Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 13 March 2022

पावनखिंड - एक अनुभव!

थिएटर पुन्हा सुरु झाल्यापासून दर्जेदार सिनेमांची खैरात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहे याचा प्रचंड आनंद आहे. पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स, हे दोन्ही सिनेमे दर्जेदार असूनही कितपत बघवतील ही भीती मनात होती.
माझ्या सुदैवाने लहानपणापासून चांगलं साहित्य आई वडिलांनी हातात दिल्याने शिवचरित्र अनेक वेळा डोळ्याखालून गेलेलं होतं.
अनेक रात्री जागवल्या होत्या.
अनेक वेळा उशी भिजली होती.
आता हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघायचं म्हणजे काय होईल?
हा विचार करुन एवढे दिवस गेले नव्हते.
पण मग वाटलं आपण जर आज गेलो नाही, तर उद्या आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून व्यर्थ ठरु.
आपले काही शिवभक्त कलाकार आपला वेळ-पैसा आणि घाम गाळून महाराजांची व त्यांच्या अनेक शूर साथीदारांची कीर्ती जगासमोर मांडतायत आणि आपण घरात बसून रहाणं हे चूक नाही, 

हा गुन्हा आहे.

म्हणून फोन उघडून तिकीट काढावं म्हंटलं, तर एक शो होता ज्याची वेळ जमण्यासारखी होती आणि अजून house full नव्हता. बाकी बरेच शो house full होते याचा मनोमन आनंदच वाटला. मग त्या शो चं तिकीट काढावं म्हणून booking process केलं तर पहिल्या रांगेतली पहिली एकच सीट बाकी होती.

काही वेळेला इतके अचाट अनुभव येतात ना, तरीही माझी ट्यूब पेटली नाही. मी मागे जाऊन दुसरे शो बघितले...पण मग लक्षात आलं, ती एक सीट माझ्या नावाची आहे. आणि एवढा विलंब झाल्याने पहिल्या रांगेतली आहे.
माझ्यासाठी रिकामी राहिली आहे. 
आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी सिनेमा चौथ्या आठवड्यात असूनही पहिल्या रांगेतल्या पहिल्या सीटवर बसून बघावा लागतोय.
मी लगेच ती सीट बुक करुन थेटर कडे कूच केली!

कुठलाही स्पोइलर देण्यात मला काडीचा रस नाही, किंवा हे पिक्चरचं परीक्षण नाही. हा फक्त माझा अनुभव आहे.


चित्रपट सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक माणूस, त्याने वठवलेलं प्रत्येक पात्र, संगीत, संवाद, चित्रीकरण, वेशभूषा, रंगभूषा, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन हे काम म्हणून केलेलं नाही तर निव्वळ जीव ओतून केलेलं आहे याची प्रचिती येते.

विशेष कौतुक करावंसं वाटतं ते समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांनी वठवलेल्या सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद या पात्रांचं.
समीर धर्माधिकारीने इतकं अप्रतिम बेअरिंग घेतलं की एंट्रीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. जोडीला आस्ताद काळे! खरं सांगते, चित्रपट संपल्यावर गूगल करुन बघितलं तेव्हा कळलं की सिद्दी मसूद हे पात्र आस्ताद काळेने साकारलं आहे..अतिशय सुंदर अभिनय!

चिन्मय मांडलेकर हा कायमच माझा अतिशय प्रिय अभिनेता, लेखक राहिला आहे. खरंतर दिगपाल लांजेकर आणि या त्यांच्या समस्त शिवभक कलाकार टोळीने सुरवात केली तेव्हापासून सुरवातीला थोडी शंका होती की चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत कितपत शोभेल. पण आज डोळे मिटले आणि विचार केला तर त्यानेच दिसावं हे त्याच्या अभिनयाचं यश आहे. खरंतर अमोल कोल्हेनी एक काळ असा गाजवला की गडागडांवर महाराजांची म्हणून लॉकेट, प्रतिमा, पोस्टर विकली जात होती ती म्हणजे अमोल कोल्हेची. अशावेळी हे धाडसी काम करणं फारच अवघड आणि जबाबदारीचं, पण ती जबाबदारी पूर्ण पार पाडली आहे. विशेषतः एका दृश्यात सिद्दीच्या वेढ्याची गडावरुन पहाणी करुन महाराज वळतात आणि पाठमोरे होऊन चालत जातात, ते अदृश्य होईपर्यंत शॉट घेतला आहे. ती त्यांची चाल मनात भरते!

विशाळगडाकडे निघण्यासाठी मावळ्यांना संदेश देत असतानाच्या दृश्यात मशालीचं प्रतिबिंब बुबुळात पडलं आहे, आणि त्या क्षणी डोळ्यातले भाव, ते संवाद आणि त्या मशालीच्या प्रतिबिंबाने लावलेले चार चांद ही दिग्दर्शकाची कमाल व्हिजन दिसून येते!

मृणाल कुलकर्णीशिवाय दुसऱ्या कुणाला आऊसाहेबांच्या भूमिकेत बघणं, अजूनही मनाला पटत नाही, पटणार नाही!
काय ते तेज!

बाजी(अजय पुरकर), फुलाजी (सुनील जाधव), रायाजी(अंकित मोहन), कोयाजी (अक्षय वाघमारे) हे  चार अभिनेते या चित्रपटाचे खांब होऊन पायरीपासूम कळसापर्यंत जाईस्तोवर प्रेक्षकांना खुर्चीत रुतवून ठेवतात!
याचबरोबर मातोश्री बयोबाई, दिपाईआऊ बांदल, भवानीबाई, गौतमबाई ही यांच्या मातोश्री व धर्मपत्नींची पात्र तितक्याच तोडीने साकारली आहेत.

हरीश दुधाडेने साकारलेला बहिर्जी नाईक मनात घर करुन जातो!
बहिर्जी हे महाजांचे अतिशय हुशार हेर होते. ती हुशारी डोळ्यात आणणं हे कसबीचं काम हरीश दुधाडेनी अप्रतिम केलं आहे!

त्याच बरोबर फाजलखान, रुस्तमेजमा, अगिन्या, हरप्या, शिवा काशीद, नेताजी, गंगाधरपंत, बडी बेगम, सोयराबाई राणीसाहेब अशी सर्वच पात्र सर्व अभिनेत्यांकडून उत्तम वठली आहेत.

शेवटच्या दृश्यात दिसलेले राजन भिसेंसारखे कसदार नट, फक्त एका संवादात का होईना, अतिशय सुखावून जातात!

चित्रपट संपल्यावर प्रेक्षागृहात जय भवानी, जय शिवाजी..हरहर महादेव अशा झालेल्या गर्जना पुन्हा एकदा रोमांचित करुन जातात.

हा चित्रपट फक्त दृष्यस्वरूपातच नाही, तर अंतरंगात साठवून ठेवण्यासारखा आहे. चिंतन केलं असता काही गोष्टी जाणवतात त्या म्हणजे..
पूर्ण एकाग्र होऊन जर शिवचरित्र अनुभवलं तर एकप्रकारचं तेज अंगात असल्याची जाणीव होते. चित्रपट संपल्यापासून घरी येईपर्यंत माझ्या नजरेत आग आणि चालीत त्याचा प्रभाव आल्याची जाणीव होत होती. त्यातच बाहेर पडल्यापासून मी कानात राजा शिवछत्रपती या सिरीयलसाठी अजय-अतुलने केलेलं शिर्षकगीत इंद्रजिमी जम्बपर रिपीट वर ऐकत होते.
डोक्यात दुसरे कुठले विचार येणं शक्यच नव्हतं. वाट चालत जाताना महाराजांनी आणि मराठ्यांनी तुडवलेली दऱ्या खोऱ्यातली, राना वनातली पाऊस पाण्यातली वाट आठवत होती. त्यांनी तेही केलं स्वराज्यासाठी. आपण सरळ रस्त्यावर असूनही काय करतो?

इतकं काहीतरी संचारल्यासारखं वाटत होतं पण त्या तेजाला वाट कुठं द्यावी हे मात्र कळत नव्हतं. घरी येऊन शांत झाल्यावर अनेक विचार येऊन गेले.

मावळ्यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्याच्या स्वप्नाकडे जीवाचा विचार न करता घेतलेली धाव सुन्न करुन जाते.

बाजी-फुलाजी कामी आले हे सांगायला महाराज बयोबाई मतोश्रींकडे येतात तेव्हा त्यांना ओवाळून त्या म्हणतात, "माझं नशीबच खोटं, आणखी दोन पोरं असती तर ती सुद्धा स्वराज्याच्या कामी आली असती."
काय लोकं असतील ही? कुठल्या मातीची बनलेली असतील? काय खात असतील? काय संस्कार झाले असतील त्यांच्यावर?

या लोकांनी महाराजांना साथ देऊन स्वराज्य स्थापन केलं. 
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पुन्हा एकदा सुराज्याची स्वप्न बघून या मायभूमीला परकीय पारतंत्र्यातून स्वतंत्र केलं.

पण आज ते राखलं जातंय का?

आजही सीमेवर असंख्य जवान आपल्या रक्षणाखातर बर्फात गाडून घेऊन, समुद्रात वाहून घेऊन किंवा रणरणत्या उन्हात उभं राहून आपली निष्ठा सिद्ध करतायत. 
देशाच्या प्रत्येक नागरिकाला याची जाणीव जन्माला आल्यापासून आपण का नाही देऊ शकत?

आपण अनेकदा ऐकतो की पाकिस्तानात कोवळ्या मुलांना कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, निर्दयी केलं जातं वगैरे वगैरे. त्याचा उल्लेखही नकोय खरंतर आत्ता, पण ते किती परिणामकारक असेल याचा अनुभव मी या काही काळात घेतला. 
असं ट्रेनिंग महाराजांचा इतिहास दाखवून आपण आपल्या पुढच्या पिढीला का देत नाही? का शाळा शाळांमधून महाराजांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा इतिहास जास्तीत जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकात येत? 
आणि जर पाठ्यपुस्तकात येत नसेल, तर आपण आपल्या मुलांच्या हाती तो देणं हे आपलं कर्तव्य आहे. हा विषय खूप मोठा व गंभीर आहे, पण अशा कलाकृती समोर आल्या की विचार करायला भाग पाडतात! असो!
आज मात्र थिएटर मध्ये 20% लहान मुलं होती. आणि ते बघून खरंच खूप बरं वाटलं! 

हा सिनेमा मी पुन्हा एकदा बघणार आहे, आणि त्यातले मोजके पण अतिशय मोलाचे संवाद टिपून त्यावर एक लेख लिहिणार आहे.
नीट ऐकलं तर चित्रपट बघितलेल्या प्रत्येकाच्या ते लक्षात येईल की अनेक ठिकाणी असे संवाद आहेत जे डोळ्यात अंजन घालतात, जे आजच्या काळातही लागू होतील.
ही ताकद आहे शब्दांची. आणि अनेक असे प्रसंग आहेत ज्यात एकही संवाद नसताना ते अंगावर काटा उभा करतात. ही ताकद आहे अभिनयाची.

दिगपाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष विशेष कौतुक आणि प्रचंssड आभार की ही पर्वणी ते आम्हा मराठी माणसांसाठी आणत आहेत. 

त्यांच्या येणाऱ्या "शेर शिवराय" या कलाकृतीला अनेक शुभेच्छा.
याच बरोबर विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स पुढच्या आठवड्यात नक्की बघण्याचा निश्चय केला आहे. 
कारण चांगल्या कलाकृती ह्या थिएटर मध्ये जाऊनच बघितल्या पाहिजेत. त्यामागे अपार अपार मेहनत गेलेली असते.

हा लेख जर संपूर्ण वाचला असेल, तर एक कळकळीची विनंती. लवकरात लवकर जाऊन पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स जरुर बघा.

जय भवानी, जय शिवाजी!

- कांचन लेले

3 comments:

  1. अतिशय उत्तम आणि कसदार लिखाण आहे तुझे कांचन.चित्रपटाचे केलेले यथार्थ वर्णन, त्यामुळे न बघताही चित्रपट र्डोळ्यासमोर उभा राहिला.लवकरात लवकरच पहाणार आहे.

    ReplyDelete
  2. खूपच भारावून टाकणारा अनुभव तितक्याच उत्कृष्ट शब्दात मांडला आहेस सिनेमातील अगदी प्रत्येक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या कामाची नोंद घेतलीस हे महत्वाचे कारण मुख्य व्यक्तिरेखांचा बर्‍याचा बोलबाला होतो.खूप सुंदर अशीच लिहीत रहा

    ReplyDelete