Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Tuesday 29 May 2018

अमावस्येचा चंद्र!


अमावस्येचा चंद्र!
अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र!
शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे!
चंद्र…
सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती!
शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना!
खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत..
गमतीदार आहे नाही..?
तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो..
किती दिवस आपलं लक्ष जातं..?
पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही!
अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..'
कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक!
पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला..
शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त्यासारखं सुख नाही! तो १५ दिवस असतो, पण लक्ष मात्र जातं आपलं फक्त पौर्णिमेला! त्यादिवशी नजर ठरत नाही असं रूप धारण करतो तो..
मग त्या दिवशी जरा ढगांआड गेलेला दिसला तरी आपण सारखे बघतो की ढग गेले की नाही, चंद्र पूर्ण दिसतो की नाही! जवळपास ढग म्हणजे त्याच्या उत्कर्षाला, सौंदर्याला लागणारी दृष्टच जणू!
पुढे वद्य प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत त्याची तब्बेत खालावत जाते..त्यातही एक वेगळं सौंदर्य धारण करून असतोच तो, फक्त आपलं लक्ष जात नाही! मग अचानक एक दिवस अंधःकार जाणवू लागतो…कदाचित या धकाधकीच्या आणि जलद जीवनपद्धतीत फक्त क्षणभर जाणवत असेल, पण तेवढा पुरून उरतो!
अचानक चंद्राचं महत्व कळतं..पण प्रतिपदेपर्यंत वाट बघावीच लागते!
म्हणून अमावस्येला चंद्र जास्त हवाहवासा वाटतो!
माणसांचंही काही वेगळं नसतं…
प्रत्येक व्यक्तिभोवती एक वलय असतं..
त्यात अग्रगण्य परिवार, मग नातलग, दोस्त मंडळी आणि आणि काही अशी नाती जी रक्ताची नसतात पण त्याहून सरस ठरतात!
ह्यातली काही माणसं सतत आपल्या अवतीभवती असतात, काही असतातच असं नाही, पण दोहोंपैकी कोणी लांब गेलं की पोकळी मात्र जाणवते!
उदाहरणार्थ घ्यायचं झालं, तर वडीलधारे आपल्या जन्मापासून-वयात येण्यापर्यंत पौर्णिमेचं शिखर गाठून जातात! पुढे एका एका कलेने बारीक होत जातात..तेव्हा गरज असते खरं लक्ष देण्याची! पण दुर्दैवाने बरेचदा आपलं लक्ष जातं ते एकदम अमावस्येलाच…
आणि सामान्यतः बघायचं झालं तर,
अनेक माणसांनी आपलं छोटंसं जग व्यापलेलं असतं..
ही माणसं सतत आपल्यासाठी असतात..काहींच्या संपर्कात आपण असतो सतत..पण काहींशी मात्र आपल्याला रोज संवाद साधता येतो, भेटता येतं असं नाही..ते त्यावर रागवतही नाहीत, ते सुद्धा असतात चंद्रासारखे सतत साक्षीला!
आणि कुठलंही नातं प्रेमाने आपलंसं केलं की ते दिवसागणिक कलेकलेने दृढ होत असतं.. ऋणानुबंध तयार होत असतात!
अशातच ज्या दिवशी ही मंडळी काही काळासाठी का होईना, पण लांब जातात असं दिसतं तेव्हा मात्र मन उचंबळून येतं!
डोळे पाणावतात! आपल्याला माहीत असतं की ती काही कायमची चालली नाहीत, सुट्टी संपली, काम झालं किंवा इतर असलेलं नियोजन साफल्य पावलं की ते येणार आहेत परत! पण तरी वेडं मन ऐकत नाही..
सतत आठवण काढत रहातं आणि मग आपणही खूप आतुरतेने वाट पहातो ती प्रतिपदेची!
कदाचित चंद्रही वाट पहात असतो प्रतिपदेची..
कारण अमावस्येला तुम्हाला तो दिसला नाही तरी तो बघत असतो तुम्हाला आणि असतो तुमच्या बरोबरच...कायम!
फक्त थोडासा ब्रेक घेतो अधूनमधून..कारण शेवटी
विरहाने नात्यातील प्रेम वाढत असतं ना!

काही विशेष लोकांना समर्पित ज्यांच्याशिवाय आयुष्य इतकं सुंssदर नसतं! I'm missing you all! लवकरच भेटू! :)
©कांचन लेले

Saturday 12 May 2018

मातृत्व!


स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी..
असं पूर्वापार मानलं गेलं आहे…
आई!
या एका शब्दभोवती खूप मोठ्ठं वलय आहे…
आणि म्हंटलं तर तो फक्त दोन अक्षरी शब्द आहे!
म्हणजे कुठूनही घरात आलं आणि आईने दार नाही उघडलं की पहिला प्रश्न असतो "आई कुठंय?"
तिच्याकडे काही काम असतं असं नाही.. पण तरी तिचं असणं गरजेचं असतं..
बरं वाटत नसलं की कुणी म्हणतं डॉक्टरांकडे जाऊ..तेव्हा उत्तर एकच असतं..आधी आईला बोलवा..
कुठलीही वस्तू सापडत नसेल की वरवर शोधूनच पहिला फोन जातो आईला..मग अगदी लगेच सापडते…बरेच दिवस बाहेरगावी असलं की फोन करो ना करो, पण परतायच्या एक दिवस आधी जेवायला काय हवंय ते सांगायला फोन नक्की होतोच! एक ना दोन..म्हणून म्हंटलं..मोठ्ठं वलय आहे!
शाळेत असताना आम्हाला एक कविता होती..
आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर,
निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर!
डोक्याने खूपच लहान होतो तेव्हा..पण आईवर काहीतरी म्हणजे भारी ना..असं वाटायचं!
पण 'आकाशाएवढा पदर' असं वाचल्यावर घरी जाऊन दोन्ही हात पसरून तो मोजला नक्कीच असेल कोणीतरी! कारण त्या वयात 'मायेचा' या शब्दाचा अर्थ तितकासा कळत नसतो..
पण वर्षं उलटत जातात आणि अर्थही लागत जातात..
काही लोकांना वाटत असेल इतक्या लहान मुलांना हे काय कळणार..? नाहीच कळत..मान्य आहे..पण त्या लहान वयात शिकलेलं, मुलं कधीच विसरत नाहीत..त्यावेळी त्यांचा मेंदू टिपकागदाचं काम करत असतो.. आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा खरंच कळु लागतं, तेव्हा हे टिपलेलं सगळं रवंथ करत जातो..
संस्कार आणखी वेगळे काय असतात..?
फक्त चांगलं पेरत जायचं..इतकंच!
संस्कार म्हंटलं की पुन्हा आईचा त्यात सिंहाचा…अ…सिंहिणीचा वाटा असतो असंही मानलं जातं!
अगदी मातृत्वाची चाहूल लागल्यापासून एका स्त्रीचं, किंबहुना हल्ली बरेचदा एका बेफिकीर बिनधास्त मुलीचं रूपांतर 'आई'मधे होतं..मग चांगलंच खायचं, चांगलं ऐकायचं, चांगले विचार करायचे इत्यादींची मनात यादी केली जाते..गर्भसंस्काराची पुस्तकं पिंजून काढली जातात..पोथ्या पुराण वाढतं..स्वच्छता वाढते आणि कधी नव्ह ते प्रत्येक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागते!
एखाद्या बिनधास्त मुलीच्या भावनांमध्ये तरंग उठत असतात..प्रत्येक गोष्टीवर 'react' व्हायचा 'angle' बदलत असतो..सगळी गणितं बदलत जातात..
लग्नाआधी 'मी नाही असलं काही करणार' असं म्हणणारी मुलगी बघता बघता कात टाकत असते!
हे सगळं बाळ गर्भात असताना..जन्माला आल्यावर तर बघायलाच नको..
जरा आधी म्हणायला गेलं तर बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो..त्या मरणप्राय यातना भोगल्यावरच एका जिवाच्या जन्माचा आनंद असतो! आपलं बाळ, आपल्या पोटचा गोळा!
पण जन्मा नंतर  मात्र त्या बाळाचे अनेक वाटेकरी असतात! फक्त गर्भात असताना ती एकटी मालकीण! त्या नंतर तिचं आयुष्यच बदलून जातं..खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो!
कारण ती स्वतःला विसरून जाते..आणि फक्त आई म्हणून जन्माला येते! अगदी सगळ्यात आवडत्या गोष्टीचा मोह सुद्धा ती सहज सोडून देते, कारण एकच असतं, घरी पिल्लू वाट बघत असेल!
खरंतर बरेचदा पिल्लू मजेत असतं, पण तिलाच करमत नाही त्याच्यावाचून!
पण हा आनंद प्रत्येक स्त्रीला अनुभवता येतोच असं नाही ना…?
मातृत्व हे कायम आईशी जोडलं गेलेलं आहे..
अर्थात ते सत्यही आहेच..पण खरंच या संज्ञेची व्याप्ती इतकीच आहे…?
नाही..नक्कीच नाही..जितकं मोठ्ठं वलय 'आई' या शब्दाभोवती आहे, त्याहून कितीतरी अधिक मोठं ते 'मातृत्व' या संज्ञेभोवती आहे!
पुराणातील उदाहरण घ्या, देवकी आणि यशोदा..
एक आई होती नात्याने, दुसरी ममत्वाने!
मातृत्व हे ममत्वाशी जोडलेलं आहे..
काही स्त्रियांना निसर्गाने गर्भधारणेचा अधिकार दिलेला नसतो, काहींना दिला असून त्याची कदर नसते, काहींचं लग्नच होत नाही, तर काही स्त्रिया आई होऊनही आपल्या मुलाला मातृत्वाने वाढवू शकत नाहीत!
अजब दुनिया आहे आपली..
पण म्हणून या जगात जन्माला येणारी मुलं वाढायची थांबत नाहीत ना..?
ज्यांना आई नाही, त्याची आई होणारं कुणीतरी असतंच ना..? मग ते अगदी बाबा, आजी, आजोबा, मावशी, आत्या, शाळेतल्या बाई, अनाथाश्रमातल्या बाई, पाळणाघरातल्या बाई इत्यादी इत्यादी..यादी खूप मोठी होऊ शकते..
कधी कधी एखादी मैत्रीणच आपली आई होऊन जाते..तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या हळव्या क्षणी मित्र असा डोक्यावर हात ठेवतो की क्षणभर कळूच नये नेमका कोणाचा हात आहे ते!
कधी एखाद्या एकट्या मुलाने एखादी मांजर किंवा कुत्रा पाळला असेल तर त्याचं नीट निरीक्षण करून बघा..तो त्याची आई झालेला असतो केव्हाच!
जन्मलेल्या प्रत्येक जीवामध्ये मातृत्व दडलेलं असतं..आणि प्रसंगानुरूप ते बाहेर येत असतं!
म्हणून म्हंटलं खुप मोठी व्याप्ती आहे 'मातृत्वाची'!
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी कळत नकळत प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात जेव्हा आई समोर नसते त्या क्षणाला..पण ती जागा तात्पुरती कुणीतरी भरून काढत असतं!
ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना कधी कुणाच्या मुलांना सांभाळताना बघितलं आहे..?
पोटच्या गोळ्याला कुणी लावणार नाही इतका जीव ती माऊली कुठल्याही मुलाला सहज लावते..
निसर्गाची क्रूर चेष्टा तिच्यातील मातृत्व आणखी दृढ करते हे मात्र निश्चित!
अशा प्रत्येक माउलीला एक सलाम आणि लोकांमध्ये दडलेल्या मातृत्वाच्या ओढीला नम्र अभिवादन!
अशा अनेक जीवलगांनी आयुष्य सुंदर होत असतं..
गरज असते फक्त त्यांना धरून ठेवण्याची
आणि प्रत्येकाने आपल्यातील संवेदना जपण्याची, न जाणो तुम्हीच कधी कुणाची आई होऊन जाल!
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
©कांचन लेले

चित्र सौजन्य - Google

Friday 11 May 2018

आंडू गुंडू थंडा पाणी!


काल एका बाल मैत्रिणीने एक 'meme' पाठवलं..
त्यात एक जण दुसऱ्याला म्हणत असतो - "ए तो बघ south indian!"
आणि दुसरा लगेच ओरडतो - "ए आंडू गुंडू थंडा पाणी!"
एवढं वाचल्याबरोबर माझ्या मनाचं टाइम मशीन अचानक सुरू झालं आणि मला एक दशक किंवा आणखी थोडं जास्ती मागे घेऊन गेलं!
आत्ता मूर्खपणा वाटत असेल पण खरंच आम्ही असं करायचो तेव्हा..दाक्षिणात्य लोकांना आंडू गुंडू म्हणायचो, सरदारजी दिसला की चंगोटी (पहिली दोन बोटं टोकाला टोक जुळवून धरायची, म्हणजे त्यातून एक भोक होतं आणि मग कोणीतरी त्यात बोट घालून ते फोडायचं!),  केस कापले की 'ताजी' मारणं, नवीन वस्तू घेतली आणि कळलं की जोरात धपाटा मारणं, birthday bombs मारणं! इत्यादी इत्यादी!
हे झाले जनरल खेळ..मग शाळेतले खेळ वेगळे!
ऑपस्-बँट्स, जॉली, पेन फाइट, स्केल फाइट..हे न लिहिता खेळायचे खेळ..आणि लिहून खेळायचे तर कहरच!
त्यात दोन प्रकारचे लोक! एक म्हणजे कुठल्याही वहीच्या मागे हे खेळ खेळणारे, तर दुसरे बाकी सगळ्या विषयाच्या वह्या रिकाम्या असल्या तरी त्याला हात न लावता एका वर्षात साधारण ५-६ रफ बुक भरणारे! (म्हणजे माझ्यासारखे!! आणि मग पुढच्या वर्षी विषयांच्या रिकाम्या वह्या रफ बुक म्हणून वापरणारे!!)
तर ह्या खेळात मुख्यत्वे "नाव-गाव-फळ-फुल", बिंगो, एक अक्षर घेऊन जास्तीत जास्त नावं लिहिणं आणि लिहून दम-शेराज (चित्रपटांच्या नावाचा)! हे असायचे! कित्येक वेळा शिक्षक शिकवतानाच ते खेळले जायचे हे वेगळं सांगणे न लगे!
बाकी अगदी लहानपणी चिठ्या टाकून चोर पोलीस वगैरे बरेच खेळ खेळलेलो!
पण आज माझ्याकडे काही वह्या जपून ठेवल्या आहेत त्यात हे सगळे खेळ आहेत! आज बघताना इतकं छान वाटतं..आम्हाला कधी फोनची गरज नाही पडली खेळायला!
आता माझाही वडीलधाऱ्यांसारखा 'आमच्या वेळी…' असा सूर लागतोय पण त्याला पर्यायच नाही!
अलीकडे एका शाळेतल्या मैत्रिणीबरोबर शाळेच्या बाहेरच्या रस्त्याने जाताना आम्ही थांबलो आणि बराच वेळ बदललेली शाळा बाहेरूनच बघितली..
सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या!
खरंतर त्या भागात गेले की नेहेमीच माझा १०० चा स्पीड अचानक २० वर येतो आणि पावलं रेंगाळतात!
एक एक जागा आजही आठवते! इथे कैरीवाला असायचा, इथे बाबू वडापाववाला, इथे झोपडी..
आज यातली अगदी एक दोनच लोकं आहेत..पण ती अजूनही ओळखतात आम्हाला!
त्या झोपडीत पेप्सीकोला, गोळ्या, चिंचेची एक दोन प्रकारची चॉकलेट्स, पेपरमिंटच्या सिगारेट ज्या आमच्यासाठी त्या वेळी 'swag' ची परिसीमा असायच्या! त्या पेप्सी कोला मध्ये सुद्धा दोन प्रकार असायचे! एक जाड जी आठ आण्याला मिळायची आणि दुसरी खूप लांब, कोपरापासून बोटांपर्यंत लांब आणि बारीक जी एक रुपयाला मिळायची!
एकदा जाड पेप्सी संपल्या होत्या तेव्हा मी आणि मैत्रिणीने आठ-आठ आणे एकत्र करून मोठी लांब पेप्सी घेतली..आणि एका बाजूने तिने आणि दुसऱ्या बाजूने मी खाल्ली! किती वेडेपणा!
आता ही मजा कधी घेता येणार..?!
आणखी एक जबराट आठवण म्हणजे..
एका स्पोर्ट्स डे ला मी आणि माझी मैत्रीण चक्क दादरहून कुर्ल्याला चालत आलो! कशासाठी..? तर चिंच आणि कैरी खायची होती पण पैसे नव्हते! म्हणून बसच्या तिकिटाचे पैसे त्यात घालून आम्ही ते खात खात चालत आलो! आता AC गाड्यातून येणाऱ्या पोरांना हे सांगितलं तर हसतील लेकाचे!
पण तेव्हा एवढं उन्हाचं चालून ना आम्ही आजारी पडलो ना आम्हाला कोणी पळवून नेलं! (हे धोक्याचं होतं हा विचारही तेव्हा बालमनाला शिवला नाही!)
असे अनेक किस्से आहेत! 
बिल्डिंग मध्ये खेळायचे खेळ आणखी निराळे
Red Letter, बॅडमिंटन, आणि अर्थातच क्रिकेट..आणि तेव्हाचं क्रिकेट आणी बॅडमिंटन खेळायचे विशेष नियम बरं! क्रिकेट म्हणजे अर्थातच एक टप्पा आउट! आणि बॅडमिंटन म्हणजे एकदा शटल खाली पडलं की गेला टर्न! काय मज्जा यायची पण!
गटारात बॉल गेला की हातानेच तो काढणं, सुदैवाने
आमच्या वेळी लाइफ बॉय हॅन्ड वॉश नव्हता बाई!
आणि तरी आम्ही धुवत रहा धुवत रहा…असं काही केलं नाही बाबा….असो! 
प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये किंवा सोसायटी मध्ये एखाद्या आजी असतातच ज्या कायम मुलांच्या खेळण्यावर डोळा ठेवून असतात! मग त्यांना मुद्दाम पिडणं आलंच! शाळेतही आम्ही कित्येक शिक्षकांना नावं पाडली होती, अर्थात टोपण नावं! मी तर एक चार पानी कविता सुद्धा केली होती!
एक ना दोन!
पण ह्या सगळ्या भानगडीत आम्ही कधीच मोठ्यांचा अनादर नाही केला..टिंगल मणभर केली, पण मन भरून आदरही दिलाच!

हा महिनाच असा "nostalgic" होण्याचा आहे नाही..?!
विशेषतः उन्हाळी सुट्यांमुळे!
प्रत्येकाच्या बालपणीच्या, उन्हाळी सुट्य्यांच्या, मामाच्या गावाच्या कित्ती आठवणी असतील ना..?
माझ्यामते आम्ही सगळ्यात भाग्यवान..आमचं बालपण कोकणात गेलं!
आंब्याचा वीट येण्याइतका अस्सल हापूस खाण्यात आणि नंतर गळवं आली की इंजेक्शन घेण्यात गेलं!
ते सुट्टीचे खेळ आणखीनच वेगळे! 
जिना भो! किंवा डबा ऐस पैस..डोंगर का पानी, विष अमृत, इत्यादी! सकाळचा मऊ भात खाल्ला की मागे पाय लावून जे पसार व्हायचो ते दुपारी जेवायला हाका मारून बोलवायला लागायचं..पुन्हा निजा-निज झाली की कोणाच्यातरी माडीवर जमून लपाछपी, सोंगट्या, भातुकली वगैरे खेळायचं..किंवा ठकठक, चंपक, चांदोबा वाचायचं!
संध्याकाळी पुन्हा खळ्यात! मग सातच्या जरा आधी घरात जायचं, हात-पाय धुवायचे..आणि शुभंकरोती म्हणायला सगळे झोपळ्यावर! मग रात्र असायची पत्यांच्या नावावर! आणि शेवटी अगदी घाबरत असूनही लाइट घालवून भुताच्या गोष्टी ऐकायच्या, आणि सगळे झोपले की पांढरे पंचे हवेने हलले तरी रामरक्षा म्हणायला सुरवात करायची!
भाड्याने कॅसेट आणून पिक्चर बघणं! मारिओ सारखे खेळ खेळणं! फक्त मे महिन्यातच व्हायचं!
त्या वेळचे पिक्चर सुद्धा इतके भारी असायचे, मुख्य म्हणजे संपूर्ण परिवाराबरोबर बसून बघता यायचे..कारण सगळ्यात हॉट scene दाखवायचा असेल (म्हणजे थोडक्यात bedroom scene) की दोन फुल एकमेकांवर अपटायची आणि ब्लॅक आऊट होऊन पुढील सिन सुरू व्हायचा..समझने वाले समझते, बाकी सचमे pogo देखते!
हल्ली काही scenes दाखवायला bedroom लागतेच असंही नाही, आणि ते बघायला कोणाला बंदी करतात असंही नाही! Afterall we should give children their own space!
द्या स्पेस..आणि मग खऱ्या space मध्ये जायची स्वप्न बघायच्या ऐवजी वाया जातायत पोरं!
अर्थात प्रत्येक generation मधे वाया जाणाऱ्या पोरांचा एक भाग असतोच, पण त्यात कमालीची वाढ होते आहे हे दुर्दैव! हल्लीची पोरं खूप शार्प आहेत..पण त्यांची ही हुशारी योग्य कामी येत नाही हे दुर्दैव!
अलीकडेच मी शाळेत गेले होते, प्रिन्सिपल कडे काही काम असल्याने ऑफिसच्या बाहेर बसले होते, तेवढ्यात एक टीचर आल्या..एक साक्षात्कारी नजर माझ्याकडे टाकली आणि म्हणाल्या "तुम्ही फाssर  बरे होतात गं!" मी सुद्धा गमतीत तेव्हा "बघा, तेव्हा आम्ही हे म्हणायचो तर तुम्हाला पटायचं नाही!" असं उत्तर दिलं खरं पण हल्लीच्या शिक्षकांची व्यथा तेच जाणे! आधी जनरेशन गॅप ही खरोखर एका पिढीची असायची, हल्ली ती दशकावर येऊन ठेपली आहे!
असो!
आमचं बालपण मात्र खूपच भारी होतं!
आठवणी काढू तेवढ्या थोड्याच!
रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी!
बरं त्या वयातल्या महत्त्वाकांक्षा तर इतक्या भारी असायच्या की दृष्टच काढावी स्वतःची!
रोज काहीतरी नवं व्हायचं असायचं आपल्याला..
काही उदात्त विचारांच्या लोकांना डॉक्टर वगैरे व्हायचं असायचं..पण मला आपलं इस्त्रीवाल्याला बघितलं की इस्त्रीवाला व्हायचं असायची, त्याचं ते सफाईदारपणे शर्ट सुरकुती न पाडता उलट करणं आणि कडक घडी करणं मला जाम आवडायचं!
मला बसची, कंडक्टर ओढतो ती दोरी आणि तिकीट पंच करायच्या स्टॅपलर सारख्या वस्तूची टिकटिक पण आवडायची..म्हणून मला कंडक्टर व्हायचं होतं..नंतर मला ACP प्रद्युमन व्हायचं होतं! जाऊदे लिस्ट फारच लांब होईल आणि उगच कशाला स्वतःची अक्कल पाजळा ना! 
पण आज मागे वळून बघितलं की वाटतं हे सगळं भांडवल आहे आपल्या आयुष्याचं!
हल्ली डिप्रेशन नावाचा एक साथीचा रोग पसरत चालला आहे...मला मनापासून वाटतं, जेव्हा असे क्षण येतील तेव्हा ह्या सगळ्या आठवणी किती मोठा आधार आहेत! एक गोष्ट जरी आठवली तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य विलसतं! मग डिप्रेशनकी क्या हिम्मत मुझे हात लागये..?!
सुखी आयुष्याचा कानमंत्र सांगते..असं कधीही झालं की तुम्ही लहानपणी केलेल्या गोष्टी पुन्हा एकदा करून बघा! कल्ला करून बघा! शाळेतल्या मित्रांना भेटा! पुन्हा आयुष्य भरभरून जगावंसं वाटेल!
"पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे किती वाटते..
उतरून ओझे वयाचे चला रे, पहा कोवळे ऊन बोलावते!
वर्षांचे पूल आज, ओलांडून ये आल्याड!
घे तुला हवीच मधली सुट्टी!
थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी!"
( कवी - संदीप खरे!)
सध्या परीक्षेचा काळ आहे..आणि मागच्या रिकामटेकड्या महिन्यात काही म्हणजे काही सुचलं नाही..आता कादंबरी लिहून होईल इतकं सुचतं आहे..आता येतं ह्याचं डिप्रेशन मला..पण उद्या त्यावर एक उपाय करणार आहे!
उद्या एखादा दाक्षिणात्य दिसल्यावर जोरात ओरडणार आहे
 'एsss आंडू गुंडू थंडा पाणी!!!!"

©कांचन लेले