Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Saturday 6 January 2018

कोकण कन्या!


कोकण कन्या! शिर्षकावरून साधारण लक्षात येऊ शकतं की अशा नावाची एक रेल्वे म्हणजेच ट्रेन आहे..आणि माझ्यामते त्या ट्रेनचं नामकरण करणारा माणूस थोर आहे!!
कोकणची कन्या म्हणवून घ्यायला त्या निर्जीव ट्रेनला सुद्धा अभिमान वाटतो..तर आम्हाला किती वाटत असेल ह्याचा अंदाजच करावा!
आमचो कोकण म्हणताना जे मूठभर मास चढतं त्याने मी सुद्धा थोडी जाड दिसत असेन!
तर आज पुन्हा एकदा, बरेच वर्षांनी कोकण कन्येने प्रवास करायची संधी मिळाली…थोडं दुःख इतकंच की या वेळी कोकणात न जाता ती कन्या ह्या कन्येला गोव्यात सोडणार होती, सुखरूप! हो..कारण प्रवास एकटीने करायचा आहे!
मला नेहेमीच एकटीने प्रवास करायला आवडतं..त्यात तो कोकणातला आणि ट्रेनने म्हणजे तर चार चांद! त्यामुळे reservation करताना ACचे पर्याय आणि घरातल्यांच्या सूचना सपशेल धुडकावून माझ्या लाडक्या साईड लोवर सीटचं स्लीपर कोचचं reservation केलं! कोकणात जाताना कसं खिडकी उघडीच पाहिजे..आमच्या कोकणातली हवा अशी अंगावर घेताना काय सुख मिळतं म्हणून सांगू..आणि इतकी स्वच्छ की तो जळ्ळा AC पण गुदमरत असेल तिकडे बंद डब्यात!
आणि एवढं निसर्ग सौंदर्य दिसतं ते काय काचेआडनं बघायचं…? छे…अशक्य!
तर काल रात्री कन्या नेहेमीप्रमाणे उशिरा आली..एव्हाना सगळ्यांना हे माहीत आहे की ती उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध आहे..पण आल्यावर जे काही समाधान देऊन जाते म्हणून सांगू…
म्हणजे एखादा गायक मैफिलीसाठी उशिरा यावा..मग तंबोरे लावत बसावा..इतका वेळ रसिक वर्ग ताटकळत असावा…पण पहिला सा लावल्यावर जे सुख मिळतं ना! तेच ही कन्या आल्या आल्या मिळतं..
एरवी कुठे एकटं जाताना तुम्ही कितीही धीट असलात तरी मनाच्या कुठल्यातरी बारीकशा कोपऱ्यात एखादी शंका असतेच! पण कोकणात जाताना..? कधीच नाही..एकतर प्लॅटफॉर्म वर अर्धा एक तास वाट बघताना कानावर जी आपली भाषा पडते, त्यानेच सगळी चिंता पळून जाते..मराठीच ती, पण कोकणातली ओ…काय समजलात..? त्याची गोडी जेका कळली तो खरा कोकणचा!
अशा सगळ्या आपल्या माणसांमध्ये एकटेपणा कधी वाटतंच नाही..कारण खरंच म्हंटलंय कोकणची माणसं साधी भोळी! त्यांच्यापासून आपल्याला काही धोका आहे असं वाटणारच नाही! उलट घरची मंडळी आहेत असंच वाटतं…
तर प्रवास पाऊण तास उशिरा सुरू झाला..गर्दी खूप होती, पण सकाळी जाग आली तेव्हा बरीच गर्दी ओसरलेली आणि मुंबईची हवा मागे टाकून कोणातल्या हवेने माझ्या प्रवेश केलेला...स्वच्छ हवा..आणि त्यात ओलावा आपुलकीचा, प्रेमाचा…!
सकाळी उठल्या उठल्या लाल मातीचं दर्शन होणं ह्या इतकी रम्य सकाळ माझ्यासाठी तरी दुसरी नाही!
असंख्य आठवणी या लाल मातीशी जोडलेल्या आहेत…आणि त्याला जोडून लांबच्या लांब पसरलेले मोकळे मळे..माडांची रांग….चिऱ्यांची कौलारू घरं…घरापुढे सारवलेलं अंगण..गवताच्या पेंढी…शेजारी केळ…चरणारी गुरं…असं सगळं चालत्या गाडीतून बघण्याचा आनंद काही औरच…
आणि इकडली स्टेशनं सुद्धा मला प्रचंड आवडतात..का काय माहीत…खरंतर लांबच्या लांब पसरलेला प्लॅटफॉर्म आपण अगदी ओसाड…पण लहानपणापासूनच मला तो खूप आवडत आला…कदाचित लोकांना मुंबईचे तुडुंब भरलेले प्लॅटफॉर्म बघण्यात जे अप्रूप असतं, तेच मला हे रिकामे..शांत, स्थीर प्लॅटफॉर्म बघण्यात मिळतं…इथे आलं की माणूस सुद्धा असाच शांत होत असतो..सगळी टेन्शन बाजूला ठेऊन निवांत चार दिवस घालवून जातो!
पण या वेळी जरा दुःख होत होतं कारण मला हे सगळं मागे टाकून पुढे गोव्यात जायचं होतं..गोव्याला  सुद्धा जायची इच्छा होऊ नये आणि कोकणातच उतरावं वाटतं तेव्हा खरी मी कोकणची कन्या!
आमचं कोकण आहेच तसं…तुम्ही अनुभवलंय की नाही…? नसेल तर नक्कीच अनुभव घ्या..कारण आम्ही येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हसतमुखानेच करत असतो..तर…येवा..कोकण आपलाच असा!!
©कांचन लेले

No comments:

Post a Comment