "ओला रेंटल" बुक करून नहरगढ कडे निघालो. ओला रेंटल हा खूप चांगला पर्याय आहे. ह्यात गाडी काही तासांसाठी आपल्याला मिळते. त्याची किलोमीटर मर्यादा आणि किंमत विविध पॅकमध्ये ठरलेली असते. तर अशी रेंटल ओला केली, पुन्हा ड्रायव्हरशी गप्पा मारत नहरगढला पोहोचलो. 
(राजस्थानमध्ये सगळीकडे (टुरिस्ट places म्हणतात तिकडे) प्रवेश शुल्क आहे. आणि सगळीकडे विद्यार्थ्यांना सवलतसुद्धा आहे. तर विद्यार्थी असाल तर  कॉलेजचं ओळखपत्र कायम जवळ बाळगा! बरेच पैसे वाचतील!)

आत गेल्यावर लगेचच एक पॉईंट आहे जिथून शहराचा हा सुंदर "view" बघायला मिळतो! 
आत जाताना एकीकडे "शिश महाल" आणि wax museum दिसतं..दोन्हीकडे जायला प्रत्येकी बहुदा ५०० रुपये तिकीट आहे. आम्ही तिकडे आत न जाता किल्ल्यात शिरलो. बाहेर राजस्थानी खासियत म्हणजे कटपुतळीचे खेळ करणारे काही लोक होते, काही वाजंत्री "पधारो म्हारे देस" वाजवत होते..थोडा आस्वाद घेऊन आम्ही तिथून सरळ आत गेलो. तिथे आत जाताच दगडांनी "मॉडर्न आर्ट" केलेलं होतं. त्या एक मजली वाड्यात तिथल्या राजाच्या ९ राण्यांसाठी त्याने ९ खोल्या केल्या होत्या, खालच्या आणि पहिल्या मजल्यावर…त्याच्या शेजारून जाणार पॅसेज असा केला आहे की एकाही राणीला कळणार नाही की राजा नेमका कुणाच्या महालात गेला, हे त्या आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य! त्या काळी खाली हिवाळ्यासाठी आणि वरती उन्हाळ्यासाठी अशा दोन खोल्या प्रत्येक राणीसाठी, आणि शिवाय तिच्या दासीसाठी केल्या होत्या. अर्थात आता तिथे फक्त खोल्या आहेत, आणि प्रत्येक खोलीत मॉडर्न आर्ट म्हणून काही न काही ठेवलेलं आहे, जे तितकंच बघण्यासारखं आहे.
सुरवातीला काही कळतच नव्हतं, गाईड घेतला नसल्याने. मग तिथल्याच एका पोलिसाला मी सहज विचारलं, तर त्याने गाईड घेतला नाही का विचारलं, कुठून आलात विचारलं..
मी पण अगदी बजेट ट्रिपवर आलो आहोत, विद्यार्थी आहोत असं सांगितलं आणि मग त्याने "चलो हम ही बता देते है!" असं म्हणून हे सगळं सांगितलं! मग त्याचे आभार मानून आम्ही बाकीच्या खोल्या आणि वरचा मजला फिरलो..नंतर बाहेर पडल्यावर तिथे एक खोल विहीर आहे, ती बघितली! आणि थोडं फिरून, फोटो काढून बाहेर पडलो..बाहेर खुप फळ विक्रेते आणि चना जोर गरम विकणारे असतात, त्याचाही आस्वाद घ्या!
मग तिथून जवळच असलेल्या जयगढ किल्ल्याला जायला निघाले.
प्रचंड विस्तीर्ण किल्ला आहे! हा किल्ला धन साठवायला, आणि आमेर किल्ल्याला सुरक्षितता म्हणून बांधला होता असं म्हणतात. आमेर किल्ल्यामध्ये जयगढ ला यायला एक भुयार सुद्धा आहे! जयगढला सगळ्या दिशांना उंच भिंत बांधलेली आहे, आमेर किल्ल्यावर कुठेही उभं राहिलं तरी ही भिंत दिसते. Great Wall of China सारखी बांधलेली ही भिंत तिच्या लाल रांगात एकदम भारी दिसते! जगातली सगळ्यात मोठी तोफ, जिचं वजन ५० टन आहे, ती या किल्ल्यात आहे..तिचं "जयवाण" असं नामकरण केलं आहे. जगातील सगळ्यात मोठी तोफ, ही ह्याच गडावर बनवली गेली, पण दुर्दैव असं की ती एकदाही वापरण्यात आली नाही! 
तर असा हा जयगढ! 
त्याचे विशेष फोटो काढले नाहीत, कारण तो इतका विस्तीर्ण पसरलेला आहे की फोनच्या कॅमेऱ्यात सहज कैद होणार नाही आणि दुसरं म्हणजे जानेवारी महिना असल्याने फार हिरवळही नव्हती त्यामुळे बाकीचा view काबीज करण्याचा प्रश्न नाही!
आम्हाला सगळं फिरायला साधारण ३.३०-४ वाजले…आणि या दरम्यान वातावरण प्रचंड बदलू लागलं..तसं आम्ही मुक्कामी जायचा निर्णय घेतला..आणि वाटेतच धुवाधार पावसाने आम्हाला गाठलं! तरी गाडी दारापर्यंत गेली हे नशीब! एवढं करून आम्ही पहिला दिवस जरा लवकरच संपवला, नाईलाजाने! पावसाने मजाही आली..पण प्रचंssड थंडी होती! मग जेवलो आणि गरमा गरम सूप करून प्यायलं आणि गप्पा मारुन झोपलो!

क्रमशः
©कांचन लेले