Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Tuesday 29 May 2018

अमावस्येचा चंद्र!


अमावस्येचा चंद्र!
अमावस्येचा चंद्र! काय…? हो…अमावस्येचा चंद्र!
शीर्षक वाचून हसू येईल कदाचित..पण इंग्रजीत म्हणतात तसं 'between the lines' या तत्वावर हे शीर्षक अगदीच योग्य आहे!
चंद्र…
सानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना अप्रूप असणारी अगम्य निर्मिती!
शीतलतेचं प्रतीक! सौंदर्याचा बावनकशी नमुना!
खरंतर लोभासवणा दिसतो तो पौर्णिमेचा चंद्र! किंवा प्रतिपदेची बाssरीक रेखीव कोर! पण अमावस्येचा चंद्र जितका हवासा वाटतो तितका कदाचित पौर्णिमेचाही नाही वाटत..
गमतीदार आहे नाही..?
तीस दिवसाच्या कालखंडात २९ दिवस चंद्र आकाशात असतो..
किती दिवस आपलं लक्ष जातं..?
पौर्णिमेला मात्र तो लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही..आणि अमावस्येलाही!
अगदी शहराच्या भरमसाठ लाइट मध्ये सुद्धा तो जर्द काळोख जाणवला की मात्र मनात येऊन जातं 'आज अमावस्या असावी..'
कारण ३१ डिसेंम्बरला नवीन वर्ष साजरा करण्याच्या जमान्यात तिथी वगैरे कुठे बघत बसतायत लोक!
पण चंद्र काही वाईट वाटून घेत नाही…तो असतो सतत साक्षीला..
शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची तब्बेत सुधारत जाते..तो बाळसं धरत वाढणारा चंद्र जर रोज बघितला तर त्यासारखं सुख नाही! तो १५ दिवस असतो, पण लक्ष मात्र जातं आपलं फक्त पौर्णिमेला! त्यादिवशी नजर ठरत नाही असं रूप धारण करतो तो..
मग त्या दिवशी जरा ढगांआड गेलेला दिसला तरी आपण सारखे बघतो की ढग गेले की नाही, चंद्र पूर्ण दिसतो की नाही! जवळपास ढग म्हणजे त्याच्या उत्कर्षाला, सौंदर्याला लागणारी दृष्टच जणू!
पुढे वद्य प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत त्याची तब्बेत खालावत जाते..त्यातही एक वेगळं सौंदर्य धारण करून असतोच तो, फक्त आपलं लक्ष जात नाही! मग अचानक एक दिवस अंधःकार जाणवू लागतो…कदाचित या धकाधकीच्या आणि जलद जीवनपद्धतीत फक्त क्षणभर जाणवत असेल, पण तेवढा पुरून उरतो!
अचानक चंद्राचं महत्व कळतं..पण प्रतिपदेपर्यंत वाट बघावीच लागते!
म्हणून अमावस्येला चंद्र जास्त हवाहवासा वाटतो!
माणसांचंही काही वेगळं नसतं…
प्रत्येक व्यक्तिभोवती एक वलय असतं..
त्यात अग्रगण्य परिवार, मग नातलग, दोस्त मंडळी आणि आणि काही अशी नाती जी रक्ताची नसतात पण त्याहून सरस ठरतात!
ह्यातली काही माणसं सतत आपल्या अवतीभवती असतात, काही असतातच असं नाही, पण दोहोंपैकी कोणी लांब गेलं की पोकळी मात्र जाणवते!
उदाहरणार्थ घ्यायचं झालं, तर वडीलधारे आपल्या जन्मापासून-वयात येण्यापर्यंत पौर्णिमेचं शिखर गाठून जातात! पुढे एका एका कलेने बारीक होत जातात..तेव्हा गरज असते खरं लक्ष देण्याची! पण दुर्दैवाने बरेचदा आपलं लक्ष जातं ते एकदम अमावस्येलाच…
आणि सामान्यतः बघायचं झालं तर,
अनेक माणसांनी आपलं छोटंसं जग व्यापलेलं असतं..
ही माणसं सतत आपल्यासाठी असतात..काहींच्या संपर्कात आपण असतो सतत..पण काहींशी मात्र आपल्याला रोज संवाद साधता येतो, भेटता येतं असं नाही..ते त्यावर रागवतही नाहीत, ते सुद्धा असतात चंद्रासारखे सतत साक्षीला!
आणि कुठलंही नातं प्रेमाने आपलंसं केलं की ते दिवसागणिक कलेकलेने दृढ होत असतं.. ऋणानुबंध तयार होत असतात!
अशातच ज्या दिवशी ही मंडळी काही काळासाठी का होईना, पण लांब जातात असं दिसतं तेव्हा मात्र मन उचंबळून येतं!
डोळे पाणावतात! आपल्याला माहीत असतं की ती काही कायमची चालली नाहीत, सुट्टी संपली, काम झालं किंवा इतर असलेलं नियोजन साफल्य पावलं की ते येणार आहेत परत! पण तरी वेडं मन ऐकत नाही..
सतत आठवण काढत रहातं आणि मग आपणही खूप आतुरतेने वाट पहातो ती प्रतिपदेची!
कदाचित चंद्रही वाट पहात असतो प्रतिपदेची..
कारण अमावस्येला तुम्हाला तो दिसला नाही तरी तो बघत असतो तुम्हाला आणि असतो तुमच्या बरोबरच...कायम!
फक्त थोडासा ब्रेक घेतो अधूनमधून..कारण शेवटी
विरहाने नात्यातील प्रेम वाढत असतं ना!

काही विशेष लोकांना समर्पित ज्यांच्याशिवाय आयुष्य इतकं सुंssदर नसतं! I'm missing you all! लवकरच भेटू! :)
©कांचन लेले

1 comment:

  1. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन......

    ReplyDelete