Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Tuesday 13 November 2018

वाढदिवस!

वाढदिवस, जन्मदिन, Birthday, सालगिराह इत्यादी इत्यादी अनेक शब्दांनी संबोधलेला एक खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच!
तसंच प्रत्येकाच्या जन्माची काहीतरी कहाणी असतेच..
केव्हातरी आपली आई, आजी, आत्या, काकू, बहीण वगैरे कोणीतरी सांगतंच…साधारण असं "काय सांगू तुला, इतकाss पाऊस पडत होता त्यादिवशी आणि नेमकं घरात कोणी नाही" किंवा "दिलेली तारीख होती महिन्यानंतरची आणि तुला कोण घाई झाली होती, आठव्याच महिन्यात अवतरलास" ..किंवा (विशेषतः आमच्या किंवा आमच्या आधीच्या "दुसऱ्या" मुलींच्या बाबतीत) मुलगी झाली म्हणून बघायला सुद्धा आल्या नव्हत्या सासूबाई"  किंवा "तुझ्या बाबांना कळवलं तेव्हा ते एका हॉटेलात जेवत होते, त्यांनी चक्क तिथे बसलेल्या सगळ्यांना गुलाबजाम द्यायला सांगितले!!"
एक ना दोन! अशी आपल्याच जन्माची कथा रंगवून रंगवून नातेवाईक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो! तेवढंच काय ते आपल्याला समाधान!
कधी कधी बारीक विचार केला की कळतं आपल्या जन्माने आपण कित्तीsss लोकांना आनंद दिलेला असतो. आई-बाबांच्या डोळ्यात तो आयुष्यभर दिसतोच! आपण म्हणजे ज्यांची दुधावरची साय असतो त्या आजी-आजोबांच्या प्रत्येक स्पर्शात तो दडलेला असतो..
आपल्या मोठ्या भावंडांच्या चिडवण्यात तो दडलेला असतो, प्रत्येक लहान भावंडाला हमखास हे ऐकायला मिळतं - तू सावत्र आहेस, तुला कोंड्यावर घेतलं आहे वगैरे वगैरे!
हे झाले घरातले अगदी जवळचे लोक, ह्या नंतर येतात नात्याने जवळचे नसलेले, पण सहवासाने जवळचे असलेले म्हणजे शेजारी!
चाळ संस्कृतीत बघायला गेलं तर मुलं आपल्या घरी कमी आणि दुसऱ्याच्या घरीच जास्ती असतात..कारण सगळ्यांची दारं सतत उघडी असतात आणि कुणाच्याच घरात जायला संकोच वाटत नाही!
ह्या लोकांनी आपल्याला अंगा-खांद्यावर खेळवलेलं असतं..कित्येक वेळेला आपल्या आईने, " जरा ह्याच्याकडे बघा, मी पटकन भाजी घेऊन येते!" असं हक्काने सांगून निर्धास्तपणे आपल्याला ह्या सगळ्यांवर सोपवलेलं असतं! आपल्या नुसत्या खिदळण्याने ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो ते हेच सख्खे शेजारी!
त्यानंतर येतो उर्वरीत परिवार!
परिवारातील प्रत्येक व्यक्तीशी आपलं एक equation असतं!
काही भावंडं, मामा, आत्या इ. खूप हव्याशा वाटतात तर काहींना टाळावं कसं ह्याचे बहाणे शोधत असतो आपण! पण ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या येण्याने एक बारीकसा का होईना, फरक पडलेला असतोच!
मग कळायला लागल्यानंतर येतो मित्रपरिवार! केव्हातरी एखादा मित्र म्हणून जातो, "यार तू नसतास तर काय झालं असतं आज!"..
तसं बघायला गेलं तर हे वाक्य किती कॉमन आहे नाही..?
आपल्या भावनांच्या एखाद्या परमोच्च क्षणी आपण आपल्या तारणहार व्यक्तीला किती सहज हे म्हणून जातो!
पण अगदी शब्दशः विचार करत मागे गेलो आणि असं समजलो की आपण जन्मालाच आलो नसतो तर या प्रत्येकाच्या आयुष्यात काय फरक पडला असता…?
खरं या जगाचा अलिखित नियमच असा आहे की कोणावाचून काही अडत नसतं!
हे जरी खरं असलं, तरी प्रत्येकावाचून काहीतरी बदल होत असतात! काही अडत नसेल नक्की, पण फरक नक्कीच पडत असतो!
आपण जन्माला येतो, आणि बहुतेक वेळा प्रत्येक जन्माला आलेला जीव आनंद घेऊन असतो…काही अपवाद असणारच!
आपल्या येण्याने आणि आपल्या असण्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती फरक पडतो हे बरेचदा आपल्याला माहीतच नसतं!
तसं असतं तर कदाचित आत्महत्यांचं प्रमाण इतकं जास्ती नसतं आपल्याकडे!
काहीही न करता आपल्याला एक सुंदर आयुष्य आयतं मिळत असतं..
त्याला आकार देणं मात्र आपल्या हातात असतं!
आता प्रत्येक जीव अगदी सुस्थितीत असलेल्या परिवारात जन्म घेईलच असं नाही, अनेकांना जन्मतः परिवार काय एक आई सोडल्यास कुणीच नसतं..पण तरी असे अनेक लोक आपल्या आयुष्याला सुंदर आकार देत असतात आणि दुसऱ्यांपुढे आदर्श ठेवत असतात, त्या प्रत्येकाला एक कडकडीत सलाम!
काही महाभाग असेही असतात की असलेल्या सुस्थितीत तंगड्या पसरुन वर उद्धटपणे तोंड वर करुन आपल्यालाच सांगतात आमच्या सात पिढ्या बसून खातील इतकी इस्टेट आहे आमची!
पण त्यांना बिचाऱ्यांना असा प्रश्न कधी पडत नसेल का की आपला जन्म काय इस्टेट वाया जाऊ नये म्हणून झाला काय..?
असो..
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या एका सुंदर आणि सगळ्यात महत्वाच्या आठवणीचा उजाळा करणारा दिवस असतो!
प्रत्येक वर्षी आपण वयाने, शरीराने, बुद्धीने वाढत असतो!
पण प्रत्येक वाढदिवसाला आपलं आयुष्य एका वर्षाने कमी होत असतंच की!
वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे होतीच, पण त्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत चालला आहे!
पूर्वीच्या काळी वाढदिवसाला औक्षण केलं जायचं, झालंच तर एखादा नवीन कपड्याचा जोड मिळायचा..
नंतर नंतर आसपासच्या लहान मुलांना घरी बोलावलं जाई..
मग केक कापायची एक प्रथा रूढ झाली..
नंतर सगळ्यांना एखाद्या हॉटेल किंवा मूल लहान असेल तर हॉलमध्ये बोलावून जेवण द्यायची पद्धत आली..
मध्येच अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करायची एक लाट येऊन गेली..
आणि सध्या म्हणजे सकाळी घरातून गेलं की पार्टी (पार्ट्या) करुन उत्तर रात्री घरी येण्याची प्रथा रूढ होत आहे!
अर्थात या सगळ्याची टक्केवारी ६०-८० टक्के असेल!
बाकी २०-४० टक्के लोकांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करणारे, एकट्याने साजरा करणारे, लक्षात असून साजरा न करणारे, लक्षातच नसणारे, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा घरच्यांची हौस म्हणून साजरा करणारे इ. लोक येतातच!
प्रत्येक वाढदिवसाच्या आपल्या आठवणीही असतातच..
फोटोत बघितलेला पहिला वाढदिवस..
खरं पहिला वाढदिवस दणक्यात केला जातो, पण त्यात त्या मुलाला काय कळत असतं हा मोठा प्रश्नच आहे!
त्या नंतरचे लहान मुलांच्या घोळक्यात केलेलं वाढदिवस..
शाळेत नवी ड्रेस घालून केलेले वाढदिवस..
कॉलेजमध्ये मित्रांना पहिल्यांदा बाहेर पार्टी दिलेला वाढदिवस..
स्वतःच्या कमाईतून घरच्यांसाठी काहीतरी नेलेला वाढदिवस!
प्रेमात पडल्यानंतरच्या वाढदिवस!
(प्रेमभंगा नंतरचा एखादा sad वाढदिवस)
लग्नानंतरचा वाढदीवस!
आपल्या पोटच्या गोळ्याने पहिल्यांदा आपल्याला बोबड्या बोलात विश केलेला वाढदिवस!
नंतर मुलं मोठी झाल्यावर त्यांनी आपला साजरा केलेला वाढदिवस!
पन्नाशी, साठी, सत्तरी, पंचाहत्तरी, अंशी!
बघा किती आठवतायत ते!
हल्ली तो YOLO चा फंडा आलाय खरा, पण त्या बरोबरच प्रत्येक माणसाने वाढदिवशी मागे वळून त्या वर्षात आपण काय चांगलं केलं, काय शिकलो, इतरांना काय दिलं…एकूणच काय कमावलं आणि काय गमावलं ह्याचा विचार करुन तो दिवस साजरा करावा!
शेवटी प्रत्येक माणूस हा स्पेशल असतोच, अनेकांसाठी!
आणि सहज म्हणून हवंतर आपल्या वाढदिवसाला हा खेळ खेळून बघा, आपल्या जवळच्या लोकांना एवढंच विचारा की माझ्या असण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला…?!
ता.क. - मित्रांना विचारू नका, घोर निराशा झाल्यास मी जबाबदार नाही!
जाता जाता हा लेख त्याच्या स्फुर्तीस्थानाला, एका नवीन मैत्रीला आणि खास विसराळू मित्राला अर्पण,
ज्याने आज सहज मला सांगितलं, "अगं आपण उद्याच्या ऐवजी परवा भेटूया! माझ्या आत्ताच लक्षात आलं आहे की उद्या माझा वाढदिवस आहे!"
काय बोलणार आता…?!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
जुग जुग जियो मित्रा! :)
©कांचन लेले
Photo Courtesy - Google