Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Saturday 12 May 2018

मातृत्व!


स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी..
असं पूर्वापार मानलं गेलं आहे…
आई!
या एका शब्दभोवती खूप मोठ्ठं वलय आहे…
आणि म्हंटलं तर तो फक्त दोन अक्षरी शब्द आहे!
म्हणजे कुठूनही घरात आलं आणि आईने दार नाही उघडलं की पहिला प्रश्न असतो "आई कुठंय?"
तिच्याकडे काही काम असतं असं नाही.. पण तरी तिचं असणं गरजेचं असतं..
बरं वाटत नसलं की कुणी म्हणतं डॉक्टरांकडे जाऊ..तेव्हा उत्तर एकच असतं..आधी आईला बोलवा..
कुठलीही वस्तू सापडत नसेल की वरवर शोधूनच पहिला फोन जातो आईला..मग अगदी लगेच सापडते…बरेच दिवस बाहेरगावी असलं की फोन करो ना करो, पण परतायच्या एक दिवस आधी जेवायला काय हवंय ते सांगायला फोन नक्की होतोच! एक ना दोन..म्हणून म्हंटलं..मोठ्ठं वलय आहे!
शाळेत असताना आम्हाला एक कविता होती..
आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर,
निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर!
डोक्याने खूपच लहान होतो तेव्हा..पण आईवर काहीतरी म्हणजे भारी ना..असं वाटायचं!
पण 'आकाशाएवढा पदर' असं वाचल्यावर घरी जाऊन दोन्ही हात पसरून तो मोजला नक्कीच असेल कोणीतरी! कारण त्या वयात 'मायेचा' या शब्दाचा अर्थ तितकासा कळत नसतो..
पण वर्षं उलटत जातात आणि अर्थही लागत जातात..
काही लोकांना वाटत असेल इतक्या लहान मुलांना हे काय कळणार..? नाहीच कळत..मान्य आहे..पण त्या लहान वयात शिकलेलं, मुलं कधीच विसरत नाहीत..त्यावेळी त्यांचा मेंदू टिपकागदाचं काम करत असतो.. आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा खरंच कळु लागतं, तेव्हा हे टिपलेलं सगळं रवंथ करत जातो..
संस्कार आणखी वेगळे काय असतात..?
फक्त चांगलं पेरत जायचं..इतकंच!
संस्कार म्हंटलं की पुन्हा आईचा त्यात सिंहाचा…अ…सिंहिणीचा वाटा असतो असंही मानलं जातं!
अगदी मातृत्वाची चाहूल लागल्यापासून एका स्त्रीचं, किंबहुना हल्ली बरेचदा एका बेफिकीर बिनधास्त मुलीचं रूपांतर 'आई'मधे होतं..मग चांगलंच खायचं, चांगलं ऐकायचं, चांगले विचार करायचे इत्यादींची मनात यादी केली जाते..गर्भसंस्काराची पुस्तकं पिंजून काढली जातात..पोथ्या पुराण वाढतं..स्वच्छता वाढते आणि कधी नव्ह ते प्रत्येक स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागते!
एखाद्या बिनधास्त मुलीच्या भावनांमध्ये तरंग उठत असतात..प्रत्येक गोष्टीवर 'react' व्हायचा 'angle' बदलत असतो..सगळी गणितं बदलत जातात..
लग्नाआधी 'मी नाही असलं काही करणार' असं म्हणणारी मुलगी बघता बघता कात टाकत असते!
हे सगळं बाळ गर्भात असताना..जन्माला आल्यावर तर बघायलाच नको..
जरा आधी म्हणायला गेलं तर बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो..त्या मरणप्राय यातना भोगल्यावरच एका जिवाच्या जन्माचा आनंद असतो! आपलं बाळ, आपल्या पोटचा गोळा!
पण जन्मा नंतर  मात्र त्या बाळाचे अनेक वाटेकरी असतात! फक्त गर्भात असताना ती एकटी मालकीण! त्या नंतर तिचं आयुष्यच बदलून जातं..खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो!
कारण ती स्वतःला विसरून जाते..आणि फक्त आई म्हणून जन्माला येते! अगदी सगळ्यात आवडत्या गोष्टीचा मोह सुद्धा ती सहज सोडून देते, कारण एकच असतं, घरी पिल्लू वाट बघत असेल!
खरंतर बरेचदा पिल्लू मजेत असतं, पण तिलाच करमत नाही त्याच्यावाचून!
पण हा आनंद प्रत्येक स्त्रीला अनुभवता येतोच असं नाही ना…?
मातृत्व हे कायम आईशी जोडलं गेलेलं आहे..
अर्थात ते सत्यही आहेच..पण खरंच या संज्ञेची व्याप्ती इतकीच आहे…?
नाही..नक्कीच नाही..जितकं मोठ्ठं वलय 'आई' या शब्दाभोवती आहे, त्याहून कितीतरी अधिक मोठं ते 'मातृत्व' या संज्ञेभोवती आहे!
पुराणातील उदाहरण घ्या, देवकी आणि यशोदा..
एक आई होती नात्याने, दुसरी ममत्वाने!
मातृत्व हे ममत्वाशी जोडलेलं आहे..
काही स्त्रियांना निसर्गाने गर्भधारणेचा अधिकार दिलेला नसतो, काहींना दिला असून त्याची कदर नसते, काहींचं लग्नच होत नाही, तर काही स्त्रिया आई होऊनही आपल्या मुलाला मातृत्वाने वाढवू शकत नाहीत!
अजब दुनिया आहे आपली..
पण म्हणून या जगात जन्माला येणारी मुलं वाढायची थांबत नाहीत ना..?
ज्यांना आई नाही, त्याची आई होणारं कुणीतरी असतंच ना..? मग ते अगदी बाबा, आजी, आजोबा, मावशी, आत्या, शाळेतल्या बाई, अनाथाश्रमातल्या बाई, पाळणाघरातल्या बाई इत्यादी इत्यादी..यादी खूप मोठी होऊ शकते..
कधी कधी एखादी मैत्रीणच आपली आई होऊन जाते..तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या हळव्या क्षणी मित्र असा डोक्यावर हात ठेवतो की क्षणभर कळूच नये नेमका कोणाचा हात आहे ते!
कधी एखाद्या एकट्या मुलाने एखादी मांजर किंवा कुत्रा पाळला असेल तर त्याचं नीट निरीक्षण करून बघा..तो त्याची आई झालेला असतो केव्हाच!
जन्मलेल्या प्रत्येक जीवामध्ये मातृत्व दडलेलं असतं..आणि प्रसंगानुरूप ते बाहेर येत असतं!
म्हणून म्हंटलं खुप मोठी व्याप्ती आहे 'मातृत्वाची'!
आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी कळत नकळत प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात जेव्हा आई समोर नसते त्या क्षणाला..पण ती जागा तात्पुरती कुणीतरी भरून काढत असतं!
ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना कधी कुणाच्या मुलांना सांभाळताना बघितलं आहे..?
पोटच्या गोळ्याला कुणी लावणार नाही इतका जीव ती माऊली कुठल्याही मुलाला सहज लावते..
निसर्गाची क्रूर चेष्टा तिच्यातील मातृत्व आणखी दृढ करते हे मात्र निश्चित!
अशा प्रत्येक माउलीला एक सलाम आणि लोकांमध्ये दडलेल्या मातृत्वाच्या ओढीला नम्र अभिवादन!
अशा अनेक जीवलगांनी आयुष्य सुंदर होत असतं..
गरज असते फक्त त्यांना धरून ठेवण्याची
आणि प्रत्येकाने आपल्यातील संवेदना जपण्याची, न जाणो तुम्हीच कधी कुणाची आई होऊन जाल!
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
©कांचन लेले

चित्र सौजन्य - Google

2 comments:

  1. खूप सुंदर लिहिले आहेस कांचन!🌹

    ReplyDelete